
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुत्व हितैशी आणि त्याचवेळी मुस्लिमविरोधी ठरवण्याचा आटापिटा आरएसएस-भाजपकडून सातत्याने होत असतो. हिंदुत्व विचारांचे वाहक ठरविण्यासाठी आंबेडकरांचं वारंवार अपहरण होत आलेलं आहे. त्याची वेळोवेळी समीक्षा, चिकित्सा व वस्तुनिष्ठ युक्तिवादही झालेली दिसतात. परंतु “नेमिची येतो....” प्रवृत्तीतून संघाकडून तेच-तेच काम पुन्हा होत राहतं. मूलभूत वैचारिक बैठक ज्यांची पक्की आहे; ते या भूलथापा व भ्रमजालांना बळी पडत नाहीत. पण सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी, बुद्धिभेद घडविण्यासाठी संघाकडून हा खटाटोप सातत्याने होत राहतो.
या संदर्भात विस्तृत भाष्य करणाऱ्या एका पुस्तिकेची चर्चा इथं केली आहे. ही पुस्तिका हिंदुत्व विचारसरणी, पाकिस्तान पुस्तकाविषयी माझ्या चिंतनाला पूरक आहे. आपल्या मताला कुठेतरी शास्त्रीय आधार आहे, असं सदरील लेखन वाचून वाटलं. त्यामुळे लिहिण्याचा प्रपंच!
डॉ. सुहास पळशीकर यांनी लिहिलेली ही छोटेखानी पुस्तिका म्हणजे १९९३ सालचं एक भाषण होय. सातारा येथील आंबेडकर अकादमीसाठी ‘हिंदुत्वाचे राजकारण’ या परिसंवादासाठी ते तयार करण्यात आलं होतं. त्यावेळी अकादमीने त्याची पुस्तिका प्रकाशित केली होती. त्याचं पुनर्प्रकाशन नुकतंच हाती आलं. त्याचं नाव ‘चिकित्सा डॉ. आंबेडकरांच्या ‘हिंदुकरणा’ची’ असं आहे. त्यात ‘आंबेडकर आणि हिंदुत्व’ या बुद्धिभेदाची परखड चिकित्सा लेखक करतात.
मुस्लिमविरोधी सिद्ध करण्याचा डाव
हिंदुवादी गट, संघटना, भाष्यकार व पक्ष बाबासाहेबांच्या ‘पाकिस्तान…’ पुस्तकाचा मुस्लिमविरोधात वापर करतात. त्यातील मुस्लिम (लिग) विषयक चर्चा व मध्ययुगीन इतिहासाचं आकलन मुस्लिमांना झोडपण्यासाठी संघ नेहमी वापरतो. हे करताना बाबासाहेब कसे हिंदुनिष्ठ व मुस्लिमविरोधी होते असं केविलवाणं समर्थन करतो. डॉ. पळशीकरांनी आपल्या लेखनातून क्रमवारपणे अशा प्रत्येक दाव्यांना खोडून काढलं आहे.
हिंदू राष्ट्रवाद्यांनी ‘पाकिस्तान’ पुस्तकातील जी-जी निवडक उतारे उचलून बाबासाहेबांना मुस्लिम-इस्लामविरोधी घोषित केले, त्या प्रत्येक मुद्द्यांना लेखकाने संदर्भासहित खोडून काढलेलं आहे. ही पुस्तिका २००३ साली डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी लिहिलेल्या ‘आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार’ या मीमांसेच्या जवळ जाणारी आहे. त्यात डॉ. तेलतुंबडे यांनी आंबेडकरांच्या नावाने खपविल्या जाणाऱ्या मुस्लिमद्वेषाचा समाचार घेतला आहे.
१९८० नंतर आंबेडकरांना संघ छावणीत खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला. या उपक्रमाचा हेतू दलित समुदाय व मुस्लिम समाजात वितुष्ट निर्माण करणे व दलितांमध्ये (राखीव जागांची) हिंदू मतपेढी तयार करणे असा होता. त्यासाठी आंबेडकरांचं ‘पाकिस्तान’ पुस्तकाचा आधार घेतला गेला. हे करताना आंबेडकर कसे हिदू धार्जिणे आहेत, हे उत्तरोत्तर पटविण्याचा प्रयत्न झाला. हिंदुवाद्यांचा हा दुष्प्रचार अनेक अभ्यासकांनी मोडून काढला आहे. त्यात पळशीकर व तेलतुंबडे अग्रणी ठरतात.
‘पाकिस्तान’ वाचून जेव्हा आंबेडकरांच्या लेखनाचं चिंतन करू लागलो, त्यावेळी मला दोन धुसर रेषा दिसल्या. एक, मध्ययुगीन इतिहासाचं वासाहातिक आकलन आणि दुसरं, तत्कालीन मुस्लिम लिगचं राजकारण याविषयी बाबासाहेबांचं ते चिंतन आहे. त्या पुस्तकाचा मूळ गाभा मुस्लिम लिगच्या फुटीर राजकारणाचा उत्तर देणं असा आहे.
डॉ. आंबेडकरांनी पुस्तकाच्या (पहिली आवृत्ती) प्रस्तावनेत स्पष्टपणे लिहिलं आहे की, सद्यस्थितीत (लिगी) मुस्लिमांच्या (राष्ट्रवादी मुस्लिमांच्या नव्हे) राजकारणाविषयी जे मला वाटते ते मी प्रामाणिकपणे लिहित आहे, जर मी प्रामाणिकपणा दाखवला नाही, तर मी स्वत:शी अन्याय करणारा ठरेल, त्यामुळे जे वाटलं ते स्पष्टपणे लिहीत आहे. (शब्दरचना माझी)
वास्तविक, मुस्लिम लिगविषयी याच प्रकारचं कथन, लेखन, विरोधाचं राजकारण मौलाना आज़ाद, जाकिर हुसैन, हकीम अजमल खान, एम.ए. अन्सारी, हसरत मोहानी इत्यादी राष्ट्रवादी नेत्यांनी आणि पाकिस्तानविरोधी चळवळीच्या संघटकांनी केलं होतं. प्रत्येक वेळी उघड भूमिका घेऊन लिहिलं, बोललं आहे. जाहीर भाषणे दिली आहेत. त्यामुळेच कदाचित बॅ. जिना यांनी मौलाना आज़ाद यांच्याविषयी असंविधानिक भाषा वापरत कठोर शब्दात टीका केली असावी. असो.
डॉ. पळशीकरांनी सदरील पुस्तिकेत वारंवार दाखवून दिलं आहे की, बाबासाहेब मुस्लिमांशी जोडून घेण्याची भाषा बोलत आहेत. त्यांचा रोख फुटपाड्या धर्मवादी प्रवृत्तीविरोधात आहे. त्यातील एक वाक्य असं की, “आंबेडकर सांगतात की या देशातील भूप्रदेशात सांस्कृतिक एकात्मता प्राचीन काळापासून आहे. तिने वांशिक भेदांना दाद दिलेली नाही. ही मलभूत एकी बिघडवण्याचे कारण नाही. आता काही म्हणून ही एकी नष्ट का करावी?”
आंबेडकरांचं मुस्लिमविषयक समग्र आकलन समजून घेण्यासाठी ‘पाकिस्तान’ संदर्भ ठरू शकत नाही, तसेच त्यांना हिंदुत्वनिष्ठ ठरविण्यासाठीही त्याचा आधार घेता येत नाही. त्यात आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, “हिंदू व मुस्लिमांच्या मिश्र पक्षाची स्थापना हाच हिंदू राज्याचं पिशाच्य गाडून टाकण्याचा सर्वांत प्रभावी उपाय आहे.” (पान-३५९)
म्हणूनच हिंदू धर्म आणि मुस्लिम संदर्भातील चिंतनिका समजून घेण्यासाठी केवळ ‘पाकिस्तान’ पुस्तक पुरेसं नाही. तर त्यांचं समग्र लेखन नजरेखालून घालणं क्रमप्राप्त होऊन जातं. ‘जनता’ असो ‘बहिष्कृत भारत’, ‘प्रबुद्ध भारत’ पत्रातील लेख असो वा स्फूट, त्यांची भाषणं, संपादकीय टिपणं वाचली तरीही हा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होतो.
वाचा : महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान
पाकिस्तान पुस्तकाचा संदर्भ
आंबेडकर मुस्लिम प्रश्नावर हिंदुत्ववाद्यांसारखा विचार करत होते असा संघाचा प्रचार असतो. परंतु संघ बाबासाहेबांच्या विस्तृत भूमिकेवर दुर्लक्ष करतो. लेखक म्हणतात की, पाकिस्तान पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत बाबासाहेबांनी आणखीन एक प्रकरण जोडलेलं आहे. त्यात अल्पसंख्यांकांच्या अधिकाराबद्दल व दलित मुस्लिम राजकारणाबद्दल विस्तृत विवेचन केलेलं आहे. पळशीकरांनी या नव्या आवृत्तीतील आशयाचा विस्ताराने विश्लेषण केलेलं आहे. आंबेडकरांच्या मुस्लिमविषयक अनेक शंका काळाच्या ओघात, अनुभवानेच चुकीचं असल्याचं दाखवून दिलं, त्यावरून आंबेडकरांचं या प्रश्नांचं त्या काळातील आकलन काळजीपूर्वक तपासून पाहायला हवं असं कोणीही अभ्यासकाला वाटेल.
लेखकांच्या मते, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर जवळपास अर्ध्या शतकानंतर आंबेडकरांचं १९२० आणि १९४० या काळातील मूल्यमापनावर आधारित विश्लेषण मुस्लिम प्रश्नाला लागू पडते का, हा प्रश्नही एखादा पडेल. परंतु असे प्रश्न हिंदू राष्ट्रवादांना पडत नाहीत. याचं कारण स्पष्ट आहे की, संघाने सोयीचे आंबेडकर उचललेले दिसतात. धर्मांतराच्या घोषणेनंतर आंबेडकरांच्या हिंदू धर्माविषयी बदललेल्या भूमिकेवर हिंदुत्ववादी गप्प राहतात.
हिंदुत्ववाद्यांच्या मुस्लिमाविषयीच्या आकलनाला उत्तर देताना लेखकाने ‘पाकिस्तान’ पुस्तकाव्यतिरिक्त संदर्भ दिलेले आहेत. किंबहुना ‘पाकिस्तान’ या पुस्तकातही आंबेडकर मुस्लिम जनतेचं किंवा राजकारण राजकीय नेत्यांचे स्वनिर्णयाचे तत्त्व मान्य करतात. देशातील मुस्लिमांमध्ये एक- राष्ट्रीयत्वाची भावना असेल तर स्वनिर्णयाच्या तत्त्वाच्या आधारे त्यांना आपले भवितव्य ठरवू दिले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. परंतु हिंदुत्ववादी या भूमिकेचा साधा उल्लेखही करीत नाहीत याउलट मुस्लिम समाज हिंस्र, रानटी, आक्रमक वगैरे आहे, अशा प्रकारची मांडणी सातत्याने करीत राहतात, अशी खंत पळशीकर व्यक्त करतात.
हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिमांचे दोषारोपण करताना ‘पाकिस्तान’ पुस्तकातील मुस्लिम समाज किंवा राजकारणाबद्दल आंबेडकरांनी सर्वांगीण चर्चा केलेली आहे; ते व मुस्लिमहिताचे युक्तिवाद हिंदुत्ववादी बाजूला ठेवतात किंवा सोयीने बाजुला करतात, असं पळशीकर ठामपणे म्हणतात.
पळशीकर लिहितात, “मुसलमानांचा आक्रमकपणा, मागसलेपणा यांच्यावर टीका करणारे आंबेडकर हिंदुराष्ट्राचा एवढा कठोर प्रतिवाद का करतात? हिंदूंचे राज्य म्हणजे तत्त्वतः तर समतेचा अभाव असेलच पण व्यवहारतः मुस्लिम, शीख यांच्याबरोबरच कनिष्ठ जातीयांची विशेषतः अस्पृश्यजातींची- त्या राज्यात गळचेपी असेल असा आंबेडकरांचा निष्कर्ष होता. आंबेडकर मुस्लिमांविरूद्ध काही लिहितात म्हणून ज्यांना गुदगुल्या होतात त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की हिंदूंच्या 'कम्युनल मेजारिटी'च्या संदर्भात आंबेडकर इतर अल्पसंख्यांचा - मुस्लिम, अनुसूचित जाती यांचा - एकत्रच विचार करतात.” (पान-३६)
पुढे पळशीकर लिहितात, “१९२९ मध्ये अस्पृश्यांना प्रबळ समाजाचे पाठबळ हवे म्हणून मुस्लिम धर्मात जाता येईल असेही आंबेडकर सूचित करत आहेत. मग या काळातील आंबेडकरांच्या लेखनावरून मुस्लिम प्रश्नावर हिंदुसंघटन हे त्यांचे उत्तर कसे काय ठरते? फार तर असे म्हणता येईल की या काळातील आंबेडकरांची भूमिका अंतिम नव्हती, संदिग्ध होती, एकाच वेळी सवर्णांना 'धर्मबंधू' मानणारी पण त्यांना धडा शिकविण्यासाठी मुस्लिम धर्मात जावे म्हणणारी अशी ही भूमिका होती. या काळात आंबेडकरांचे अनेक प्रश्नांवरील चिंतन हे संकीर्ण, सुटे-सुटे होते. त्यामुळे प्रसंगी यात विसंगतीही येऊ शकते. पण आपल्या अनुयायांना मुस्लिम धर्म स्वीकारायला सुचविणारी व्यक्ती हिंदू संघटनेद्वारे मुस्लिम प्रश्न सोडवू पाहत होती, हा दावा टिकू शकणारा नाही.” (पान-२७)
हिंदुकरणाचे प्रयत्न
लेखकाने या दीर्घ निबंधातून हिंदुवाद्यांकडून आंबेडकरांचं होणारं अपहरण व संघाच्या अर्धसत्याची यथार्थ मीमांसा केली आहे. शेषराव मारे, स.ह. देशपांडे, अशोक मोडक या हिंदुत्वनिष्ठ लेखकांच्या आंबेडकर विचारांना भ्रमित करणाऱ्या लेखनाची चिरफाड करण्याचा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर लेखकाने ज्या तथाकथित दलित विचारवंतानी बाबासाहेबांना हिंदुनिष्ठ घोषित केलं, ज्यांनी ‘रामशक्ती’-‘भीमशक्ती’ प्रयोग राबविला त्यांचाही येथेच्छ समाचार घेतलेला आहे.
पळशीकरांनी या ४० पानी दीर्घ निबंधात क्रमवारपणे संघाच्या अनेक दाव्यातील फोलपणा उघडकीस आणलेला आहे. सुरुवातीला लेखक आंबेडकरी चळवळीतील संघाने हाताशी घेतलेल्या दलित विचारवंताचा समाचार घेतात. त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात गंगाधर पानतावणे यांच्या आंबेडकरांच्या हिदुनिष्ठ असण्याच्या दाव्यातील गफलती उघडकीस आणल्या आहेत.
लिहितात, “आंबेडकरांचा आज गौरव करणाऱ्या माणसांचे/संस्थांचे इतर समाजकारण-राजकारण काय आहे, याची दखल न घेता त्यांना समतावादी मानणे ही न-राजकीय (अ-पोलिटिकल) भूमिका आहे आणि पानतावणे यांच्यासारखे विचारवंत अशी भूमिका घेतात ही वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीमुळे आंबेडकर आणि हिंदुत्ववाद यांच्या समन्वयाला प्रतिष्ठा प्राप्त होते. हा त्यातील धोका आहे.” (पान-१५)
पळशीकरांनी पुढे गोळवलकरी विचार, संघाची समरसता इत्यादींची पोलखोल केलेली आहे. लेखक संघाच्या जातिसंबंधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. म्हणतात,
“संघाला जातिभेद मान्य नाही किंवा संघात जातिभेद नाही एवढेच आंबेडकर आणि संघ यांच्या समन्वयासाठी पुरेसं नाही. संघ जातिसंस्थेच्या निर्मूलनासाठी विशेष प्राधान्य देत नाही आणि जातिसंस्था हा हिंदुधर्म विचाराचा अपरिहार्य भाग आहे. ही आंबेडकरकृत चिकित्सा हिंदुत्वविचाराला मान्य नाही. स्वाभाविकच हिंदुधर्मतत्त्वज्ञानाचा त्याग केल्याशिवाय जातिसंस्थेच्या निर्दालनासाठी अनुकूल मनोभूमिका तयार होणार नाही हा आंबेडकरांचा विचार हिंदुत्ववाद्यांच्या पचनी पडणे अवघडच आहे.”
बाबासाहेबांचं धर्मांतर ही हिंदुत्वविचारांची सर्वांत मोठी अडचण आहे, असं पळशीकर म्हणतात. धर्मांतरापूर्वी आंबेडकर हिंदू धर्मांतर्गत सुधारणा घडवून आणून हिंदू समाजाचं संघटन करू पाहत होते. त्यातून जातिवर्णव्यवस्थेला व अस्पृश्यतेला थारा नसेल अशा प्रकारच्या समाजाची निर्मिती करण्याची त्यांची कल्पना होती. यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. परंतु अपयश आल्याने त्यांनी १९३५ साली धर्मांतराची घोषणा केली.
या घोषणेपूर्वीची हिंदू धर्माविषयीची बाबासाहेबांची भूमिका व नंतर अजून अधिक टोकदार झालेली हिंदू धर्मचिकित्सा असे दोन भाग करून लेखक संघाची हातचलाखी उघडकीस आणतात. लेखकाने १९३५ पूर्वीचे आणि नंतरचे आंबेडकर अशी विभागणी करून हिंदुत्ववाद्यांच्या प्रत्येक बुद्धिभेद व युक्तिवादाचे खंडनमंडन केलं आहे. शिवाय संघाच्या भ्रमाचा बोपळादेखील फोडला आहे.
लेखकाच्या मते, “आंबेडकर ज्या काळात हिंदुसंघटनाचा काही ठिकाणी पुरस्कार करताना दिसतात त्याच काळात हिंदुसंघटनवाद्यांवर आणि हिंदुसंघटनाच्या उद्दिष्टांवर कठोर टीका करताना दिसतात. त्यामुळे आंबेडकर हिंदुसंघटनांचा पुरस्कार करत होते असे निर्णायकपणे म्हणता येणार नाही. फारतर असे म्हणता येईल की हिंदुसंघटनाच्या चळवळीतून अस्पृश्यता नाहीशी व्हायला काही हातभार लागतो का याची ते चाचपणी करीत होते.” (पान-२८) लेखकाच्या मते, हिंदुत्ववादी आंबेडकरांच्या या भूमिकेकडे सोयीने दुर्लक्ष करतात.
पळशीकर म्हणतात, “१९३० पूर्वी बाबासाहेबांची भूमिका अस्पृश्यता सोडली तर हिंदू धर्माशी काही देणे घेणे नाही अशी काहीशी होती. पुढे मात्र अस्पृश्य नव्हे तर सर्वांसाठीच हिंदू धर्म धोकादायक आणि अन्यायकारक आहे या भूमिकेवर आंबेडकर आले. ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ (अॅनिहिलेशन ऑफ कास्ट) हे पुस्तक त्याचा उत्तम नमुना आहे.”
वाचा : सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?
सर्वसंमतीची कुरघोडी
रामजन्मभूमी आंदोलनानंतर देशातील संपूर्ण राजकारण बदलून गेलं. ओबीसींच्या शैक्षणिक व राजकीय हक्काच्या मागणीने धर्म संकटात आल्याची बतावणी करण्यात आली. या आंदोलनानंतर देशात हिंदू विचांराची विश्वाहर्ता वाढली असं पळशीकर सांगतात. त्याचवेळी आंबेडकर व अन्य परिवर्तनवादी विचारवंताचे महात्म्य मान्य केल्यामुळे हिंदुत्वादांची समाजातील स्वीकार्हता वाढली. त्याला जोड म्हणून दलित व कनिष्ठ जातीमधील विचारवंतांनी हिंदुत्ववाद्यांच्या या कृत्यांची भलामण केली.
आंबेडकरांच्या नामजपाने सामाजिक संमतीचे क्षेत्र वाढीस लागले. या व्यूहरचनेमुळे सरकार आणि मुस्लिमविरोधात प्रत्यक्ष लढाई करायला बहुजन समाजातील सैन्यदलही उपलब्ध झाले. एकूणच समाजाच्या सांस्कृतिक वैचारिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा वाढावी आणि विविध हिंदू समूहामध्ये स्वीकार्हता वाढावी यासाठी आंबेडकर आणि फुले वगैरेंच्या प्रतीकांचा हिंदुत्वद्यांनी उपयोग करून घेतला, असं पळशीकर पटवून देतात.
हिंदुत्ववाद्यांनी ज्योतिबा फुलेंना मतपेढीच्या प्रक्रियेतून वगळले त्याचं कारण देताना पळशीकर म्हणतात, फुले आणि ब्राह्मणावरील रोखठोक टीका आणि मुस्लिमाबद्दलचे कौतुक यांचा हिंदुत्वादाशी कसा मेळ घालायचा हे न उमजल्यामुळे तसे झाले.
पुस्तिकेच्या शेवटी पळशीकर बाबासाहेबांच्या अपहरणामागे संघाच्या कुरघोड्या उघड करून सांगतात. आंबेडकरांच्या विचारांची धार कमी करण्यासाठी आणि त्यांचा मूलगामी विचार पातळ करण्यासाठी त्यांना हिंदुत्वाच्या चौकटीत बसवलं जातं, असं लेखक विवेचनाअंती सिद्ध करतात. आंबेडकरांचे तथाकथित हिंदुत्व विचारांच्या समन्वयाने सामाजिक संमतीचे क्षेत्र वाढवणे आणि आंबेडकरांच्या विचारांचा मूलग्राही आशय बाजूला सारणे अशी दोन उद्दिष्टे या अपहरणामागे असावी, असं लेखकाला वाटते.
आंबेडकर विचारांची सौम्य स्वरूपात मांडणी केल्यामुळे उच्चवर्णियांच्या लेखी आंबेडकर हे एक प्रतीक म्हणून जास्त स्वीकारहार्य होतील. त्याचप्रमाणे हिंदुत्ववाद्यांनी आंबेडकरांना आपलेसे केल्याने उच्चावर्णीय मध्यमवर्गीयांची अपराधभावना थोडी सौम्य होऊन आपण सामाजिक समतेला अनुकूल आहोत अशी भावना त्यांच्या निर्माण होणे शक्य आहे, असा मानस लेखक व्यक्त करतात.
वैचारिक नेतृत्वाच्या अपयशामुळे आंबेडकरांच्या हिंदू करण्याचा भ्रमविचार पसरविण्यास हातभार लागतो. दलित विचारवंतांचा बुद्धिभेद ही आंबेडकरांच्या हिंदुकरणाच्या योजनेतील एक मोठे आव्हान आहे, असं लेखक सूचित करतात.
शेवटी लेखकाने आंबेडकरांच्या अपहरणापासून वेगवेगळे धोके आणि त्याची विघातकी परिणामकारकतेची शक्यता वर्तवली आहे. एके ठिकाणी ते म्हणतात, “हिंदुत्ववाद्यांचा प्रचार आणि आंबेडकर हिंदुत्वाला अनुकूल होते या मांडणीचा दलित समाज आणि दलित चळवळ यांच्यावर प्रभाव पाडू शकते. विशेषतः मुस्लिम समाजाविरुद्ध दलित समाजाला उभे करण्यात जर हिंदुत्ववाद्यांना यश आलं तर आंबेडकरांच्या अपहरणाच्या प्रक्रियेला वेग येऊ शकेल. हिंदुत्वाकडे आकर्षित होणाऱ्या दलितांना आंबेडकरांचे धर्मांतर म्हणजे हिंदू चौकटीत राहणेच असे सांगून आंबेडकरांच्या मूलगामी वारशापासून तोडण्याचा प्रयत्न झाला तर त्यापासून हिंदुत्ववाद्यांना मोठा फायदा मिळू शकेल.” (पान-३०)
संघाच्या या दुष्कृत्याचा कसोशीने विरोध करायला हवा, असा सूचनावजा इशारा लेखकाने जाता जाता दिलेला आहे. तसंच आंबेडकरांना संघाच्या अपहरणातून सोडविण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न व्हायला हवे शिवाय लेखक-विचारवंतांनी त्यावर प्रखर भूमिका घेण्याची गरजही लेखक व्यक्त करतात.
अशा स्थितीत डॉ. आंबेडकर हिंदुत्व समर्थक होते, या विधानाशी संमती दर्शवताना किंवा त्यास भूलून जाताना इतिहासही तपासून पाहिला पाहिजे. इतिहासाच्या विकृतीकरण व विद्रुपीकरणाच्या काळात आंबेडकरांच्या इतिहासाशी छेड केली गेली असेलच! हा विचारही करणं क्रमप्राप्त ठरतं. स्वत:ची बौद्धिक क्षमता प्रचारी लेखनाला शरणागत होण्याऐवजी आपलं अभ्यासू सामर्थ्य टिकवून ठेवणारे लेखन नजरेखालून घालावं. महामानवाचं अपहरण व त्यांच्या इतिहासाचं विद्रूपीकरण टाळण्यासाठी सदरहू व्यक्तीचे मूळ लिखाण वाचणं आणि त्याचा संदर्भ मान्य करणे कधीही उत्तम होय.
.......
पुस्तिकेचं नाव : चिकित्सा डॉ. आंबेडकरांच्या हिंदुकरणाची
लेखक : डॉ. सुहास पळशीकर
प्रकाशक : हरिती प्रकाशन, पुणे
पाने : ४०
किंमत : ५० रुपये
.....
कलीम अज़ीम, पुणे
१५ ऑक्टोबर २०२४
मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com