महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान

जोतिबा फुले आणि (सर) सय्यद अहमद खान हे समकालीन होते. खान साहेब जोतीरावांपेक्षा वयाने १० वर्षांनी ज्येष्ठ होते. दोघेही कर्ते सुधारक. समाजाने व धर्मवाद्यांनी दोघांचाही छळ केला. दोघेही ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचे हितचिंतक.. दोघेही १८५७च्या उठावाचे विरोधक! दोघांमध्ये एक समान धागा म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलं आहे.

फुले-खान प्रभुतींना वाटत होतं की, भारतीय समाजाने वर्षानूवर्षांचे सामाजिक रुढी-परंपराचं जोखड बाजुला सारून नवा सामाजिक विचार स्वीकारावा. बदलत्या राजकीय व्यवस्थेत शासकीय सवलतींचा आधार घेऊन आर्थिक व सामाजिक प्रगती साधावी. समाजाची सर्वांगीण उन्नती हे दोघांचेही एकमेव उद्दीष्ट होतं. त्यासाठी आधुनिक शिक्षणाचा मार्ग त्यांना दिसला. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात या विभूती पुरुषांनी उल्लेखीय भूमिका बजावली

शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय समाजाने इंग्रजी सत्तेची व युरोपमधील ‘रेनसां’शी स्पर्धा करावी, अशी कल्पना दोघांनी रंगवली व ती प्रत्यक्षात आणून दाखवली.

दुर्दैवाने महात्मा फुलेंच्या शिक्षण कार्याला संस्थीकरणाचं स्वरूप येऊ शकलं नाही. त्याची वेगवेगळी कारणं होती. त्यातील प्रमुख म्हणजे त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला दिलेला हादरा व ब्राह्मणेत्तर चळवळीचं केलेलं बीजारोपण होय. परिणामी फुलेंच्या शिक्षण संस्था-विद्यालये काळाच्या ओघात नामशेष झाली. आज त्यांनी स्थापलेल्या शाळा-विद्यालये शोधूनही सापडत नाहीत.

सय्यद अहमद खान यांनी निर्मिलेल्या शाळा-कॉलेज मात्र आजही सुस्थितीत आहेत. १८५८ साली मुरादाबादला आधुनिक पाठशाळेची मुहुर्तमेढ रोवली. पुढे १८७५ला त्यांनी ‘मोहमेडेन अग्लो ओरिएंटल कॉलेज’ची स्थापना केली. नंतर तो शिक्षणाचा प्रचंड मोठा वटवृक्ष झाला. त्याचं संस्थीकरण होऊन त्याला केंद्रीय विद्यापीठाचं स्वरूप आलेलं आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठ असा तो बलाढ्य शैक्षणिक वारसा आहे.

वाचा : पोलीस अॅक्शनचा वस्तुनिष्ठ इतिहास : दोन मुलूख एक कहाणी

वाचा : हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी

फुले व सय्यद अहमद खान यांच्या सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमीत जमीन-आस्मानचं अंतर होतं. फुले सामान्य शेतकरी, कष्टकरी कुटुंबातून पुढे आले. तर खान यांचं कुटुंबीय वर्षानूवर्षे शासकीय लाभ-सवलती मिळवलेले प्रस्थापित कुटुंब होतं. त्यांना सामाजिक व सांस्कृतिक वारसा होता. त्यांचं पूर्वज मुघल शासकांच्या दरबारात उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांनी आपलं वंशमूळ अरबस्थानातील घराण्याशी जोडलेलं होतं. परिणामी त्यांच्या व्यवहार-जगण्या-बोलण्यात अभिजन जाणिवेची अर्थातच वर्णश्रेष्ठत्वाची किनार चिकटली होती. ते समृद्ध सामाजिक श्रेष्ठता लाभलेल्या कुटुंबातील सदस्य होते.

खान साहेबांना वैयक्तिक विकास व सामाजिक व सांस्कृतिक विचारांच्या उत्थानासाठी अनुकूल वातावरण लाभलं. त्यांचं शिक्षण विलायतमधून झालेलं होतं. ते जेव्हा बरिस्टर होऊन मायदेशी परतले त्यावेळी इथल्या जमीनदार वर्गाने, अभिजन समाजाने त्यांचे भले-मोठे सत्कार सोहळे आयोजित केले होते. धनाड्य-धनिकांच्या मैफलीत त्यांचं उठणं-बसणं होतं. ते उच्च बौद्धिक प्रतिभेचे धनी होते. धर्मतत्वज्ञान, विधीसंहिता, इतिहास व आधुनिक समाजशास्त्राचं ज्ञान त्यांच्याकडे होतं.

उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकारी व सनदी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांची मैत्री होती. एलिट क्लासचं राजकारण ते करीत होते. ब्रिटिश सरकारने काँग्रेस विरोधाचं राजकारण सुरू केलं, त्यावेळी खान साहेबांची त्यांना मोलाची मदत झाली. न्यायाधीश-दंडाधिकारी पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ सामाजिक सुधारणा कार्यात स्वत:ला वाहून घेतलं. परंपरावादाने लादलेल्या रुढी-प्रथेवर त्यांनी प्रहार चढवला. धर्माच्या ऐहिक तत्त्वज्ञानाची नवीन व्याख्या केली.

फुलेंचा संघर्ष बालपणीपासून सुरू होता. त्यांच्या शिक्षणाला पुरोहितवादाने बंदी आणली होती. तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं. सुधारकी विचार आत्मसात केल्याने त्यांना घर-दारावर पाणी सोडावं लागलं. त्यांचा लढा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात होता. जातिभेद व वर्णश्रेष्ठत्ववाद्यांशी त्यांनी दोन हात केले. धर्मवादाने लादलेली गुलामगिरी व दास्यप्रथेविरोधात त्यांनी मानवमुक्तीचा संदेश दिला.

श्रमिक, कष्टकरी, मजूर व कृषक समाजाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. शोषित-पीडित समाजाच्या बौद्धिक विकासासाठी त्यांनी शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं. त्यासाठी त्यांना ब्राह्मणी वर्णवादी आणि परंपरानिष्ठ समाजाशी प्रचंड संघर्ष करावा लागला.

शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याच्या कार्यात फुले-खान प्रभृतींना प्रचंड अडथळे आले. सर्वहितार्थ सुरू केलेल्या या कार्यात त्यांना प्रारंभी समाजाचं सहकार्य लाभलं नाही. फुलें दाप्त्यांवर दगडांचा मारा झाला. ज्ञानदानाच्या क्षेत्रात त्यांना प्रचंड सामाजिक संघर्षाला तोंड द्यावं लागलं.

खान साहेबांनी जेव्हा आधुनिक शिक्षणाचा आग्रह धरला तेव्हा समाजाने त्यांची नालस्ती केली. धर्मवाद्यांनी अवहेलना केली. त्यांची सार्वजनिक थट्टा केली गेली. दगडगोटे त्यांच्या भिरकावले गेले. निधीसंकलनाच्या झोळीत दगडं टाकली गेली. ज्ञानदानाच्या कार्यासाठी त्यांनी झोळी घेऊन भीक मागितली.  

समाज शिक्षित व्हावा, यासाठी दोघेही ‘हंटर कमिशन’पुढे हजर झाले. इथं मात्र दोघे परस्परविरोधी भूमिकेत येतात. खान साहेबांनी अभिजन वर्गाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला तर फुलेंनी बहुजन समाजाच्या सामाजिक-आर्थिक उद्धारासाठी शिक्षणाचं सार्वजनीकीकरण महत्त्वाचं मानलं.

जोतिबा फुलेंनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. सुरुवात त्यांनी आपल्या घरातून केली. पत्नीला साक्षर केलं व पत्नीकडून मुलींच्या शिक्षणदानाचं महत्कार्य घडवून आणलं. एकानंतर एक शाळा स्थापन केल्या. खान साहेबांनी मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध दर्शवला. मुलींनी चूल आणि मूल सांभाळावं या विचारांचे ते होते. स्त्रीने मुला-बाळांना संस्कारक्षम करावं, अशी त्यांची समजूत होती. शिक्षण वरीष्ठवर्णियांना मिळायला पाहिजे, असा त्यांचा अनाठायी आग्रहा होता. मागास, कास्तकार, कष्टकरी, श्रमिक व बलुतेदारीतील मुस्लिमांच्या शिक्षणाला त्यांनी विरोध दर्शवला.

जोतीराव फुले यांना ब्रिटिशांच्या सत्ताकाळात सुरू झालेल्या मिशनरी शिक्षणाचा लाभ मिळाला होता. आधुनिक शिक्षण एका अर्थाने त्यांच्या मुक्तीचं साधन झालेलं होतं. हे अमृत बहुजन समाजाला लाभले तर धर्मवाद तथा पुरोहितशाहीने लादलेल्या गुलामगीरीतून मुक्ती मिळेल, असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी युरोपियन ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ राहून भारतीय समाजाने नवा विचार स्वीकारावा, सामाजिक सुधारणा घडवून आणाव्या, असा उपदेश केला. वेळेप्रसंगी त्यांनी ब्रिटिश सत्तेची जुलुमी वृत्ती, छळ-अन्यायाकडे दुर्लक्ष केलं.

वाचा : रफीक झकेरिया : एक सुलझे हुए राजनितिज्ज्ञ

वाचा : मौलाना आजाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया

खान साहेबांनी सामाजिक प्रबोधन व शैक्षणिक उत्थानाचा विचार १८५७च्या विद्रोहाच्या पार्श्वभूमीवर मांडला होता. बंडात इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा उभारणाऱ्या अनेक मुसलमानांचं शिरकाण करण्यात आलं. धार्मिक विद्वान व बुद्धिजीवींना फासावर लटकवण्यात आलं. ब्रिटिशांचं फुटपाडू धोरण आणि संधीसाधू राजे-रजवाड्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीने त्यांच्याविरुद्ध शत्रुभावी राजकारण उभं झालं होतं. ब्रिटिश राज्यव्यवस्थेला मुसलमानांचा धोका वाटू लागला होता. पुन्हा बंडाचं निशाण उभारू नये, यासाठी सर्वच पातळीवर मुसलमानांना जेरबंद करण्यात आलेलं होतं. धार्मिक अस्तितेवर घाला घातला गेला होता. अशा स्थितीत आर्थिक व सामाजिक विकासासाठी खान साहेबांनी इंग्रजी शिक्षणातून व्यापक सक्षमीकरणाचा विचार मांडला. त्यांनी बंडाच्या स्थितीला वेगवेगळ्या कारणांना दोषी धरलं होतं. १८५७चे बंड आणि त्याची कारण मीमांसा नावाची पुस्तिका लिहून त्यांनी लंडनच्या राणीला पाठवली.‌ त्यात बंडाची वस्तुनिष्ठ कारणे व सद्यस्थिती नोंदवलेली होती. हे पुस्तक पाहून ब्रिटिश सत्तेला विद्रोहाची पार्श्वभूमी कळली. परिणामी त्यांचं शत्रुभावी राजकारण काहीअंशी शिथिल झालं. खान साहेबांचं हे क्रांतिकार्य होतं. त्यावरून त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला. त्यांच्यापुढे उदात्त भविष्यकाळ होतं. त्यामुळे त्यांनी टीकेला सहज स्वीकारलं.

महात्मा फुलेंपुढील आव्हाने मात्र फार वेगळी होती. हजारों वर्षापासून गुलामागीरीत खितपत पडलेल्या समाजाचे सार्वत्रिक उद्धार हे त्यांचं ध्येय होतं. त्यासाठी त्यांनी सरकारशी एकनिष्ठ राहम्याचा निर्णय गेतला होता. त्यांनी भटपांड्यांचे बंडम्हणत या विद्रोहाची संभावना केली. त्याचा धिक्कार केला. नानासाहेब, तात्या टोपे या बंडवाल्यांच्या पुढाऱ्यांचे त्यांनी वाभाडे काढले.

बंडात पुण्यात गणू माळी आणि मौलवी नुरूल हुदा यांना पकडून शिक्षा फर्मावण्यात आली होती. हे दोघेही जोतिरावांच्या मित्र परिवारातील होते. त्यामुळे ब्रिटिशांच्या मनात जोतीरावांविषयी संशय उत्पन्न झाला. नेमकं हेच खान साहेबांविषयी घडलं होतं. बंडात कंपनी सरकारच्या प्रतिकार मोहिमेत खान साहेबांचं कुटुंबीय मारलं गेलं होतं. त्यांचे अनेक निकटवर्तीय विद्रोहात सामील होते. परिणामी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खान साहेबांविषयी संशय निर्माण झाला होता. अशावेळी खान साहेबांनी उपरोक्त पुस्तिका लिहून बंडाची कारणमीमांसा स्पष्ट केली. या बंडाचा सर्वाधिक आघात खान साहेबांना झाला होता. त्यांनी कंपनी सरकारची सुडनीती आणि प्रत्यक्ष रंक्तरंजित परिस्थिती पाहिली होती. त्यातून समाज बाहेर पडावा व त्याने आर्थिक-शैक्षणिक उद्धार साधावा असा प्रयत्न त्यांनी सुरू केला.. त्यातूनच त्यांनी शिक्षण दानाचं कार्य सुरू केलं.

फुलेंची भूमिकाही अगदी स्पष्ट होती. त्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षणाचं कार्य हाती घेतलं होतं. खान साहेबांनी अभिजन मुस्लिमांच्या आत्मप्रौढी इतिहासाचं दाखले देत रमणीय भूतकाळ परत आणायचा होता. त्यांना वरीष्ठ वर्णियांचा सामाजिक व शैक्षणिक विकास अभिप्रेत होता. परंतु अंजुमन इस्लाम संस्थेचे संस्थापक बदरुद्दीन तय्यबजी यांना मध्ययुगीन इतिहासात रमलेल्या समाजाला वर्तमान काळात आणायचं होतं. हंटर कमिशनपुढे मुस्लिमांच्या शैक्षणिक अनास्थेला इतिहासाचं ओझं हे प्रमुख कारण त्यांनी दिलं होतं. 

तय्यबजी व्यवहारवादी होते. खान साहेब मात्र सांस्कृतिक वर्चस्ववादाने पछाडलेले होते. पूर्वजांच्या समृद्ध ऐतिहासिक वारशांची प्रस्थापना करण्यासाठी त्यांनी इतिहास सोसायटीची स्थापना केली होती. काँग्रेसशी अंतर राखावं असा संदेश त्यांनी जनसमुदायाला दिला होता. याउलट तय्यबजी मुसलमानांनी काँग्रेसशी जोडून घ्यावं असं म्हणणारे होते. खान साहेब व तय्यबजी यांच्यातील हा वाद टोकाला गेला होता. त्यातील तात्विक फरक इतकाच की खानसाहेब ब्रिटिशांशी मैत्रीपूर्व संबंध प्रस्थापित करून सामाजिक विकास घडवू पाहत होते.

त्याचवेळी जोतीराव भेदरहित मानवी जग उभा करायचा प्रयत्न करत होते. खान साहेब जुना ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्याच्या प्रक्रियेत ओढले गेले. फुले इतिहासाचा वर्तमानाशी संबंध जोडण्यात यशस्वी झाले, खान साहेब मात्र हे करू शकले नाहीत.

वाचा : डावी चळवळ आणि दुर्लक्षित मुस्लिम

वाचा : इतिहास व त्याच्या लेखनाची साधने

फुलेंचा सामाजिक विचार बहुजनांच्या आर्थिक-सामाजिक उद्धारासाठी होता. तर खान साहेबांना अभिजन वर्गाला श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी त्यांना शिक्षण देऊ करत होते. शोषित, मागास मुस्लिमांचा कल्याण त्यांच्या शिक्षणविचारात नव्हते.. फुले मात्र बहुजन कल्याण हे एकमेव ध्येय घेऊन कृतिशील झाले होते.

फुलेंनी इतिहासाचे वर्तमान संदर्भ सांगितले, त्यातून बहुजन समाजाचा आर्थिक-सामाजिक व सांस्कृतिक उद्धार घडू शकला.. सर सय्यद ते करू शकले नाहीत.. शासनसंस्थेशी मैत्रीचे संबंध राखण्याकरिता त्यांनी वर्ण श्रेष्ठत्व मिरवणारी उच्चशिक्षित पिढी तयार केली.. वरिष्ठ वर्णियांचं राजकारण केलं. राष्ट्रीय चळवळीशी अंतर राखलं. ब्रिटिश धार्जिण्या राजकारणाला खतपाणी घातलं. त्यातून उच्चवर्णीय अभिजन वर्गाचं राजकारण करणारी पिढी उदयास आली. या घटकानेच पुढे मुस्लिम लीगचं विघटनवादी राजकारणाची मुहुर्तमेढ भारतात रुजवली.

महात्मा फुलेंच्या विचार परंपरेतून महर्षी शिंदे, आंबेडकर, पेरियार उदयास आले. त्यांनी बहुजन समाजाचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणला. शासन संस्थेची मैत्रीपूर्व संबंध प्रस्थापित करून सामाजिक विकास घडवून आणला. आंबेडकरांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीची बेड्या या मैत्री पर्वातूनच सोडवल्या. व एका मोठ्या समाजघटकाला मुक्य प्रवाहासी जोडले. हा वर्ग हजारों शतकं मानवी हक्कापासून वंचित होता. शिक्षण व सामाजिर प्रतिष्ठेपासून लांब होता. अशा दुर्बल, शोषित व पीडित घटकांच्या सामाजिक उद्धार आंबेडरांनी घडवला. त्याची जमीन फुलेंनी तयार करून ठेवली होती.  

फुले आणि खान साहेबांच्या कार्याचं महत्त्व काळाने सिद्ध केलं आहे. आज त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करताना ज्योतिबा फुले अधिक उजवे ठरतात.

पुण्यतिथी दिनी ज्योतिबांस अभिवादन..

कलीम अज़ीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,37,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,292,व्यक्ती,17,संकलन,61,समाज,246,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान
महात्मा फुले आणि सर सय्यद अहमद खान
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxN5c6kxfFPyzR6rdrheGfmiit0yCcGwrCvT0UV5gBh4UEGDihegJB472QhYHliDvTWbdQxpDjnl6AriDdxcoe0O-MUbCDr6llaoStQZXeZrwTBejH0pzDfkjIXdCyDxevqj-YTz8x3JpM3VmlgLfwSpP9Zio2QG5zRUtrPvsbMLY5Jeu9kVEz47oZ01uP/w640-h368/468622639_1105659894898217_6023342193080633536_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxN5c6kxfFPyzR6rdrheGfmiit0yCcGwrCvT0UV5gBh4UEGDihegJB472QhYHliDvTWbdQxpDjnl6AriDdxcoe0O-MUbCDr6llaoStQZXeZrwTBejH0pzDfkjIXdCyDxevqj-YTz8x3JpM3VmlgLfwSpP9Zio2QG5zRUtrPvsbMLY5Jeu9kVEz47oZ01uP/s72-w640-c-h368/468622639_1105659894898217_6023342193080633536_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/11/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/11/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content