वास्तविक, ही मोहीम सत्तास्थापनेच्या चर्चेपासूनच सुरू झालेली होती. पण
मध्येच अजित पवार यांनी फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत भाजपला जवळ केलं. भल्या
पहाटेच ‘देवेंद्राभिषेक’ घडवून आणत स्वत: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा चार-पाच
दिवसांचा कालावधी काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेसाठी संक्रमणाचा होता.
राष्ट्रवादीच्या समर्थकात दोन गट पडले, एकाने भाजपचे गुणगान केलं तर दूसरा
अजित पवार यांना विश्वासघातकी, शत्रू, लंका जाळणारा रावण,
राक्षस दगाबाज अशा विविध बिरुदावली देत होता. हा काळ महाविकास
आघाडीच्या सत्ताकारणी धर्मनिरपेक्षतेची कसोटी पाहणारा होता. पण ही संक्रातही निघून
गेली.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यानंतर सेनेला
धर्मनिरपेक्ष दल सिद्ध करण्याला गती मिळाली. सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांची
त्यासाठीची केलेली धडपड डोळ्यात भरणारी आहे. इतकेच नाही तर सुधारणावादी किंवा प्रागतिक
संघटकांनीदेखील त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून आले.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याचा व सत्ता संपादनाच्या
हर्षोल्हासात शिवसेनेच्या हिंदुत्ववादाच्या कट्टरतेला डोळ्याआड केलं जात आहे.
परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या सरकारची समीक्षा फारशी होताना
दिसत नाही. तटस्थ म्हणवणारे पत्रकार व समीक्षक आणि विश्लेषकही भाजपला सत्तेसापासून
दूर ठेवल्याचा आनंद साजरा करत आहेत. त्यामुळे या ‘अभद्र युती’ची समीक्षा करणे गरजेचं होऊन जातं.
ज्या पद्धतीने आणीबाणीनंतर जनता दलप्रणित
गैरकाँग्रेसी राजकीय पक्षांनी जनसंघाशी युती करून हिदुत्ववाद्यांना (आरएसएस)
समाजमान्यता मिळवून दिली, अगदी त्याच
पद्धतीने सध्या शिवसेनेला सामाजिक मान्यता मिळवून देण्याचा हा प्रकार आहे.
या प्रक्रियेत सोशल मीडिया सेलिब्रेटी व अन्य
सेक्युलर पक्षाच्या लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. भाजपला
सत्तेपासून दूर ठेवणे इतकाच अजेंडा त्यात आहे. पण ते करताना ५२ वर्षांपासून आक्रमक
हिंदुत्वाचा झेंडा मिरवणाऱ्या फॅसिस्ट पक्षाला आपण कुठल्या अर्थाने जवळ करतोय, हे अजूनही कुणी ठामपणे सांगू शकलेलं
नाही.
नवी आघाडी म्हणजे ‘दगडापेक्षा विट मऊ’ असा काहीसा प्रकार
आहे. पण याचे दूरगामी परिणाम भारताच्या राजकीय संस्कृतीवर पडणार हे नक्की. त्यातही
सामाजिक स्थित्यंतरे बदलणे व सांस्कृतिक चळवळीच्या अभिसरणावर त्याचा लक्षणीय
परिणाम दिसून येईल.
वाचा : ‘मोदी 0.2’ अगतिकतेचा विजय
वाचा : राजकीय पक्षांची अवनती
बहुसंख्यवादाचा अतिरेक
गेल्या साडे पाच वर्षांपासून भाजप मुस्लिम द्वेषावर आधारित राजकीय हिंदुत्वाचे राजकारण राबवित आहे, त्याला जन मान्यतादेखील मिळत आहे. भाजपचा हा कथित राष्ट्रवाद मुस्लिमांच्या मुळावर उठलेला दिसू येतो. ‘लव्ह जिहाद’, ‘जय श्रीराम’ची घोषणा करत हल्ले, एनआरसी आणि नागरिकता संशोधन विधेयकातून हे दिसून आले. पण कुठल्याही सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय पक्षाला यात गैर असे काही वाटत नाही. दुसरीकडे सामान्य जनतादेखील मूलभूत व आर्थिक प्रश्न विसरून भाजपच्या फसव्या राष्ट्रभक्तीला शरण गेल्याचे दिसते.
भाजपच्या प्रचारी मोहिमेचे फलित गेल्या पाच दशकांपासून देशाने जवळून
पाहिले आहे. मुस्लिम समुदाय हिंसक असतो, तो चार-चार शादियाँ
करतो, डझनभर मुलं जन्माला घालतो, त्यांच्या
मुली सुंदर असतात; त्या पळविल्या पाहिजे, मुसलमान जीवे मारण्याच्याच लायकीचा असतो, त्यांना
ठोकूनच काढलं पाहिजे, त्यांनी आपल्या लायकीतच राहावे,
त्यांना दुसरा देश दिलाय, मग ते इथे का राहतात,
त्यांनी पाकिस्तानला जावे इत्यादी इत्यादी... असा दुष्प्रचार भाजपने
राबविला. त्याला साथसंगत त्यांचा सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने तर दिलीच
पण सेक्युलर म्हणवणाऱ्या विरोधी गटातील राजकीय गट-संघटनांनी गप्प राहून त्याला मूक
संमती दिली. कोणीही या भाजपच्या असांस्कृतिक कृत्याविषयी उघडपणे बोलत-लिहित व कृती
करताना दिसून आला नाही.
त्याला बहुसंख्याकांमधील बहुतेक गैरमुस्लिमांनी या
मिथकांना मान्यता देत त्याचं ओझं वाहिलं. त्यातून मुसलमानांविरोधात दोषारोपणाची
प्रक्रिया यथोचित सुरू झाली. हिच मानसिकता खिश्चन, आदिवासी आणि अलीकडे दलित
समुदायांबद्दल विकसित झालेली दिसून येते.
हिंदुत्ववाद्याचे हल्ले, कारवाया, असांस्कृतिक कुरघोड्य़ांना (धार्मिक) राष्ट्रवादात बसविण्यात आले. त्यांच्या कुरघोड्या, वाचाळतेला परराष्ट्र मुत्सद्देगिरी म्हटले गेले. वर्चस्ववादाच्या राजकारणाला विकासाचे लेबले लावण्यात आली. हिंदुत्ववाद्याची कोणतीही कृती ही देशभक्ती आहे, अशा बहुसंख्याकांचा समज झालेला दिसून येतो.
(मीरा रोड भागातील एका गृहप्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी बनातवाला आणि बाळ ठाकरे) |
त्यामुळे आज भाजपचे कुठलेही दृष्कृत्य दैनंदिन
व्यवहार झाल्यासारखे भासत आहे. शिवसेनेच्या बाबतीतही येत्या काळात असेच काहीतरी
झालेलं असेल. कारण फॅसिस्ट शिवसेनेला मान्यता मिळवून देण्याचं ‘कंत्राट’ सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीच्या
राजकीय पक्षाने केवळ आपण सत्तेपासून दूर राहू नये, म्हणून
घेतलं आहे.
सेनेच्या आक्रमक हिंसेला, गुंडगिरीला (त्यांची कथित स्टाईल), हिंदुत्वाला, दक्षिण भारतीय व मुस्लिमांविरोधात द्वेशाला मान्यता मिळवून देण्याचा हा खरा आटापिटा आहे. (दुसरीकडे सेक्युलर म्हणवणारे पक्ष राजकीय पटलावरून संपण्याची शक्यताही नाकारता येत नाही). सत्ता संपादनासाठी धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राजकीय पक्षाची ही स्वार्थी खेळी केली आहे.
वाचा :उजव्या राजकारणात डाव्या पक्षांची अपरिहार्यता
शुद्धिकरणाची मोहीम
आज सर्वजण (भाजपविरोधी) शिवसेनेला नेमस्त
हिंदुत्वाच्या चौकटीत बसवित आहेत. सेनेला जहाल व आक्रमक हिदुत्वाच्या
फ्रेमवर्कमधून बाहेर काढू पाहत आहेत. शिवसेनेला व पर्यायाने उद्धव ठाकरेंना मवाळ
सिद्ध करण्याचे धोरण मोठ्या पातळीवर राबविण्याची मोहीम सुरू आहे. त्याच्यासाठी मोठ-मोठे वृत्तलेख
लिहिले जात आहेत. शिवाय सोशल मीडियावर तर कौतुकाचे न्यूज फीड लोळत आहे. मुळात हे
पूर्णत: शाब्दिक व कल्पनाविलासी आहे. राजकारणात कार्यरत असलेल्या सर्वच गैरभाजपाई
पक्षाला मुसलमानांसंदर्भात काहीच पडलेलं नाही.
हक्काची मते घेणाऱ्यांनीदेखील लोकसभा निवडणुकीत
मुसलमानांना खिजगणतीत काढलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’मध्ये शिवसेनेची मुसलमानांसंदर्भात काय भूमिका असेल, हा प्रश्न विचारणे किवा तसा विचार करणे कुणालाही शक्य झालेलं नाही.
वास्तविक, उद्धव ठाकरे आज खुर्चीच्या मोहापायी संयत भाषा वापरत आहेत. पण
दिवाळीपूर्वीची त्यांची भाषणे यूट्यूब केली तर त्यांचे रौद्र व हिंदुत्ववादी रूप
समोर येईल. त्यांनी ज्यापद्धतीने निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांच्या विरोधात
मोहीम सुरू केली होती, त्यांच्या धर्मनिरपेक्षतेची कसा
पद्धतीने खिल्ली उडवल्याचे दिसून येईल. पण तुर्तास त्यासंबधी चर्चा कुणालाही
करायची नाही.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी औरंगाबादच्या
जाहिरसभेत त्यांनी हिरव्या सापाला (खासदार ओवैसींना) जमिनीत गाडण्याची भाषा केली
होती. त्यापूर्वी मणिशंकर अय्यर यांना बुटाने मारण्याची भाषा केली. काँग्रेसचे
तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींना बावळट म्हणत त्यांचा बौद्धिक समतोल ढासळल्याचे
म्हटलं.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन
सिंह यांच्या विरोधात अपशब्द (ते इथे कोट करू शकत नाही) वापरले होते. आज
काँग्रेसनेदेखील सत्तेच्या मोहापायी आपल्या ५२ वर्षांच्या राजकीय शत्रूविरोधात
झापडबंद भूमिका घेतली आहे. शिवसेना बदलेल अशी भाषा या सेक्युलर म्हणवणाऱ्या
पक्षाकडून केली जात आहे.
शिवेसेनेने यापूर्वी सत्तेसाठी सेक्युलर म्हणवणाऱ्या
पक्षाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत घेतलेली आहे. १९६६ साली जालेल्या स्थापनेपासून काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचा इतिहास
वृत्तपत्रात फाइलबंद आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसचा प्रचार केला.
इतिहास सांगतो की, त्यावेळी आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज
फर्नांडिस, द. रा. गोखले, तसंच व्ही.
के. कृष्णमेनन मुंबईतून काँग्रेसच्या विरोधात रिंगणात होते. तेव्हा ह्या
सर्वांच्या विरोधात लेखक बाळ ठाकरेंनी लिहिलेला ‘पंचमहाभूतांना
गाडा!’ अग्रलेख ‘मार्मिक’मध्ये सापडतो.
पुढच्याच वर्षी १९६८ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात शिवसेना
निवडणुकीच्या रंगणात प्रथमच उतरली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसविरोधी असेलल्या मधू
दंडवते यांच्या प्रजासमाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली.
एकेकाळी समाजवाद्यांची एक घोषणा खूपच चर्चेत होती, ‘रात्र संपली पण उजाडलं कुठं? शिवसेना आली तर बिघडलं कुठं?’ म्हणजे फॅसिस्ट पक्षाच्या उभारणीत अनेकांचा वाटा होता, हे यातून स्पष्ट होतं. म्हणजे या काळातील एतर गैरकाँग्रेसी पक्षांचं मुस्लिमाविषयी आकलन, दृष्टिकोन व मांडणी लक्षात घेतली तर असे दिसते का, आरएसएसपेक्षा हे अधिक धोकादायक होते. किंबहुना हिंदुत्ववादी आणि उपरोक्त गैरकाँग्रेसी (आणि काँग्रेसीही) यांचं मुस्लिमांविषयीच्या पूर्वग्रहात फारसे अंतर जाणवत नाही.
सेनेला मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेची पाळी आली त्यावेळी इंडियन युनियन मुस्लिम लिगच्या जी. एम. बनातवालासोबत त्यांनी साटंलोटं केलं. आणि महापालिकेत सेनेची पहिली सत्ता स्थापन केली. हे तेच बनातवाला होते, ज्यांच्याविरोधात सेनेने मुंबईतील हिंदू वस्तीत जाऊन आक्रमक शैलीत हिंदुत्वाचा प्रचार केला होता.
पुढे शिवसेनेने १९७५ला इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीचं ‘शिस्तपर्व’ म्हणत स्वागत केलं व उघड समर्थन दिलं. इतकच नाही तर १९७७मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात सेनेने उमेदवार दिले होते. परंतु पदरी निराशा आली. आणीबाणी उठली आणि निवडणुका झाल्या. त्यात इंदिरा गांधीची सत्ता गेली व जनता पक्षाचे मिलीजुली सत्ता स्थापन झाली. परंतु पुढच्या दोनच वर्षात राजकीय पटलावर सत्तासंघर्ष झाला व त्यात जनता सरकार कोसळले. त्यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत इंदिरा गांधीनी पुन्हा दिल्ली काबीज केली.
तसे शिवसेनेचे धोरणही बदलले. पंतप्रधानांची खुर्ची
ताब्यात घेताच इंदिराबाईंनी शरद पवारांनी स्थापन केलेलं जनसंघ-समाजवाद्याची मिली-जुली
युती असलेलं महाराष्ट्रातील ‘पुलोद’ सरकार बरखास्त केलं.
१९८० साली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. ह्या निवडणुकीत
शिवसेनेने आपला एकही उमेदवार उतरवला नाही. इतकंच नाही तर शिवसेनाप्रमुखांनी उघडपणे
काँग्रेसचा प्रचार केला. त्यांनी मुंबईतील ‘नेहरूनगर’ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार
बाबासाहेब भोसले यांचा प्रचार सभेत प्रमुख वक्ते म्हणून भाषण ठोकले.
१९८०च्या काँग्रेसला निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला व
इंदिराबाईंनी कोकणी मुस्लिम असलेले बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना
मुख्यमंत्री केले. अंतुलेसोबतचे राजकीय व पारिवारिक संबंध शिवसेनेने शेवटपर्यंत
जपले. आज बॅ. अंतुलेंचे चिरंजीव नवीद अंतुले शिवसेनेचे सदस्य आहेत. एकाएकी कसं काय
काँग्रेसच्या नवीद अंतुलेंनी शिवबंधन बांधून घेतले? असा प्रश्न सहज पडून जातो.
आणीबाणीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेनेने
काँग्रेसच्या मुरली देवरा यांना महापौर पदासाठी समर्थन दिलं होतं. देवरा व सेनेचे
आत्मिक संबंध दीर्घकाळ टिकून राहिल्याचे मराठी जनतेला ज्ञात आहे.
शिवसेनेची सत्तेशी असलेली जवळीक कधीही लपून राहिली
नाही. सेनेने केंद्रातील प्रत्येक सत्तेशी दोस्ताना करत वेळोवेळी संधीचा फायदा उचलला.
‘वसंत सेने’चा रंजक इतिहास तर आपल्या समोर आहे.
अखेर १९८० नंतर गिरणी कामगारांच्या मुद्द्यावरून
काँग्रेससोबतचे संबंध तोडत असल्याचं शिवसेनेनं जाहीर केलं. परंतु स्थानिक काँग्रेस
नेत्यांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध वृत्तपत्राच्या लोकरंजनाच्या बातम्या
दीर्घकाळ होत राहिल्या.
म्हणजे काँग्रेसनं वेळी-अवेळी जहाल हिंदुत्वाची धुरा खांद्यावर वाहिलेल्या शिवसेनेची मदत केलेली व घेतलेली आहे. २०१३ साली बाळ ठाकरेंचे निधन झालं त्यावेळी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनं त्यांचा उदो-उदो केला. आघाडी सरकारने जाहिर केल्ल्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारावर बराच वादही झाला.
शरद पवार आणि बाळ ठाकरेंच्या ‘भावनिक’ संबंधाबाबत वेगळं काही सांगायची गरज नाही. किंबहुना नव्या पिढीपर्यंतही त्यांचे रंजक किस्से सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचले आहेतच.
वाचा : ‘धर्मनिरपेक्षतेचे कुली आम्हीच का व्हावे?’वाचा : 'मनातील हिंदू-मुस्लिम बायसचे काय करायचे?'
काळा इतिहास
१९७०च्या भिवंडी-जळगाव दंगलीनंतर शिवसेना दक्षिण भारतीयांच्या विरोधाचा मुद्दा सौम्य करत मराठी मुसलमानांवर उलटली. साठच्या दशकाच्या अंतिम टप्प्यात शिवसेना सांप्रदायिक राजकारणाचा आक्रमक राजकीय पक्ष म्हणून पुढे आला. तज्ज्ञ सांगतात, सांप्रदायिकतेचा असा चेहरा देशाने यापूर्वी कधी पाहिला नव्हता.
१९८० नंतर शिवसेनेने जनसंघाशी गट्टी साधून आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केला. १९८०च्या भिवंडी-मुंबई दंगलीत तर शिवसेनेनं जनसंघ आणि संघाच्या सहकार्याने भीषण दंगली घडविल्या, असं इतिहासाच्या पुस्तकाने मांडून ठेवलं आहे. (असगरअली इंजिनियर, भारत में सांप्रदायिकता, पृष्ठ-११५, इतिहास बोध प्रकाशन, २००७).
जनसंघासोबत (भाजप) झालेल्या युतीनंतर व मुस्लिमविरोधाच्या राजकारणानंतर सेनेची राजकीय दिशाच बदलली. बाळ ठाकरे यांनी उघडपणे मुस्लिमांच्या विरोधात चिथावणीखोर भाषा वापरण्यास सुरुवात केली. मराठी मुस्लिमांविरोधात अर्वाच्च्य भाषा, निंदा-नालस्ती, हेटाळणी, द्वेशमुलक शब्दांचा मारा सतत सुरू होता. त्यांची बरीचशी भाषणे आजही यूट्यूबला आहेत. हे सर्व करत असताना हळूहळू शिवसेनेने काँग्रेसला बाजुला सारत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय हिंदुत्वाची कास धरली. बाबरी उद्ध्वस्तीकरणानंतर शिवसेनेच्या ‘कम्युनल’ राजकारणाची रुपरेखाच बदलून गेली.
१९९३च्या बाबरीच्या दंगलीनंतर शिवसेनेचा ‘मराठी चेहरा’ नागडा होत तो ‘कम्युनल’ झाला. न्या. श्रीकृष्ण समितीचा अहवाल वाचला तर शिवसेनेने मुंबईकर मुसलमानांच्या विरोधात कशी हत्याकांडे घडविली, कसे षडयंत्रे रचली याची उजळणी होईल. मुसलमानच नाही तर दलित पँथर आणि कम्युनिस्ट चळवळीसंदर्भातही शिवसेनेची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे.
१९९३च्या मुंबई दंगलीनंतर शिवसेनेसारख्या हुकुमशाही पक्षाला सत्तेत येण्याची संधी लोकांनी देऊ केली. अर्थव्यवस्थेच्या खुलीकरणामुळे मध्यमवर्ग उदयास येऊन तो सधन झालेला होता. सेनेने योग्य वेळी मध्यमवर्गीयात काँग्रेसविरोध पेरत त्यांच्यामध्ये मराठीपणाआड धर्मवादाच्या अस्मिता कुरवाळल्या. त्याचे फलित म्हणजे १९९५ साली त्यांचा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला.
सत्तेत असताना अपरिहार्यपणे शिवसेनेने फॅसिस्ट राजकारण बाजूला ठेवले. दुसरीकडे सांस्कृतिक राजकारणातून आपला फॅसिस्टपणा अबाधित ठेवला. भांडवलवादाचा पुरस्कार करत सेनेने ५ वर्षें सत्ता चालवली. दरम्यानच्या काळात झुणका भाकर केंद्र, झोपडपट्टी पुनवर्सन सारख्या योजना राबवून गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या गळ्यात आपले फोटो लटकवले.
पाच वर्षे सत्ता चालविताना शिवसेनेने हिंदुत्वाचा ‘साधन’ म्हणून वापर केला, पण त्याला ‘साध्य’ बनविले नाही. उलट पाच वर्ष सरल्यानंतर पुन्हा शिवसेनेने राजकीय हिंदुत्वाची आक्रमक शाल पांघरली. नव्या काँग्रेस आघाडी सरकारविरोधात शिवसेनेने धारण केलेले हिंदुत्ववादी वर्तन अद्याप कायम होते.
सत्तेत येताच विलासराव सरकारने १९९३च्या मुंबई दंगलीप्रकरणी सेनाप्रमुख बाळ ठाकरेंना अटक करण्याची घोषणा केली, त्यावेळी मुंबईत दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुढच्या काळात तर मुस्लिमविरोधाचे प्रत्येक साधन वापरत सेनेने पक्षसंघटना अधिक मजबूत केली.
शिवरायांचा वापर साधन म्हणून केला. यात राजकीयदृष्ट्या काही गैर नव्हते. पण ग्रामीण व शहरी भागात शिवसैनिकांनी शिवरायांच्या नावाचा वापर मुस्लिमांच्या शत्रुकरणासाठी वापरला. समाजात मुस्लिमाबद्दल सामाजिक द्वेश, हिणकसपणा आणि तुच्छतावाद वाढविला. याच जमीनीवर भाजपने पेरणी करत तो द्वेश व तुच्छतेला ‘साध्या’चे स्वरूप दिले. शिवसेनेची ती राजकीय कृती आजतागायत मराठी मुसलमानांची पाठ सोडत नाही.
गेली तब्बल ५० वर्षे शिवसेनेने मराठी माणूस, विकास, भाषा,
परप्रांतीय, भूमिपूत्र, संस्कृती, जीवनशैली
म्हणत बेजबादार वर्तन केलं. आक्रमक भाषणबाजी, झुंडशाही,
दादागिरी, गुंडागर्दी केली. प्रबोधन चळवळीवर
हल्ले केली. संस्कृतीच्या नावाने चित्रपटाचे खेळ बंद पाडले. व्हॅलेटाइन सारख्या
उत्सवाला धार्मिक रंग दिला. दुकानाच्या अमराठी फलकावर काळे फासले. संपादक, पत्रकार,
मराठी नाटककारांवर हल्ले केले.
विद्यापीठ मागणाऱ्यांना ज्यांच्या घरी नाही पीठ
त्यांना कशाला हवं विद्यापीठ म्हटले. मराठी मुसलमानांना लांडे, पाकडे, दहशतवादी
म्हणून हिणवले. प्रसिद्धू माध्यमांनीदेखील सेनेच्या दहशतीखाली लोंटगण घातले. ‘सेना स्टाइल’ म्हणत त्याच्या गुंडगिरीला मान्यता मिळवून दिली. हल्ले करणे,
दंगल घडविणे, तोडफोड करणे, मारझोड करणे, हाणामारी करणे, विषारी वातावरण तयार केले.
महाराष्ट्रात आपली राजकीय दहशत स्थापन करण्यासाठी जे शक्य होईल ते केले.
ही कथित सेना स्टाइल
अद्याप सुरू होती. २०१६ साली लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एका मु्स्लिम पोलीस अधिकाऱ्यांने शिवजयंतीच्या कार्यक्रमाला संमती दिली नसल्याने त्याला मारहाण करत गावातून धिंड काढण्यात आली. मारहाण करणारे आरोपी शिवसेनेशी संबंधित होते. शिवबाच्या नावाने मुसलमानांत दहशत माजवण्याचं काम सेनेनं आजतागायत केल्याचं उपरोक्त संदर्भातून दिसून येते.
योगायोग म्हणजे ज्या बाबरी उद्ध्वस्तीकरणानंतर शिवसेना महाराष्ट्रात वाढली व विकसित झाली. पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली, आज आयोध्या वादावर न्यायालयीन तोडगा निघाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रावर विराजमान झालेला आहे. तेही स्वत:ला सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या राजकीय पक्षाचा पाठिबा धोरणावर.
वाचा : एमआयएम-वंचित युती अन् (राजकीय) पुरोगामित्व
वाचा : आम्ही भारतीय: कल्पनेचे बळी
नवी आव्हाने
उपरोक्त संदर्भ पाहिल्यास आज शिवसेना बदलेल (सेक्युलर झाली) आहे जे सांगणे घाईचे ठरेल. आरएसएस बदलणार नाही हे सर्वांना ठाऊक आहे. परिवर्तनाची भाषा करत असतील तरी ते पुन्हा त्याच वळणावर जाताना दिसतात. परंतु जर शिवसेना बदलत असेल तर त्याचे सर्वांकडून स्वागत होईल. सर्वप्रथम मुस्लिम समुदाय जो गेली ५ दशके शिवसेनेच्या जहाल हिंदुत्वाचा क्रमांक एकचा शत्रू राहिला आहे, तोसुद्धा सेनेचे ‘खुशामदिद’ करायला पुढे येईल.
तत्पूर्वी सेना सत्तेसाठी तात्पुरती बदलली असे सांगता येईल. जर शिवसेना बदलत असेल तर त्याचे स्वागत आहे. पण ते तसे करण्याची शक्यता फार कमी आहे, कारण त्यांनी मतपेटीसाठी ज्या पद्धतीने जमातवाद पोसला, मराठी मुसलमानांचे सांस्कृतिक उद्ध्वस्तीकरण केले व त्याचे बळकटीकरण केले या सर्वांची सवय ज्या मतदार व शिवसैनिकांना झाली, ते राजकीय लाभधारक गट सेनेला बदलू देणार नाही. किंवा असेही होईल की त्यांच्यासाठी शिवसेना बदलणार नाही. पण केवळ ‘सेक्युलर’ मुद्द्यावर बदलून भागणार नाही, तर सेनेने मुसलमानांसंदर्भातील वादग्रस्त मुद्द्य़ावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
शिवाय त्यांना संस्कृती रक्षणाच्या नावाखाली केलेल्या असांस्कृतिक कृत्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करावी लागेल.
मुस्लिम आरक्षणावर सेनेने भूमिका घेतल्याचं वाचनात आलं. पुढचा टप्पा म्हणून त्यांनी औरंगाबाद परिसरात प्रस्तावित अलीगड विद्यापीठाच्या उपकेंद्राला मान्यता द्यावी. हे विद्यापीठ केवळ मुसलमानांसाठी नाही तर मागास मराठवाडा परिसरातील सर्व जाती-समुदायाच्या विद्यार्थ्यांना लाभान्वित करणार आहे.
शिक्षणासारख्या पवित्र कार्याला शिवसेनेनं केवळ ‘मुस्लिम’ शब्दामुळे आक्षेप नोंदवत खोडा घातला आहे, जे सयुक्तिक नाही. सेनेने आपल्या बदलत्या धोरणानुसार विद्यापीठाच्या उपकेंद्राला तात्काळ मान्यता द्यावी. त्यामुळे झापडबंद होऊन शिवसेनेला शरण जाण्यापूर्वी थोडेसे थांबून सर्वांनी त्याची समीक्षा करावी.
शिवसेनेकडून परिवर्तनाची अपेक्षा केली जाऊ शकते. कारण शिवसेनेच्या केंद्रस्थानी मराठी मातीच्या मुद्द्य़ांवर राजकारण (भावनिक का असेना) राहिले आहे. या महाराष्ट्रीय संस्कृतीत सर्वांना सामावून घेणे व सर्वसमावेषी तत्त्वे भिनली आहेत. त्यामुळे शिवसेना बदलेल अशी अपेक्षा करणे रास्त आहे. जर बदलत असेल तर पुरोगामी महाराष्ट्र त्याचे स्वागत करेलच.
जाता जाता -
अजित पवार यांचे बंड ही बातमी वृत्तपत्राचा इतिहास बनून रद्दीत गेली. पण देशाच्या स्मरणात हे बंड आहे. सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय पक्षाचे प्रमुख नेते एका रात्रीतून फॅसिस्ट पक्षाचं हात धरतात, त्यावर मात्र काहीच चर्चा होत नाही. कुठलाही मोठा लिडर यावर अजूनही बोलला नाही. म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची अशी ही गत आहे.
हिंदुधर्मभिमानी, वंश-वर्णवादी, जातिव्यवस्थेचं समर्थन करणारे आणि दलित-मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा असलेला भाजप एका सेक्युलर नेत्याला आपल्या इशाऱ्यावर दिशा व भूमिका बदलायला भाग पाडतो. एका निर्णयानं राष्ट्रवादीचे अनेक आमदार एकाएकी हिंदुत्ववादी होतात. सर्व पक्ष भाजपात विलीन करतात, यावर चर्चा का होत नाही. निष्पक्ष म्हणवणारे पत्रकार व राजकीय विश्लेषकही यावर गप्प आहेत, ही कोंडी कधी फुटेल का..?
(सदरील लेखाचा संपादित भाग २ डिसेंबर २०१९ला अक्षरनामा संकेतस्थळावर प्रकाशित झालेला आहे.)
कलीम अजीम, पुणे
मेल-kalimazim2@gmail.com
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com