धार्मिक (?) चर्चांपुरता बंदीस्त केलेला मुस्लिम

संबंधित फोटो औरंगाबादमधील एका क्रिकेट सामान्यातील प्रेक्षकांचा आहे. जो खासदार इम्तिय़ाज जलील यांच्या फेसबुकवरून घेतलेला आहे. 

साम टिव्हीचे पत्रकार व अँकर प्रसन्न जोशी यांनी २० नोव्हेंबर २०२२ रोजी एक फेसबुक टिपण लिहिलं. त्यात त्यांनी अब्दुल कादर मुकादम यांच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या उपस्थितीला धर्मीय संमेलनात जाण्याविषयीखंत व्यक्त केली. अर्थात त्यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेला धार्मिक म्हटलं होतं. त्यावरून त्यांना फेसबुकवरून चांगलंच ट्रोल केलं गेलं. अनेकांनी त्यांच्या हेकेखोर व एकांगी भूमिकेवर कठोर शब्दात टीका केली. त्यांच्या इतर मुद्द्यावरदेखील आक्षेप नोंदवता येतो, पण तुर्त एकच मुद्दा इथं चर्चेसाठी घेतला आहे..

भारतातील मुस्लिम हा केवळ राजकीय किंवा धार्मिक नसतो. तो प्रांतिक आहे, प्रादेशिक आहे, भाषिक आहे; तसंच तो सामाजिक, सांस्कृतिक व नागरी सुद्धा आहे. त्यामुळे त्याची केवळ  ‘धर्मीय’ व्याख्या करणे वस्तुनिष्ठतेला धरून नाही. अर्थात दोन्हीकडच्या राजकीय धुरीणांनी मुस्लिमांना केवळ राजकीय व धार्मिक गटापुरते बंदिस्त करून टाकलं, ही त्याची सोय होती.

मुसलमानांचा सामाजिक व सांस्कृतिक अस्तित्व अजूनही उघडपणे कबूल केलं जात नाही. त्याला मान्यता दिली जात नाही. ‘मुस्लिम मराठी साहित्य परिषद’ ही प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, अजीज नदाफ आणि कॉम्रेड विलास सोनवणे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी यांनी १९८९ साली स्थापन केली होती. स्थापनेमागचा उद्देश महाराष्ट्रातील मुस्लिमांची मराठी भाषा हा मुद्दा केंद्रवर्ती होता. स्थापनेचा इतिहास अनेकांनी लिहिला आहे, चर्चा केली आहे, व्याख्याने दिली आहेत. प्रा. बेन्नूर यांनी दोन-तीन दीर्घ लेखातून साहित्य परिषदविषयक भूमिका विस्ताराने विशद केली आहे. 

वास्तविक स्थापनेमागची भूमिका कधीच धार्मिक, धर्मीय व वर्णवादी नव्हती, हे अनेक मुसलिम मराठी साहित्यिकांनी वारंवार ठाशीवपणे नोंदवलेलं आहे. साहित्य चळवळीला तीन दशके पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रा. बेन्नूर यांनी फेबुव्रारी २०१८ला ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकात लेख लिहिला होता. (त्यांचा तो शेवटच्या काही लेखांपैकी एक) त्यांनी त्यांनी चळवळीची समीक्षा करताना स्पष्टपणे लिहिलं होतं, “ख्रिस्ती साहित्याप्रमाणे धर्मावर भर देणारे लेखन आमचे नव्हते. महाराष्ट्रातील मराठी मुस्लिमांच्या जीवन-मरणाचे प्रश्न घेऊन आमचं साहित्य पुढं आलं.” 

वाचा : मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं

वाचा : प्रतिकांचे साहित्यकारण किती दिवस?

किंबहुना धर्माने व इथल्या धर्मसंघर्षाने निर्माण केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी परिषदेची स्थापना केल्याचं ते स्पष्टपणे सांगतात. “इथल्या धर्माने आणि धार्मिक संघर्षाने निर्माण केलेले प्रश्न, वसाहतवादी आणि राष्ट्रवादी (?) इतिहासाने लादलेले परकेपण जातिव्यवस्थेत विभागले गेलेल्या मराठी मुसलमानांच्या मनात आणि व्यवहारात चाललेले द्वंद्व, जमातवादी राजकारणातून घडविल्या जाणाऱ्या दंगली, त्यांचं मुस्लिम समाजावर होत असलेले परिणाम यांची चर्चा करणे, हे आमच्या साहित्य परिषदेचं उद्दिष्ट होतं.”

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष प्रा. फ.म. शाहजिंदे आपल्या ‘दखलपात्र शब्दांचा उरूस’ पुस्तकात साहित्य चळवळीच्या तीन दशकांची मीमांसा करताना लिहितात, “मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ ख्रिस्ती मराठी साहित्य चळवळीसारखी चर्चप्रणित म्हणजेच धर्मप्रणित चळवळ नाही. तर ती मुस्लिम समाजातील उच्च जातवर्गाच्या विरोधातील चळवळ आहे. ही चळवळ मुळी मुस्लिम-बहुजन लेखकांची चळवळ आहे.” (पान-६१, भूमी प्रकाशन-२०१८)

कथितरित्या मुख्य प्रवाहातील पांढरपेशी साहित्यातून होणारे मुस्लिमांचे चारित्र्यहनन, विकृतीकरण व राक्षसीकरणाला प्रत्युत्तर म्हणून साहित्य चळवळ आकाराला आली. वर्णवादी ब्राह्मणी व अभिजन गटातून होणारी मुसलमानांची सततची अवहेलना, चुकीचं चित्रण तसंच धर्माच्या अनुषंगाने होणारे हल्ले या सर्वांना प्रतिसाद म्हणून साहित्य परिषदेसारखी सांस्कृतिक संघटना सुरू झाल्याचा इतिहास आहे. 

किंबहुना प्रा. बेन्नूर यांनी शहाजिंदे संपादित ‘मुस्लिम मराठी साहित्य; परंपरा स्वरूप आणि लेखक सूची’ या ग्रंथातील एका लेखात उघडपणे घोषित केलं आहे की, ‘धर्म प्रसार करून आम्ही काय साध्य करणार होतो, आमच्यासाठी तर जगण्या-मरण्याचे प्रश्न महत्त्वाचे होते. आमच्या साहित्य परिषदेने इस्लामवर लिहिलेलं नाही, ते लिहिण्याचे उद्दीष्ट नव्हते. तो कुरआन आणि हदीसच्या आदर्शावर आधारलेला आहे. महाराष्ट्रातील मुसलमानांचे नैसर्गिक अस्तित्व, त्यांचे जगणे, त्यांच्या बोली भाषा, त्यांच्यातील जाती, त्यांचे आर्थिक, सामाजिक प्रश्न, दंगली, स्त्रियांचे प्रश्न हे मराठी सारस्वतासमोर मांडणे हे उद्दीष्ट होतं. महाराष्ट्रातला मराठी मुसलमान कोण आहे, काय आहे हे सांगणे आवश्यक होतं.’ 

याशिवाय मराठी मुसलमानांची साहित्यिक अभिव्यक्ती, अस्तित्वाचे प्रश्न, मूलभूत समस्या, सांस्कृतिक धोरण, नागरी स्वातंत्र्य, समाजिक प्रबोधन इत्यादी भूमिका व धोरण परिषदेच्या स्थापनमागे होते. हाच धागा धरून परिषदेने गेल्या ३० वर्षांत राज्यात अनेक सामाजिक व सांस्कृतिक बदल घडवून आणलं आहेत. किंबहुना राजकीयदेखील!

वाचा :मंटो आणि अब्बास यांच्या उर्दू कथांमध्ये वृद्धांचे चित्रण

वाचा : लिहिता नवलेखक आणि त्याचे प्रश्न

साहित्य परिषदेने इस्लामच्या पारंपरिक चौकटीत होणाऱ्या चर्चा विश्वाला सांस्कृतिक मूल्यनिष्ठा प्रदान करून दिली आहे. सामाजिक प्रबोधनाच्या कप्पेबंद मानसिकतेला झोडपून काढलं आहे. जात, वर्ण व अभिजन संरचनेला हादरे दिले आहेत. अखिल भारतीय धोरणाविरोधात विद्रोहाची पताका उभी केली. दलित, बहुजन, ओबीसी आणि मराठी मुसलमानांचे प्रश्न सातत्याने हाताळले. गेल्या तीन दशकात साहित्य परिषदेने एकही धार्मिक परिसंवाद, धर्मचर्चा, धर्माचे गौरवीकरण करणारे व्याख्याने आयोजित केली नाहीत. तसेच पांढरपेशा व प्रस्थापित साहित्यिक, लेखक, अभ्यासक व भाष्यकारासारखं इतर धर्माचा व संस्कृतीचा द्वेश केला नाही तसंच राजकीय मौन देखील पाळलं नाही. 

‘मुस्लिम’ ही संज्ञा सामाजिक आहे, त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होता कामा नये. हा सामाजिक घटक ‘इस्लाम’ या धर्माचा अनुयायी आहे. इस्लाम हे एक स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. मानवी मूल्यांचा व स्वतंत्रतेचा, बुद्धिप्रामाण्यतेचा तो पुरस्कार करतो. समता, स्वातंत्र्य व बंधुता ही त्याची मूल्यत्रयी आहे. फक्त जिहाद या संज्ञेला अनुषंगून त्याची चर्चा करणे प्रतिगामीपणाची लक्षण आहेत. तसेच ‘इस्लाम’ या संज्ञेला बदनामीकारक पारिभाषित करून पारंपरिक आणि मूलतत्त्ववादी गटांना टीकेची संधी प्राप्त करून देण्यासारखं आहे.

‘मराठी मुस्लिम’ ही संज्ञा महाराष्ट्राने अजूनही स्वीकारली नाही. अनेक साहित्यिक लेखक विचारवंत व भाष्यकार मंडळींनी मराठी भाषेत उल्लेखनीय भर घातली आहे. अभिजनकृत भाषा शुद्धीकरणाच्या मोहिमेला हाणून पाडलं. तसंच पांढरपेशा वर्गाची भाषिक मक्तेदारीदेखील संपुष्टात आणली. मराठीसहित (अर्थात प्रमाण मराठीदेखील त्यात अभिप्रेत) दखनी, उर्दूमिश्रित नवीन प्रादेशिक बोली व्यवहार अमलात आणला. त्यात भाषिक साहित्यनिर्मिती देखील केली.

प्रसिद्धी माध्यमे, प्रतिगामी गट, व्यक्ती, संघटना इत्यादींनी प्रादेशिक मुस्लिमांची नेहमीच प्रतारणा केली आहे. त्यांचं सांस्कृतिक चरित्रहनन केलं. सामाजिक विकृतीकरण व राजकीय सुलभीकरण केलं. मुस्लिम समुदायाला धर्म चौकटीत बंदिस्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. उदारमतवादी व लोकशाहीवादी मुस्लिमांची हेटाळणी केली.

‘मुस्लिम मराठी साहित्य परिषदे’ने हे सर्व धोरणांवर सडेतोड प्रहार केला आहे. या साहित्य व्यवहार व कार्यक्रमांना वेळोवेळी दोन्हीकडच्या प्रतिगामी गटाने धार्मिक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे.

उदय टिळक नावाचे एक सनातनी ब्राह्मण या साहित्य परिषदेला इस्लाम धर्मापुरती बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत होते. प्रा. बेन्नर यांनी त्यांचा हा प्रयत्न वारंवार हाणून पाडला. टिळक यांच्या तत्सम संघटित प्रयत्नांची बेन्नूर यांनी कशी नालस्ती केली, त्यांना संमेलनातून कसं हाकलून लावलं, हा एक मोठा इतिहास आहे. टिळक हे ब्राह्मण असून इस्लामवर इतकं ‘चांगलं’ बोलतात, त्यामुळे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, असाही एक गट त्यावेळी कार्यरत झाला. अर्थातच या गटाच्या मदतीने टिळकांनी वारंवार परिदेच्या धोरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नदेखील केला. असो.

२००९ साली औरंगाबादला साहित्य परिषदेचे शेवटचं संमेलन पार पडलं. त्यानंतर दीर्घकाळ कुठलाही साहित्यिक कार्यक्रम होऊ शकला नाही. अंतर्गत भेदाभेद, हेवेदावे इत्यादीमुळे परिषद बरखास्त झाली. त्यानंतर या परिषदेतील काही लेखक, भाष्यकार मंडळींनी पुन्हा नव्याने साहित्यिक व्यवहार सुरू केला. त्यातून काही संमेलनदेखील झाली. मनुष्यबळ, आवश्यकता, विवंचना इत्यादीतून नंतरच्या काही संमेलनामध्ये धर्मगट कार्यरत झाल्याचं दिसून येते. प्रा. बेन्नूर हयात असेपर्यंत त्यांनी साहित्यिक व्यवहारात धर्मगटांचा हस्तक्षेप अमान्य केला. त्या विरोधात वारंवार आघाडी उघडली, परंतु ते या हस्तक्षेपाला थांबवू शकले नाही. 

परिणामी मराठी मुसलमानांच्या साहित्यिक व्यवहारकेंद्री सांस्कृतिक कार्यक्रमाला किंचितशी धार्मिक किनारदेखील लाभली. परंतु हा अलीकडचा इतिहास आहे. जो दखलपात्र असला तरी फारसा महत्त्वाचा ठरत नाही. कारण गेल्या दशकभरात मुसलमानांची सामाजिक व सांस्कृतिक प्रतारणा झाली. राजकीय चरित्रहनन झालं. त्यातून त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न उभे राहिले. अशा प्रश्नांना भिडणारी ही साहित्यिक मंडळी अभिजन व प्रतिगामी राजकारणाच्या विरोधात बंड करून उभी राहिली. सांप्रदायिक, जातीय व वर्णभिमानी गटांच्या विरोधात लोकशाही मूल्य, समता, स्वातंत्र्य जपणारी परिभाषा सातत्याने मांडली.

गेल्या वर्षभरात मुस्लिम या संज्ञेला राक्षसी करण्याचं स्वरूप मराठी मीडिया व प्रतिगामी भाष्यकारांनी मिळवून दिलं. समीर वानखेडेंचं मुस्लिमत्व असणं शोधणं किंवा वसईच्या आफताबचं मुस्लिम असण्याला सांप्रदायिक दंगलींना प्रवृत्त करणारी परिचर्चा मांडणे; अशा काही प्रकारामुळे मुस्लिम संज्ञेला हिडीस स्वरूप प्राप्त झालं आहे. या विखारी वातावरणात अनेकांनी हात धुवून घेतले व अजूनही घेत आहेत. 

वाचा : मुस्लिम व इस्लामविषयक पुस्तकांची वाढती मागणी

वाचा : सोशल मीडिया आणि नवलेखन

दुर्दैवाने उदारवादी, कथित धर्मनिरपेक्षतावादी, प्रबोधनवादी व परिवर्तनवादी चळवळीने देखील मुस्लिमांना धर्म केंद्रीय चर्चेपुरतेच बंदिस्त ठेवलं आहे. अर्थातच त्यांचे हे धोरण प्रतिगामी शक्तीविरोधात उभं राहिलेलं प्रतिक्रियावाद आहे. त्यात अज्ञान, गैरसमज व सुप्त मुस्लिम द्वेशाची एक पारंपारिक किनार आहे. चर्चा, सहवास, संवाद इत्यादीतून तो दूर केला जाऊ शकतो. कारण तो प्रतिगामी गटासारखा बंदिस्त नाही. परंतु ब्राह्मण्यप्रणित गट मात्र मुसलमानांना धर्मीय चर्चाविश्वापुरतं मर्यादित करून टाकतो. अशा वैदिक धर्मभिमानी, हिंदू राष्ट्रवादी, सांस्कृतिक वर्चस्ववादी, वर्णभिमानी अशा प्रतिगामी गटांना मुसलमानांना धार्मिक चौकटीत बंदिस्त करून त्यांना झोडपण्याचे दूरदृष्टीय राजकारण साध्य करण्यासाठी सोपं ते जातं. 

सारांश असा की ‘मुस्लिम’ व ‘इस्लाम’ अशा चर्चाविश्वापुरतं वातावरण तयार करणे, हा एक प्रतिगामी अट्टाहास आहे. मुसलमानांची नागरी संज्ञा स्वीकारली किंवा त्यांचा सामाजिक अस्तित्व कबूल केलं, तर अशा प्रकारची हेटाळणी, द्वेष, तिरस्कार, प्रादुर्भित होत नाही. ‘मुस्लिम मराठी साहित्य परिषद’ ही धार्मिक नव्हे तर ‘सांस्कृतिक संघटना’ आहे. त्यांच्या एकूण धोरणात कुठलीच तडजोड नव्हती. किंवा एखाद्या थोर किंवा किरकोळ व्यक्तीने अशा साहित्यिक कार्यक्रम, परिसंवाद, संमेलनांना उपस्थिती लावली, त्यामुळे तो दुर्बल किंवा प्रतिगामी ठरत नाही.

तसं पाहिलं तर अभिजन संस्कृतीने प्रादुर्भित झालेल्या ‘अखिल भारतीय…’ साहित्य व्यवहाराला कुठल्या धर्मीय चौकटीत बंदिस्त करणार? 

कथित अभिजन साहित्य व्यवहाराने परिघाबाहेरील घटकांची दखल घेतली नाही, बहुजन आदिवासी व भाषिक अल्पसंख्यांकाची प्रतारणा केली. त्यामुळे असे साहित्यिक गट, परिषदा, संघटना उदयास आलेल्या आहेत. त्यातून वेगवेगळे समूह गट, धर्मीय गट, जातीय गट इत्यादी आपल्या भाषिक व्यवहारासाठी, अभिव्यक्तीसाठी अशा प्रकारची संमेलने घेत आहेत. 

इथल्या विषयाच्या मर्यादेमुळे विस्ताराने प्रकाश टाकणे शक्य नाही. पण अभिजन ‘अखिल भारतीय…’ साहित्य मोहिमेने सर्व बहुजन केंद्री घटकांना सामावून घेतलं असतं, तर कदाचित अशा परिषदांची गरज भासली असती का?

कलीम अज़ीमपुणे

मेल:kalimazim2@gmail.com

 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: धार्मिक (?) चर्चांपुरता बंदीस्त केलेला मुस्लिम
धार्मिक (?) चर्चांपुरता बंदीस्त केलेला मुस्लिम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYpEyr47hcxn6nHCalQ-pG6b4CZVTjwJjseJiboHouq7drYAzqZgmECNVXWrS7lVfcgAhnmU00U9aCSAeKXpBDSC0smR5phoRLQNMkRFZL8SDgA-EwFqa-Pbs5AY_m5IXe9aWYairZz6o8h3TcJHZeJ7ks2--gYmwX19i3iHVjUoIt9wEXMtVW6WeVSg/w640-h310/FB_IMG_1667319515257.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYpEyr47hcxn6nHCalQ-pG6b4CZVTjwJjseJiboHouq7drYAzqZgmECNVXWrS7lVfcgAhnmU00U9aCSAeKXpBDSC0smR5phoRLQNMkRFZL8SDgA-EwFqa-Pbs5AY_m5IXe9aWYairZz6o8h3TcJHZeJ7ks2--gYmwX19i3iHVjUoIt9wEXMtVW6WeVSg/s72-w640-c-h310/FB_IMG_1667319515257.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2022/11/blog-post_21.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2022/11/blog-post_21.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content