डावी चळवळ आणि दुर्लक्षित मुस्लिम


काही दिवसात डाव्या चळवळीचं स्थापना शताब्दी वर्ष सुरू होईल. १९२० साली दिल्लीत मौलाना हसरत मोहानी यांच्या हिजरतविषयी भाषणाने प्रभावित होऊन तब्बल २० हजार मुस्लिमांनी ब्रिटिश राजवटीचा निषेध नोंदवत देशांतर केलं होतं. ती लोक अफगाणिस्तानला गेली. त्यातील ३०० मास्कोला दाखल झाली. त्यांनी लेनिनच्या साम्यवादी धोरणाचं स्वागत केलं.

त्यातील काहींना लेनिनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आलं. मग त्यांनी भारतात डाव्या विचारांचा प्रभाव वाढावा यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले. तत्पूर्वी मास्कोत मिर्जा सुलतान गॅलीव जे लेनिनचे सहकारी होते, त्यांनी लेनिनला स्पष्ट निर्देश देत सूचित केलं होतं की, जगभरातील मुसलमानात साम्यवादी विचारसरणीचा प्रसार करावयाचा असेल तर इस्लामचा आधार घेतला पाहिजे.

कारण इस्लाम हा मुळात डावा आहे. तो मानव कल्याणाची भूमिका मांडतो. आपण जर साम्यवादाच्या प्रचारासाठी इस्लामचा आधार घेतला तर आपल्या विचारसरणीला मोठा अनुयायी मिळेल. त्याप्रमाणे लेनिनने सुलतान गॅलीवचं म्हणणं मान्य केलं. लेनिनकृत प्रचार कार्यातून जगभरातील कोट्यवधी मुस्लिम साम्यवादी विचारांशी जोडली गेली. त्यात ३०० भारतीय मुस्लिमांनी मोलाची भूमिका अदा केली होती.

मानवेंद्र रॉय जे त्यावेळी रशियात होते, त्यांच्या मदतीने भारतीय हिजरतकर्त्यांनी डाव्या विचारांचा प्रचार सुरू केला. परकीय देशातील वृत्तपत्रात लेख लिहिणे, भाषणे, देणे, पत्रकं छापून वितरित करणं इत्यादी काम सुरू केलं. त्यातील काहींनी पुढे ताश्कंदमध्ये रशियन राज्यक्रांतीच्या वाढदिवशी भारतीय कम्यनिस्ट पक्षाची स्थापना केली. त्याच्या संस्थापक सदस्यात बिकानेरचे शौकत उस्मानी प्रमुख होते. शिवाय गुलाम मुहंमद, रफीक अहमद, मुजफ्फर अहमद आणि शफिक अहमद (शफीक अहमद यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आपला पहिला महासचिव मानते.)

पुढे १९२५ साली कानपूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची रितसर स्थापना झाली. त्यात मोहानी दाम्प्त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मोहानींनी त्यावेळी राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेस सोडली होती. त्यांनी रशियाप्रणित डाव्या विचारांच्या प्रचार-प्रसाराचं कार्य सुरू केलं होतं. भाषणे देऊन, सभा घेऊन तथा अग्रलेख लिहून इस्लाम आणि डावा विचार यातील साम्य अधोरेखित करत होते. त्यांनी कानपूरमध्ये साम्यवादी पक्षाच्या स्थापनेत की-रोल अदा केला होता.

चक्क काँग्रेसच्या अधिवेशनात घुसून साम्यवादी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाची पत्रके त्यांनी वाटली. या कामात त्यांची बेगम निशात उन निसा मोहानी अग्रेसर होत्या. पुढे पती-पत्नीने साम्यवादी विचारांचा प्रसारकार्यात स्वतला गुंतवून ठेवलं.

विशेष म्हणजे भारतात डावा विचार रुजवणारे पहिले पाच-सहा संस्थापक सदस्य उलेमा होते. मौलवी बरकतउल्लाह, मौलवी उबेदुल्ला सिंधी त्यातील प्रमुख नावं. ते गदर पक्षाशी संबंधित होते. १९२२-२३मध्ये बरकत उल्लाह बर्लिनमध्ये बोल्शेविकांच्या मदतीने ‘इंडिपेंडेस पार्टी’ नावाची संघटना चालवीत होते. त्यांनी भारताबाहेर स्वतंत्र मंत्रिमंडळ स्थापन केेल होते. राजा महेद्र प्रताप या हंगामी सरकारचे अध्यक्ष तर ओबेदुल्लाह सिंधी गृहमंत्री होते. बरकत उल्लाह पंतप्रधान होते. 

बरकतउल्लाह १९१९ साली मास्कोत दाखल झाले होते. त्यांनी ‘आशियाई आज़ादी काँग्रेस’मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. सोव्हिएत रशियाचे थोर नेते व्लादिमीर लेनिन बरकतुल्लाह यांच्या भेटीमुळे प्रभावित झाले. 


१९३५ साली अनेक डाव्या विचारसरणीच्या उर्दू साहित्यिक, लेखकांनी एकत्र येऊन प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन नावाची सांस्कृतिक संघटना उभी केली. सज्जाद जहीर संस्थेचे संस्थापक होते. रशीद जहां ज्यांनी भारतात प्रथमत: स्त्रीमुक्ती म्हणजे फेमिनिस्ट मूव्हमेंट सुरू केली होती, ती त्यातील एक प्रमुख संघटक होती. व्यवसायाने डॉक्टर असेलेली ही महिला बंडखोर लेखिका होती. त्यांनी अंगारेसारखा विद्रोही कथासंग्रह काढून देशातील कर्मठ परंपरा व त्यांच्या रक्षणकर्त्याविरुद्ध बिगुल फुंकला होता. परिणामी हा कथासंग्रह ब्रिटिश सरकारने जप्त केला. त्या प्रारंभी गांधीयन होत्या, नंतर त्यांनी साम्यवादाची कास धरली.  

कम्युनिझम विचारांचा प्रचार व प्रगतिशील साहित्य संघाच्या स्थापना तथा विकासात रशीद जहाँ यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. त्यांनी प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद यांना गळ घालती की त्यांनी पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्ष व्हावं. त्याप्रमाणे प्रेमचंद अध्यक्ष झाले. त्यांनी व त्यांचे शौहर महमूद जफर यांनी सज्जाद जहीर यांच्यासमवेत देशभर दौरे करून प्रादेशिक भाषेतील बहुसंख्य साहित्यिकांना संघटित केलं.

मुळात या संस्थेचे संस्थापक उर्दू लेखक, साहित्यिक होते. परंतु त्यांनी देशातील विविध भाषिक लेखकांना संघटेनेशी जोडलं. त्यात सिने निर्माते, गीतकार-कथालेखक (सर्व गीतकार-कथालेखक त्यावेळी शायर-कहानीकार होते व प्रगतिशील संस्थेचे पदाधिकारी होते) कलावंतांना संस्थेशी जोडलं. त्यामुळे वास्तवदर्शी (रियलिस्टिक) सिनेमाचा एक मोठा काळ भारतीय सिने इंडस्ट्रीत सुरू झाला. बिमल रॉय, राज कपूरचे सारखे मेकर उदयास आले. ख्वाजा अहमद अब्बास त्याचे कर्ते होते.

पुढे इप्टासारखी संघटनादेखील उर्दू लेखकांच्या पुढाकाराने अस्तित्वात आली. ख्वाजा अहमद अब्बास त्यातील प्रमुख होते. इप्टामध्येही अनेक भाषिक कलावंत जोडले गेले. या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या बेबंद सत्तेला केवळ प्रश्नच विचारले नाही तर त्यास आव्हानही दिलं. देशभर फोफावणारे फॅसिस्ट विचार व त्यांच्या पुरस्कर्त्यांचा निषेध केला. युद्धखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केलं. मानवी मूल्यावर आधारित सामाजिक व राजकीय विचारांची रुजवणूक केली.

दोन्ही संस्था सांस्कृतिक असल्या तरी त्याची भूमिका विशुद्ध राजकीय होती. या संघटनेच्या माध्यमातून देशातील हजारो, लाखों मुस्लिम डाव्या चळवळीशी जोडली गेली. प्रामुख्याने त्यात धार्मिक संघटकही होते.

निज़ामी हैदराबाद संस्थानातही अनेक मुस्लिमांनी साम्यवादी चळवळ सुरू करून अनेक क्रांतिकारक कामं केली. विलीनीकरणपूर्व काळात कॉम्रेड असोशियसन सारखी संस्था कार्यरत होती. त्यात मखदूम मोहियोद्दीन, इब्राहिम जलीम, आलम खुंदमिरी सारखे विद्वान होते. विलीनीकरण चळवळीला त्यांनी (जलीस वगळता) गती दिली.. जहागीरदार व भाडंवलादाराविरोधात शेतकऱ्यांचा लढा उभा केला. विलीकरणानंतरही त्यांनी शेतकरी हक्कांसाठी भारतीय संघराज्याशी दीर्घकाळ लढा दिला. आजही त्यांचा प्रभाव तिथं जाणवतो. अनेक सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत साम्यवादाचं वैचारिक प्रतिबिंब दिसतं...

परंतु जसजसं साहित्य व नाट्य संघाचे संघटक काळाच्या ओघात कमी-कमी होऊ लागले, उर्दू भाषेला अवकळा येऊ लागली, तशी संघटना क्षीण होऊ लागली. फाळणीनंतर संघटना व विचारांना मोठा सेटबॅक बसला. कारण बहुतांश उर्दू लेखक लाहौर निवासी होते. त्याकाळी लाहौर उर्दूची साहित्यिक राजधानी होती. त्यातही पक्षाने इथून अनेक संघटकांना पक्षकार्यासाठी कराची, लाहौरला पाठवलं होतं. अनेक जणांनी घर-दार, कुटुंब-कबिला भारतात सोडून केवळ कर्तव्यापोटी देशांतर केलं. तिथं राहून त्यांनी जहागिरदारीविरोधात लढा तीव्र केला. कामगार संघटना उभ्या केल्या. परंतु अल्पकाळातच तिथल्या तथाकथित इस्लामी सरकारने जी इस्लामच्या समान तत्व व धोरणाचा दावा करत होती, तिने पक्षावर व त्याच्या कार्यावर बंदी आणली व संघटकांना जेलमध्ये कोंबलं.. त्यांच्यावर रावळपिंडी कट सारखा मोठा आरोप लावून देशद्रोही सिद्ध केलं गेलं. तरीही अनेक संघटक भूमिगत राहून विचार प्रसवत राहिले.. काहींना जन्मठेप तर काहींना फाशी मिळाली.. त्यांचा गुन्हा इतकाच की सरंजामी सरकारला प्रश्न विचारत होते. व्यवस्था बदलू पाहत होते...

स्वातंत्र्यानंतर भारतातही डाव्या चळवळीला वाईट दिवस सुरू झाले. पंजाब उद्ध्वस्त झालं होतं. देशात उर्दूचं साप्रदायिकीकरणाला गती आली. हैदराबाद ही उर्दूची साहित्य नगरी पडली होती. तिथून अनेक साहित्यिक निघून गेले होते. दिल्लीतही फारशी चांगली अवस्था नव्हती. मुंबई तर उद्ध्वस्त होत होती. मंटोसारख्या लेखकांना मुंबई सोडण्यास भाग पाडण्यात आलं होतं. इप्टा विखुरली गेली.

पुढे नेहरुवीयन काळात समाजवादी भारत निर्मिण्याचं स्वप्न भंगल्याने अनेक साहित्यिक निराश झाले. त्यांनी आपली लेखणी चालवली पण त्याची धार बोथट झाली होती.

चीनने दुफळी माजवली. स्टालिनच्या कृत्यं पाठ सोडत नव्हती. बंगाल, केरळसारख्या प्रयोगांनी पक्षात भेदाभेद निर्माण केले. तिच स्थिती सांस्कृतिक संघटनेत झाली. नेतृत्व करणारा उर्दू साहित्यिक नसल्याने अवकळा आली.

आज संदर्भ बदलला, काळ बदलला. प्रागतिक विचार क्षीण होऊ लागला. धर्मांध व प्रतिगामी विचार फाफावू लागाला. त्यामुळे संघटना विखुरली गेली.

संघटना असली तरी त्यात उर्दू भाषिकांची स्थिती काय? ठोस भूमिका किंवा कृती कार्यक्रम अदृश्य आहे. प्रबोधनाची माध्यमं बदलली तसं साहित्य व विचार निष्क्रिय ठरू लागले.

बलाढ्य सांस्कृतिक संघटना, पक्ष डोळ्यांदेखत क्षीण होत गेली परिणामी मुस्लिम पक्ष संघटनेपासून दुरावत गेला.. नंतरच्या संघटकांना सांस्कृतिक हस्तक्षेप व राजकारण कळू न शकल्याने बौद्धिक समुदाय बाहेर फेकला गेला. निधर्मवाद फोफावल्याने मुस्लिमही दूर गेले.

दुर्दैव असं आज मुस्लिमांना जोडून ठेवण्यासाठी पक्ष-संघटनेकडे कुठलाही कार्यक्रम नाही. भूमिका नाही.

कलीम अज़ीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: डावी चळवळ आणि दुर्लक्षित मुस्लिम
डावी चळवळ आणि दुर्लक्षित मुस्लिम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCm3cvyJ0K_QjzJHFr1lbb5xCrbvNZK0Q9-Z4EiqcxZuNA-xhJIXlPoySUSgQ8F2dilglBV_ZDZfwfnAFBELf9MWrGfgSOgchpMVd-WKAZzXLWmA3NnpGk24vhV62LH1zKsqqJlwwhcboclsG2YA_5mWwq-IoUiz6xwYs97ni3Tx1NBg1Fi2FK8bk_cjSP/w640-h428/Left%20Movment.jp.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCm3cvyJ0K_QjzJHFr1lbb5xCrbvNZK0Q9-Z4EiqcxZuNA-xhJIXlPoySUSgQ8F2dilglBV_ZDZfwfnAFBELf9MWrGfgSOgchpMVd-WKAZzXLWmA3NnpGk24vhV62LH1zKsqqJlwwhcboclsG2YA_5mWwq-IoUiz6xwYs97ni3Tx1NBg1Fi2FK8bk_cjSP/s72-w640-c-h428/Left%20Movment.jp.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2023/10/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2023/10/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content