‘मुल्कपरस्त’ आणि ‘दादुमियां’ दोन नावं व त्यांचं लेखन उतारवयातील मराठी वाचकांना माहीत असेल. ही लेखकद्वयी मुसलमान नसून हिंदू धर्मातील वरीष्ठ वर्गीय ब्राह्मण होती. होय, हे खरं आहे. पण याची कल्पना खूप कमी जणांना असावी. हे दोन्ही लेखक हिंदू धर्मात जन्माला आले आणि ब्राह्मणी वरीष्ठ वर्णीय हिंदू म्हणूनच जगले. त्यांनी मुस्लिम नावं का धारण केली? असा प्रश्न वाचकांना पडणं स्वाभाविक आहे. वास्तविक, मुस्लिम समुदायातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय तथा मानस प्रवृत्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी ही रूपं धारण केलेली होती.
शोध हा शब्द खूपच सोज्वळ वाटतो, खरं तर मुस्लिमांचा लपून-छपून ‘कानोसा’ म्हणजेच हेरगिरी करण्यासाठी या लेखकांनी आपली उर्जा वापरली. ‘कानोसा’ घेण्याचा हेतूच मुळात दृष्ट स्वरूपाचा असतो. त्यामुळे स्वाभाविक लेखनात ते जाणवते. त्यांनी छद्मी टोपण नावं धारण करून (मुस्लिम) वाचकांना फसवलंच नाही तर त्यांनी मुस्लिमांची तथाकथित कर्मठता, धर्मश्रद्धा, व्यक्तिदोष व वर्तन-व्यवहाराला अधिकाधिक रंगत व चटकदार पद्धतीने मांडून समाजाच्या अमानवीकरणाच्या प्रक्रियेला गती दिली, असं त्यांच्या लिखणावरून दिसून येते.
या लेखक द्वयींच्या लेखन कृतीने मुसलमानांच्या तथाकथित खलप्रवृत्तीचं उदात्तीकरण करून त्याला सबंध समाजाचे प्रतिनिधी म्हणून सादर केलं. अर्थातच जे लेखन हिंदू नावं धारण करून शक्य नव्हतं ते त्यांनी मुस्लिमासारखी वाटणारी टोपण नावं धारण करून केलं. २०१४ नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लिम विंग असलेल्या ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’ने अशाच प्रकारची मांडणी जाहीररित्या सुरू केली आहे. या मांडणीचे मूळ सुत्रधार व मार्गदर्शक हे दोन लेखक असावेत का, असं सहज वाटून जातं.
दादुमियाँ हे तर हिंदुत्ववादी आणि संघी मानसिकतेचे लेखक होते. आरएसएसचे सक्रीय स्वयंसेवक होते. त्यामुळे त्यांना तुर्त बाजुला ठेवू. पण समाजवादी चळवळीतील ‘पुरोगामी’ चेहरा असलेल्या ‘मुल्कपरस्तां’ची ही मानसिकता कशी काय? विशेष म्हणजे समाजवादी चळवळीत युसूफ मेहरअलीसारखे निरपेक्ष स्वातंत्र्य सेनानी व मोईनुद्दीन हारीससारखे प्रख्यात धर्मनिरपेक्ष पंडित असूनही समाजवादी चळवळीतील संघटक मुस्लिम विरोधी?
‘मुल्कपरस्त’ नावाच्या लेखकांचं मूळ नाव ‘यदुनाथ थत्ते’ आहे. ते समाजवादी चळवळीतील अग्रणी संघटक होते. साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या ‘साप्ताहिक साधना’चे ते दीर्घकाळ संपादक राहिले. समाजवादी वर्तुळात ‘विचारवंत’ म्हणून त्यांची ख्याती होती. साने गुरुजी यांच्या ‘धडपडणाऱ्या मुलां’मध्ये त्यांची गणना होत. गुरुजींचे अनुयायी व परिवर्तनवादी चळवळीत असूनही त्यांचं मुस्लिमविषयक आकलन व समज एखाद्या कर्मठ हिंदुत्ववाद्यासारखं भासतं.
यदुनाथ थत्ते यांची तीन मुस्लिम विषयक पुस्तकं प्रकाशित आहेत. पैकी एक म्हणजे ‘मुस्लिम मनाचा कानोसा’ मुल्कपरस्त नावाने; तर दुसरे पुस्तक ‘कलमनवीस’ नावाने ‘नागपूर पत्रिके’त लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘मुस्लिम समाजातील वाहते वारे!’ असं आहे. दोन्ही पुस्तकावर लेखक म्हणून छद्म नाव आहे. त्यातील मजकूर वाचून एखाद्या कर्मठ हिंदुत्वनिष्ठ प्रचारकाने लिहिली असावीत असं वाटतं. इस्लाम आणि मुस्लिम समाजावर तुच्छतादर्शी, नकारात्मक व हिणकस पद्धतीचं लेखन यात आहे. लेखकाने आपली मूळ हिंदू-ब्राह्मणी ओळख दडवून हे लेख-पुस्तकं का लिहिली? या प्रश्नाचं उत्तर त्यातील भडक आशय वाचून मिळते.
श्री. थत्ते पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक ‘सकाळ’मध्ये एक शुक्रवार आड ‘मुल्कपरस्त’ नावाने ‘मुस्लिम मनाचा कानोसा’ हे सदर लिहित होते. ‘१९७५ पासून ‘एका तपात’ २५० लेख प्रसिद्ध झाले.’ पुढे तीन खंडात त्याचं पुस्तक रुपाने प्रकाशन झालं. देशात घडणाऱ्या विविध राजकीय घटनांचे पडसाद, मुस्लिम राजकारण, धर्ममार्तंड, सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडी, राजकीय नेते व बहुसंख्याकवादी राजकारणात त्यांचं अस्मितावादी राजकारण तथा प्रतिक्रियावादाची चिरफाड त्यात आहेत. पहिली आवृत्ती प्रकाशित करताना थत्ते संपादकाच्या (हुसैन जमादार सहयोगी संपादक) भूमिकेत येतात.
एकूण लेखांपैकी काहींचे ‘तवारीख’ नावाने १८८२ मध्ये (चेतश्री प्रकाशन, धुळे) प्रकाशन झालं. उरलेल्या काही लेखांचा ‘निवडक तवारीख’ हा संग्रह १९८६ला (मंजुश्री प्रकाशन, पुणे) आला. त्यानंतर उर्वरित लेखांचा संग्रह १९९३ साली ‘मुस्लिम मनाचा कानोसा’ नावाने ‘मानसन्मान’ प्रकाशनाकडून (दुसरी आवृत्ती) आला. २०२१ला या पुस्तकांची दोन सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. नव्या पुस्तकांविषयी साधना प्रकाशनचे संपादक श्री विनोद शिरसाठ लिहितात, “निवडक तवारीख व मुळ तवारीखमधील १२ लेख आणि मुस्लिम मनाचा कानोसा हे सर्व एकत्र करून आणि नागपूरमधील पत्रिकामधील सदराचे अशी दोन पुस्तके नव्या आवृत्त्याच्या रूपात साधना प्रकाशनाकडून एकाच वेळी आणत आहोत.”
‘मुस्लिम मनाचा कानोसा’ पुस्तकाचे लेखक ‘मुल्कपरस्त’ आहेत. परंतु पुस्तकावर ते उघडपणे छापलेले नाही. संपादक म्हणून त्यावर श्री. थत्ते यांचं नाव आहे. खरा परिचय उघड होऊ नये म्हणून त्यांनी जोडीला हुसैन जमादार घेतले असावेत. थत्तेंनी संपादकीय प्रस्तावनेत सदरील लेखन आपले आहे, असा उघड व दडलेला दावा कुठेच केलेला नाही.
वास्तविक, २०२१ साली ‘साधने’ने काढलेल्या सुधारित आवृत्तीत श्री. यदुनाथ थत्ते यांचं नाव लेखक म्हणून जाहीर व घोषित करण्यात आलेले आहेत. श्री थत्ते यांच्या निधनाच्या दोन दशकानंतर ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळे थत्ते यांचं नाव आता उघडपणे वापरण्यास नव्या संपादकाला गैरसोयीचं वाटण्याचं कारण नाही.
साधनेचे विद्यमान संपादक श्री. विनोद शिरसाठ यांनी पुस्तकाला प्रकाशकीय टिपणही जोडलेलं आहे. त्यात ‘सकाळ’चे लेख व त्याचं पुढे पुस्तक निर्मिती असा प्रवास विस्ताराने मांडलेला आहे. सदरील पुस्तकाचे लेखक श्री. थत्ते आहेत, अशी स्पष्ट कबुली श्री. शिरसाठ देतात. दोन आवृत्त्या प्रकाशित करेपर्यंत मूळ लेखकाला जो कबुलीजबाब देता आलेला नाही, तो नंतरच्या संपादकाने अभिमानाने दिलेला आहे. त्यामुळे या पुस्तकांचे अधिकृत लेखक श्री. थत्ते आहेत, हे प्रथमच जाहीर होत आहे. (अनवर राजन यांनी श्री थत्तेंच्या निधनानंतर साधनेत श्रद्धांजलीपर लेख लिहिताना हे नाव शीर्षकाला दिलं होतं.)
वाचा : आरएसएस आणि वर्तमान राजकारण
सदरील टिपणासाठी जुनी आणि नव्या सुधारित आवृत्तीचा (साधना) आधार घेतला आहे. पुस्तकाला संपादकाची (थत्ते) प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना त्यांनी त्रयस्थ म्हणून लिहिली आहे. त्यात आत्मस्तृती करताना ते म्हणतात, “शुक्रवारी मुसलमान नमाजाच्या निमित्ताने एकत्र जमत तेव्हा स्वाभाविकपणेच मुल्कपरस्तांनी ‘मुस्लिम मनाचा कानोसा’ काय घेतला, यावर चर्चा होत असे. शुक्रवारी हे सदर प्रकाशित करण्यामागचा हेतू अशा रीतीने साध्य होई.”
एका लेखात श्री. थत्तेंना मुसलमानांची स्वतंत्र विचार करण्याची पद्धत किंवा मुसलमानांचं स्वायत्त राजकारण राष्ट्रीय एकात्मतेला बाधक वाटते. मुसलमानांवर होणारे सततचे अत्याचार व दंगलीच्या राजकारणाने उद्विग्न होऊन गणराज्य दिनाला मुसलमानांनी काळे झेंडे लावावे, अशी सूचना शाही इमाम करतात, तेव्हा थत्तेंना ही घोषणा अ-राष्ट्रवादी वाटते. वास्तविक, शाही इमाम व सय्यद शहाबुद्दीन यांना अशा प्रकारची घोषणा (?) का करावीशी वाटली, याची निरपेक्ष मांडणी संपादक करीत नाहीत.
वस्तुत: मुस्लिम समाजावर होणारे सततचे दोषारोपण, दंगलीचं राजकारण, निष्पाप तरुणांचे एन्काउंटर, भिवंडी दंगलीतील जीवित-वित्तहानी अशा विविध पार्श्वभूमीवर हताश होऊन तथा उद्धिग्नपणे सदरहू घोषणा आलेली होती. लेखक महाशय या वस्तुस्थितीची चर्चा किंवा मीमांसा न करता सरधोपटपणे संबंध मुसलमानांना ठोकू लागतात.
स्मरण असावं की, १९७१ साली स्वातंत्र्य दिनाची पंचविशी ‘साप्ताहिक साधने’ने साजरी केली. त्या वेळी दलित अत्याचारविरोधी विशेषांक काढला गेला. त्यात दलित पँथर संघटनेच्या एका संघटकाने राष्ट्रध्वजाविषयी प्रक्षोभक भाषा वापरली. बराच गदारोळ झाल्यानंतर साधनेतून तो लेख-शब्दाचे अनेक पाठिराखे तयार झाले होते. त्यातील काहींनी सदरहू लेखनाचं समर्थन केलं. मग पुढच्या सात-आठ वर्षात परिस्थिती इतकी का बदलली? थत्ते मुस्लिमांना सावत्र वागणूक का देतात? मुस्लिम आणि मुस्लिमेतर असा ठळक भेद साधना व तिचे संपादक करत होते, याचा हा पुरावा आहे.
प्रस्तावनेत श्री. थत्ते आत्मप्रौढी मिरवताना लिहितात, “मुल्कपरस्तांच्या लेखांना जाहीरपणे उत्तर देण्याचे मुसलमानांचे स्वयंनियुक्त नेते बहुधा टाळत. सकाळच्या संपादकांकडे अधूनमधून ते तक्रारी करत, पण लेखी उत्तर देण्याला ते तयार नसत.” याचा अर्थ त्यांचे लेख वादग्रस्त, प्रक्षोभक व मुस्लिमांवर टीका करणारे होते, अशी कबुली स्वत: थत्ते देतात. त्यांना वाचक म्हणून मुसलमानांच्या प्रतिसादाचीही आस आहे.
मुस्लिम समाजाला प्रतिक्रियेसाठी उत्तेजित करायचे, त्यांच्यावर खडे फेकायचे व त्यांनी रागाच्या भरात किंवा अविवेकी होऊन प्रतिक्रिया दिल्या की, ‘बघा, मुस्लिम किती असहिष्णू असतात’ अशा प्रकारे मुस्लिमांना झोडपत सुटायचे. आज हेच धोरण संघ व त्यांच्या छावणीतील भाष्यकार-प्रचारक करताना दिसतात. आरएसएसचा त्यामागील हेतू स्पष्ट आहे. म्हणजे श्री. थत्ते यांना यापेक्षा वेगळं काही अपेक्षित होतं का?
संबंधित पुस्तकात चर्चा व समीक्षा करण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत. प्रत्येकावर चर्चा करीत राहिलो तर एक स्वतंत्र टीकात्मक ग्रंथच होईल. किंबहुना त्या अविवेकी लेखनाला इतक्या वर्षांनंतर किती महत्त्व द्यायचे हाही मुद्दा आहेच! त्यामुळे संबंधित टिपणाचा उद्देश श्री. यदुनाथ थत्ते यांच्या लेखनाची समीक्षा करणं हा नसून छद्म नावाची मानसिकता शोधणं असा आहे.
लेखनातून लेखकांच्या मुस्लिमविरोधी मानसिकतेचे अधोरेखन वारंवार होते. प्रत्येक लेखाचा सूर नकारात्मक आहे. किंबहुना फक्त नकारात्मकतेचा शोधच लेखक घेत असावेत. ‘मुल्कपरस्त’ उर्फ श्री. यदुनाथ थत्ते पानापानावर मुसलमानांचे सरसकटीकरण करू लागतात. कर्मठ, धर्मांध व दंगलखोर अशी शेरबाजी करतात. त्यांनी ऐकेठिकाणी ‘साहिब ने कही थोडी, बंदों ने सौ जोडी।’ या लोकप्रिय म्हणीचा वापर केला आहे. ती तंतोतंत संपादकांना लागू पडते. ठरावीक व निवडक व्यक्तींच्या वृत्ती, प्रवृत्ती, समज, धारणा व आग्रह तथा चुकीच्या समजुती किंवा प्रतिक्रियांना थत्ते सबंध समाजाला लागू करतात. शिवाय मीठ-मसाला (बंदों ने सौ जोडी) लावून त्यांच्या मानस प्रक्रियेला दोष देऊ लागतात.
श्री. थत्ते प्रस्तावनेत लिहितात, “बहुसंख्यकांचा जातिवाद राष्ट्रवादाची झूल पांघरून वावरू शकतो आणि अल्पसंख्यकांच्या जमातवादात कट्टरता अधिक असते.” पुढे म्हणतात, “बहुसंख्यकांच्या तथाकथित राष्ट्रवादाची परखड चिकित्सा केली पाहिजे आणि अल्पसंख्यकांच्या कट्टरतेवरही निःसंकोचपणे टीका केली पाहिजे.” या दोन्ही वाक्यात बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक असं चित्रण करून मुसलमानांचं सरसकटीकरण केलेलं दिसून येईल.
मुस्लिमांची मानस घडण्याची प्रक्रिया व त्याला प्रभावित करणारे घटक संपादक महाशय लक्षात घेत नाहीत. भेदनिती, अविश्वास, संदेह व दूजाभाव हे घटक लेखक दुलर्क्षित करतात. या उलट मुस्लिम समुदायाविरोधात संशय निर्माण होईल, असं वक्तव्य करत राहतात. मुस्लिम समुदायाविरोधात संभ्रम तयार करणे, अविश्वास, तिरस्काराची मोहिमा राबविणं अशा प्रकल्पाचा भाग म्हणून हे लेखन केलं असावं, असं प्रतीत होतं.
लेखक महाशयांना अल्पसंख्याकाच्या धर्मवादाला अधिकाधिक ठळकपणे मांडायचे आहे, असं दिसून येते. वास्तविक, लेखक बहुसंख्याकाच्या जमातवादाचे सामान्यीकरण करतात तर अल्पसंख्याकाच्या (वस्तुत: मुस्लिम) जमातवादावर बोट ठेवतात. यातून लेखकाला नेमकं काय उद्दिष्ट साध्य करायचं हे उघड होतं.
श्री. थत्ते यांच्या संपादनात ‘साप्ताहिक साधने’त स.मा. गर्गे यांची टिपणं छापली जात होती. ही टिपणं उर्दू वर्तमानपत्रातील मजकूर, संपादकीय, वृत्तलेख, बातम्या, विधानांच्या स्वरूपात असत. हे टिपण मराठीत अनुवाद करून प्रकाशित करताना श्री. गर्गे त्याला प्रतिक्रियास्वरूप टिपणं जोडून शेलक्या भाषेत शेरबाजी करतात. या लेखनाचा उद्देशही मुस्लिम समाजाची हेरगिरी करणं दिसतो. कारण प्रकाशित झालेल्या शेकडो टिपणात, मुसलमानांच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात चांगलं काही घडतच नव्हतं असा आभास निर्माण केलेला आहे. म्हणजेच हे लिखाणही नकारात्मक सूरात आलेलं आहे. त्याचाही उद्देश मुसलमानांची प्रतिमा विकृत पद्धतीने सादर करणं असा दिसतो.
मध्य-पूर्व मुस्लिम देशातील घटनांवर भारतीय मुस्लिम प्रतिक्रिया देतो, लेखकांना ही भारतीय मुस्लिमांची धर्मांधता वाटते. हे बालीश व हास्यास्पद निरिक्षण नव्हे का? मुस्लिमविषयी एकसंध मांडणी करून झोडपण्यात केवळ संघी अग्रेसर नव्हते तर समाजवादी मंडळीही पुढे होती. त्याचा पुरावा श्री. थत्ते यांचे लेख व पुस्तक वाचून सहज दिसून येतो.
संघ व समाजवादी मंडळीला मुसलमानात चांगलं व सकारात्मक काहीच दिसत नाही. मुस्लिम आणि त्यांच्या धर्माची वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात समाजवादी मंडळी कमी पडली, हे उघड सत्य आहे. त्यांना मुसलमानात सतत दोष आढळतात. मुस्लिमांच्या उणिवा काढण्यात ते सतत व्यग्र असतात. हाच कित्ता गिरवत मुसलमानांचे उणे-दुणे काढण्यात लेखकाने आपली संपूर्ण उर्जा खर्ची घातलेली दिसते.
सार्वजनिक चर्चाविश्वात मुस्लिमांना उपदेश करण्यात समाजवादी मंडळींनी सर्वाधिक उर्जा व वेळ खर्ची घातला. त्यामुळे त्यांना मुस्लिमांविषयी वेगळा विचार करण्याची गरज वाटली नाही. ते संघाच्या मुस्लिमविरोधी हल्ल्याला तत्कालिक प्रतिक्रिया देत राहतात. या गडबडीत मुस्लिमांचा लोकशाही दृष्टिकोन, उदार विचार, नागरी स्वातंत्र्य, मानवी बाजू, मौलिक हक्क या सकारात्मक बाबी किंवा राजकीय कुचंबणा, मानसिक खच्चीकरण, वर्तन-व्यवहार, मानसिकता, व्यक्तिदोष अशा घटकांविषयी सारासार विचार करण्याची कुवत ते गमावून बसतात. ही बाब श्री. थत्ते यांनादेखील लागू पडते.
वस्तुत: दोन्ही पुस्तकातील लेखन व त्यातील कथन, मांडणी गृहितके इत्यादीबाबत विस्ताराने लिहिणं-बोलणं अपेक्षित आहे. बहुतांश निरिक्षणं व युक्तिवाद वादग्रस्त आहेत. ज्या पद्धतीची भाषा व शेरेबाजी केली आहे, ती आक्षेपार्ह वाटते. त्यामुळे एक-एक वाक्य उचलून चिकित्सा करणं क्रमप्राप्त ठरते. परंतु औचित्यभंग म्हणून ती प्रक्रिया बाजुला ठेवू.
लेखकांची बहुतांश मतं, विचार, प्रतिक्रिया व निरिक्षण आरएसएसच्या प्रतिक्रियावादातून पुढे आलेली आहेत. त्याला स्वतंत्र आकलन व अनुभवजन्य माहितीची जोड नाही. लेखक व त्यांच्या चळवळीने तहयात संघाच्या प्रतिक्रियावादाला तत्कालिक उत्तरं देण्याची क्रिया-प्रक्रिया अवलंबली. त्यामुळे त्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे विचार व आकलन करण्याची क्षमता ते गमावून बसले.

मूळ नावाने जे लिहू शकत नाही किंवा समीक्षा-चिकित्सेला सामोरे जाण्याची तयारी नसते अशावेळी टोपणनावाचा आधार घेतला जातो. किंवा मुखवटा धारण करून मूळ ओळख लपविली जाते. छद्म नाव धारण केल्याने श्री. यदुनाथ थत्ते यांना मुस्लिमांवर टीका करणे, त्यांच्या धर्माची व मानस प्रवृत्तीची चिकित्सा करणे सोपं होऊन जातं.
आरएसएसने प्रचारित केलेल्या इस्लामी आकलनाचे परिमाण त्यांनी मुसलमानांना समजून घेण्यासाठी वापरली. मुळात इस्लाम आणि भारतीय मुस्लिम या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. भारतीय मुस्लिमांचा धर्म हा इथल्या जाति-वर्गआधारित समाजरचना व भारतीय वंश-सास्कृतिक परंपरेचा भाग आहे. इतर धर्मियाप्रमाणे त्याची जीवनशैली ही भारतीयच आहे. मल्याळी, मराठी, कानडी, गुजराती, बंगाली, अवधी, बिहारी, तमिळ अशा वेगवेगळ्या प्रादेशिक अस्मिता घेऊन तो जगतो. त्यामुळे त्याचं सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीची प्रक्रिया विचारात घ्यावी लागते. तसे न केल्यास ते अन्यायकारी ठरते.
मुस्लिमांना समजून घेण्यासाठी त्यांच्या वस्ती-मोहल्ल्यात जावं लागतं. त्यांची घरे, दुकाने, कामाची ठिकाणं, शाळा, महाविद्यालयात जाऊन त्यांचं वर्तन-व्यवहार पहावा लागतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी मैत्रीचं नात प्रस्थापित करावं लागतं, त्यांच्याशी हितगुज करावं लागतात. त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, त्यांना प्रभावित करणाऱ्या राजकीय निर्णये-घटनांवर त्यांची मते, निरिक्षणं, चर्चा ऐकावी लागते. त्याही उपर म्हणजे त्यांच्या गुण-दोषांसहित माणूस म्हणून त्याचा स्वीकार करावा लागतो. त्याला नेहमीच धर्माच्या चौकटीत पाहणं म्हणजे त्याची योग्य समीक्षा असं होत नाही.
मुस्लिमात फरसे चांगलं घडत नसते, त्यांचा धर्म वाईट, मुस्लिम कर्मठ असतात, असा ग्रह श्री. थत्ते करून बसले आहेत, असं त्यांच्या टिपणावरून कळते. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ते मुसलमानांचा समजून घेण्यास कमी पडले. किंबहुना या शास्त्राकडे त्यांचं लक्षच गेलेले दिसत नाही. वेळोवेळी लिहिलेल्या साधनेच्या संपादकीयमधून बौद्ध, ख्रिस्ती, जैन, पारशी धर्मातील धर्मतत्वाची गौरवीकरण करणारे थत्ते इस्लामच्या धर्मतत्त्वज्ञानाची दखल घेत नाहीत. कारण इस्लाम धर्मात चांगलं काही असूच शकत नाही, असा समज करून श्री. थत्ते जगत असावेत.
या संदर्भात प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी आपल्या आत्मचरित्रात एक रोचक नोंद केलेली आहे. ते लिहितात, “…सभागृहात यदुनाथ थत्ते शेजारीच बसले होते. मी त्यांना डॉ. आलम खुंदमिरींचा अनुवादित लेख दाखवला. ‘साधना’त प्रसिद्ध कराल का? असे विचारले. त्यांनी लेखावर नजर टाकली आणि परत केला. ‘अनुवादित लेख आम्ही छापत नाही’, असे ते म्हणाले. मी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. त्यांची त्या लेखाच्या अनुषंगाने चर्चाही करण्याची तयारी दिसली नाही. मी हिरमुसलो होतो. रागाने खदखदतही होतो. महाराष्ट्रातली ही तथाकथित मोठी माणसे!”
श्री. बेन्नूर सांगत आहेत, ती घटना १९७७-७६ सालची आहे. त्या काळातील साधनेचे अंक पाहिले तर त्यात असंख्य अनुवादित लेख, टिपणं छापलेली दिसतात. परंतु श्री. थत्ते यांनी मुस्लिम-इस्लाम विषयावरील वस्तुनिष्ठ मांडणी करणारा लेख छापण्यास नकार देण्यासाठी अनुवादाचं कारण पुढं केलं. यावरून श्री. थत्ते यांचं इस्लाम, मुस्लिम आणि मुस्लिमांच्या प्रश्न-समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.
प्रा. बेन्नूर, डॉ. खुंदमिरी यांच्या एका इस्लाम संदर्भातील लेखाविषयी बोलत होते. खुंदमिरी उस्मानिया विद्यापीठातील प्राध्यापक व इस्लामी विद्वान होते. त्यांनी संबंधित लेखात इस्लामच्या बुद्धिप्रामाण्य व आधुनिक दृष्टिकोनाची मीमांसा केली होती.
वास्तविक, इस्लामविरोध, मुसलमानांची नालस्ती, हेटाळणी करून परिवर्तनवादी व त्यांच्या संघटकांना मुसलमानात तथाकथित सुधारणा घडवून आणायच्या असतात. ते समाजातील चांगुलपणाचा शोध घेत नाही, तर सततचं दोषारोपण करत राहतात. हे करताना समाजातील सकारात्मक पैलू दुर्लक्षित करून किंवा त्याला बेदखल करून शत्रुकरण करण्याचं काम या चळवळीने हाती घेतलं होतं. साधनेचे संपादक श्री. थत्तेदेखील त्याच पावलावर पावले टाकण्यासाठी छद्म नाव धारण करतात.
कलीम अज़ीम, पुणे
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com