
बोलती भाषा लिहिती झाली तसं एका मोठ्या समाजघटकाला अभिव्यक्तीच्या भाषेचा शोध लागला. अर्वाचीन काळात संज्ञापनप्रणाली विकसित होत असताना चित्र व चिन्हरूपी भाषा अस्तित्वात आली होती, ही ‘कम्युनिकेशन’ जगतातील मोठी क्रांती मानली गेली, अगदी त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमे हाती (मोबाईलमध्ये) आल्यानं बोलीभाषा ग्लोकल झाली. अभिव्यक्तीची भाषा अवगत झाल्यानं एका सामान्य वर्गाचा जगाशी थेट संपर्क वाढला व जगभरातील भाषिक विविधता एका प्लॅटफॉर्मवर आली. त्यामुळे विविध भाषिक साहित्य आज आपणास सहज वाचायला उपलब्ध झालं आहे.
क्षेत्रीयच नव्हे तर राजभाषेच्या (हिंदी) अनेक विविधरुपी छटा आज आपल्यासमोर आहेत. या बदलत्या प्रवाहानं साहित्य क्षेत्रात कमालीचा बदल झाला आहे, पण प्रस्थापित साहित्यिक व लेखकांनी या नव्या प्रवाहाला दुर्लक्षित केलं आहे. किंबहूना त्यांनी त्याला साहित्य मानण्यासच नकार दिला आहे. त्यामुळे या नवलेखकांपुढे साहित्यप्रकार आणि वाड्मय यात साधर्म्य साधून नवनिर्मिती करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या द्वंद्वातून बाहेर येऊन अनेकजण वेगळ्या धाटणीची साहित्य निर्मिती करत आहेत.
एकविसाव्या शतकात ‘मीडिया क्रांती’मुळे अभिव्यक्तीची माध्यमं कमालीची बदलली, त्याप्रमाणे लेखनाचे नवे प्रवाह व शैली फेसबुक व ब्लॉगरूपी मीडियानं पुढे आणली. बोलीभाषेसोबत व्यवहार, इंटरनेट, तंत्रज्ञान आणि भाषिक मिश्रणातून अनेक नवे शब्द साहित्यक्षेत्रात आले. ग्रामीण-निमशहरी राहणीमान, शेती व्यवहार, जीवनमान, अनुभवकथन, ललित आणि लघुकथा (मलक) इत्यादी फॉर्ममधून लेखनाच्या विविध छटा मराठी साहित्यात अवतरल्या.
शेती व ग्रामीण राजकारणापासून सुरू झालेली ही परंपरा आज लैंगिक घुसमट व्हाया कुटुंबसंघर्ष, शासन संस्थेवर टीका, रोजगार, राजकीय कोट्या, विनोद व ट्रोलिंगपर्यंत येऊन ठेपली आहे. लेखनप्रक्रिया, प्रत्यक्ष वाचक आणि प्रतिसाद यांचा विचार करताना अनेक नव-नवे आयाम या नवीन साहित्यप्रवाहाने दिल्याचं दिसून येतं.
लेखन व भाषेच्या या सहजीकरणानं साहित्यात विविध छटा आणल्या आहेत. लिहिणं व तात्काळ प्रकाशित करण्याची साधनं सोपी झाल्यानं लिहिणारी मोठी जमात तयार झाली आहे. भाषिक अडथळ्यांंच्या पलीकडे जाऊन मिंग्लिश, हिंमग्लिश, मुंबईया, कोकणी, मराठवाडी, वैदर्भीय, खानदेशी, कोल्हापुरी, दखनी इत्यादी बोलीतील लिखाण एका क्लिकवर वाचायला उपलब्ध झालं आहे.
त्यामुळे साहजिकच प्रमाणभाषेची ‘मिरासदारी’ व ‘दादागिरी’ संपुष्टात आली आहे. भाषेचं ‘प्रमाणीकरण’ का ‘ब्राह्मणीकरण’ (संस्कृटायजेशन) असा वाद सुरु असताना प्रादेशिक बोलीभाषेत साहित्यनिर्मिती करणारी मोठी फळी उदयास आली. परिणामी ग्रामीण बाज व स्थानिक व्यवहारभाषा यांचं मराठी साहित्यात सामाइकीकरण झालं.
वाचा : सोशल मीडिया आणि नवलेखन
अभिव्यक्ती नव्हे संघर्षातून लेखन
ब्लॉग व फेसबुकवर लिहिलं जाणारं स्फूट लिखाण असो वा अऩुभवकथन, याला ‘साहित्यिक मूल्य’ या कथित परिभाषेत मोजायचं झाल्यास ते बसतीलच असं नाही. किंबहूना त्या परिमाणांना फाट्यावर मारल्यानंच हा नवा लेखनप्रवाह वाचायला आणि अनुभवायला मिळत आहे. कदाचित साहित्यिक मक्तेदारी संपुष्टात आल्यानं ‘साहित्यिक मूल्य’ या परिमाणाची चर्चा सुरू असावी का असंही निरिक्षण नोंदवलं जाऊ शकतं. किंबहूना अधिसत्तेचा केंद्रबिंदू हातातून निसटून जाण्याच्या भीतीनं हा राग आळवण्यात येत असावा का असंही वाटण्यास जागा आहे. असो.
या बदलत्या लेखनपरंपरेनं नव्या साहित्यिक जाणीवा तर दिल्याच पण लेखकमंडळींना या माध्यमानं दिलेलं अभिव्यक्ती व प्रतिभास्वातंत्र्य दखलनीय व मोलाचं आहे. फेसबुकवर लिहिला जाणारा प्रत्येक शब्द हा अधिमान्य असतोच असं नाही, पण या लेखनप्रक्रियेनं लिहिणाऱ्यांना काहीअंशी मान्यता मिळवून दिली आहे. यातून अनेक लिहिते लेखक व कवी तयार झाले आहेत.
उथळ लेखकरावांचा भरणा सोडला तर अनेक चांगले व कसदार लेखक डिजिटल साहित्यातून तावून-सुलाखून बाहेर आले आहेत. आज महाराष्ट्रातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांनी या लेखकांच्या प्रतिभाकौशल्याची दखल घेत रविवारीय पुरवणीत त्यांना जागा दिली आहे. त्यामुळे अशा बदलत्या साहित्यप्रवाहात या लेखन व साहित्यप्रकाराची चर्चा करणे अपरिहार्य ठरतं.
प्रस्थापितांना धक्के
प्रत्येक काळात ठोकळेबाज व चौकटीच्या बाहेर जाऊन वेगळ्या धाटणीचं लिखाण सातत्यानं पुढे आलं आहे. नव्वदीनंतर विविध पातळ्यांवर अनेक साहित्यिक चळवळी उदयास आल्या, ख्रिस्ती मराठी, जैन मराठी, मुस्लीम मराठी अशी संमेलनं सुरू झाली. कारण प्रस्थापित लेखक-साहित्यिकांचं लेखन एका अर्थानं कंटाळवाणं होत चाललेलं होतं, अशा वेळी दलित साहित्यानं मराठी साहित्यातील फार मोठी पोकळी भरून काढली.
दलित साहित्याने प्रस्थापित लेखकांना नुसते धक्केच दिले नाही तर लिहिण्याची परंपरा व धाटणी बदलायला भाग पाडले. यानंतर आंबेडकरी विचारांतून प्रेरणा घेऊन निरनिराळे समाजघटक लिहिते झाले. देशभरात अनेक मागास जाती-जमातीच्या लेखकांनी बोली भाषेत व्यक्त व्हायला सुरुवात केली. या बदलामुळे साहजिकच प्रमाणभाषेच्या मक्तेदारीला धक्का बसला होता.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कथित साहित्यकारणात अधिमान्यता नसलेला मोठा वर्ग लिहिता झाला होता. कविता आणि कथा-कांदबऱ्यातून मागास समाजघटकाचे प्रश्न व समस्या रेखांकित होऊ लागले. कालांतरानं तंत्रज्ञानाचं युग अवतरलं तसे साहित्यक्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. कम्प्युटर आल्यानं प्रकाशनव्यवसाय सहज होऊन त्यात तेजी आली, लिहत्या साहित्यिक-लेखकांना महत्त्व प्राप्त झालं. एकविसाव्या शतकात साहित्य व प्रकाशनव्यवहाराला गती आली.
मागास घटकांच्या साहित्याची वेगवेगळ्या भाषेत अनुवादाची परंपरा सुरू झाली, लोकप्रियता वाढल्यानं अनेकजण नव्यानं लिहते झाले. अभिव्यक्तीची भाषा अवगत झाल्यानं तळागाळातील उपेक्षित आणि धार्मिक-सांस्कृतिक अत्याचारांनी ग्रस्त समाजघटक आपल्याच प्रश्नांत गुरफटून गेला. तर प्रस्थापित सारस्वत विशिष्ट प्रकारच्या अभिरुचीत व सांस्कृतिक राजकारणात अडकला. त्यामुळे मराठी साहित्यात आशयाच्या पातळीवर तोच तोपणा येऊ लागला. मराठी साहित्य नीरस व कंटाळवाणं वाटू लागलं.
बदलांचे संदर्भ
तंत्रज्ञानातील बदल, जीवनशैली, रोजगार, व्यापार-उदीम, शिक्षण इत्यादी पातळीवर मोठे बदल झाले. पण प्रस्थापित साहित्यिकांनी याची दखल न घेता आपलीच री ओढणं सुरू ठेवलं. ही पोकळी भरून काढण्याची गरज होती; पण प्रस्थापित साहित्यिकांनी सातत्यानं दुर्लक्ष केलं किंबहूना हे प्रश्नच नाही असं गृहितक तयार केलं. परिणामी सांस्कृतिक राजकारण, वर्ग, वर्ण आणि जात जाणीवेच्या बाहेर जाऊन लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
जागतिकीकरणाचे फायदे व नुकसानाची चर्चा सुरू झाली. शिक्षण, रोजगार, व्यवहार, नातेसंबध, प्रेम, मेट्रो सिटीज्, मल्टीनॅशनल कंपन्या, खासगीकरण आणि उदारीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता दुष्परिणाम आदी विषयांवर सातत्यानं लिखाण येऊ लागलं. भाषिक आणि लेखनशैलीचा बदल या लेखनप्रवाहातील महत्त्वाची आधारस्थाने मानली गेली. त्यातून इंग्रजीत चेतन भगत सारखा लेखक जन्मास आला.
बदलत्या जीवनशैलीला अधोरेखित करणारं साहित्य चेतन भगत यांनी पुढे आणलं. लेखनातील साम्यस्थळं अपील झाल्यानं टेक्निकल व सायन्सची तरुणाई ‘भगती’ साहित्याला डोक्यावर घेऊन नाचली. एकापाठोपाठ एक अशा दर वर्षांला कादंबऱ्या पाडण्याची परंपरा चेतन भगत यांनी पुढे आणली.
केवळ भाषा, विषय व शैलीमुळे भगती साहित्य लोकप्रिय झालं असा अंदाज बांधणं चुकीचं आहे. कारण सलमान रश्दी यांनीदेखील भारतीय बोलीभाषा इंग्रजीतून जागतिक पातळीवर नेल्या आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी भाषेचं ‘चटनीझम’ ग्लोबल स्तरांवर केलं, पण त्याचं साहित्य चेतन भगतसारखं विकलं किंवा वाचलं जात नाही. कारण चेतन भगत यांनी प्रकाशन मार्केट ध्यानात ठेवून उच्चवर्गीय व उच्चवर्णीय जाणीवा कुरवाळण्याचं काम आपल्या साहित्यातून केलं.
तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला तरुण वर्ग मांडला, प्रेम, सेक्स, स्पर्धा, लैंगिक घुसमट, बहूराष्ट्रीय कंपन्या, आयटी सेक्टर इत्यादी असे उच्चभ्रू प्रश्न व त्याचं जीवनमान रेखांकित केलं. त्यामुळे साहजिकच ‘भगती’ साहित्याला मार्केट मिळालं.
एका ठराविक वय आणि वर्गगटाला लक्ष्य करून ते साहित्य निर्मिलं गेलं होतं. या कादंबर्याचा वाङ्मयीन दर्जा काय आहे, यावर चांगल-वाईट अशा अर्थानं बरंच चर्चामंथन झालं आहे. असं जरी असलं तरी आज चेतन भगत प्रकाशकीय बाजाराच्या दृष्टिकोनातून सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरला आहे.
भगत याच्या साहित्यावर टीका होत असली तरी त्या साहित्यानं एक नवा वाचकवर्ग तयार केला आहे, हे नाकारून चालणार नाही. हिंदी-इंग्रजी साहित्यात असे अनेक प्रयोग झाले आहेत. पण दुर्दैवानं मराठीत असा प्रयत्न झालेला दिसत नाही. पण डिजिटल साहित्यकृतीनं ही पोकळी काही प्रमाणात भरून काढली आहे.
वाचा : आम्ही भारतीय: कल्पनेचे बळी
भाषेतून रोजगारनिर्मिती
तंत्रज्ञानाची जुजबी माहिती असलेला एक मोठा वर्ग इंटरनेटमुळे लिहिता झाला. सामाजिक, राजकीय प्रश्नांवर स्वतंत्र मते असूनही मांडायची कुठे, असा एक समाजघटक अभिव्यक्त होण्याची परंपरा सुरू झाली. कविता, लघुकथा, (मलक) स्फूट आणि सत्यकथनातून नियमित लेखनश्रृंखलेची काही पुस्तकंही तयार झाली आहेत. या लेख-साहित्यिकांनी आपली छोटेखानी ’सृजन’ संमेलनंदेखील भरवली आहेत.
दरवर्षी एक दोन-पुस्तकं ही मंडळी प्रकाशित करतात. ब्लॉग व फेसबुकच्या लिखाणातून अनेकांना उत्पनाचं साधन प्राप्त झाले. कंटेन (मजकूर) रायटरची नवी गरज या तंत्रज्ञानरूपी मीडियानं पुढे आणली. मराठी भाषा रोजगारनिर्मिती करत नाही, असा आरोप करत रोजगारवंचित असलेल्या अनेकांना या नव्या मीडियमनं मातृभाषेतच चांगला पैसा मिळवून दिला आहे.
मुक्तछंदीस नॅरेटीव्ह, अॅबस्ट्रक्ट (अमूर्त) आणि एकसुरी लिखाण ही डिजिटल युगानं साहित्यक्षेत्राला दिलेली नवी परंपरा म्हणावी लागेल. हा बदलता प्रवाह एका अर्थानं प्रस्थापित लेखक-साहित्यिकांना फार मोठा हादरा मानला जात आहे. त्यामुळेच दशकभराचा कालावधी लोटला तरी आजही हे बहुरूपी लेखन ‘साहित्यमूल्या’च्या मोजपट्टीत मोजलं जात आहे. हा साहित्य प्रकाराला वाङ्मयीन मूल्य आहे का? याबद्दल वादविवाद व मतभेद असू शकतात, पण निव्वळ साहित्यप्रकार म्हणून त्याला मान्यता देण्यास काय हरकत आहे.
नवे विषय का नको?
मराठी साहित्यात नेमाडेंच्या कोसला कादबंरीचं रोमॅण्टिसीझम आजही कायम आहे. पन्नास वर्षांनंतरही कोसलाची लोकप्रियता कमी न होणं म्हणजे ते प्रश्न आजही कायम आहेत. पण साहित्यातून दुसरा सांगवीकर अजून का उभा राहू शकला नाही. किंवा कुणाला तो मांडायची गरज का भासली नाही, असा प्रश्न आजही कायम आहे. बदलत्या काळानुसार समाजजीवन कमालीचं बदललं आहे, रोजगार, नोकर्यांच्या अभावामुळे तरुणाईत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. स्पर्धा आणि नैराश्य या दोन घटकांनी युवकांना घेरून ठेवलं आहे.
सांप्रदायिकता, धर्माचं अवडंबर, कट्टरता वाढली आहे. तरुण दहशतवादासारख्या अजस्र अजगराला बळी पडत आहे. शॉर्टकटची वृत्ती वाढल्याने गुन्ह्याची मालिका सुरू झाली आहे. आजचा प्रत्येक समाजघटक या प्रकाराला बळी पडत आहे, पण हे प्रतिबिंब आजच्या साहित्यात अवतरत नाही. त्यामुळे हे प्रश्न उपलब्ध असलेल्या डिजिटल माध्यमातून युवकांनी स्वत:हून मांडायला सुरूवात केली आहे.
ब्लॉग लेखनातून गेल्या दीड दशकापासून हे प्रश्न व जीवनव्यवहार मांडले जात आहे. या डिजिटल तंत्रज्ञान युगाच्या आधी वृत्तपत्रीय पत्राचारामधून हा समस्या अधोरेखित होत होत्या. नंतरच्या काळात वृत्तपत्रीय लेखकांच्या मोठ्या वर्गगटाने तरुणाईंना छळणारे मूलभूत प्रश्न सातत्याने हाताळले. याच काळात काही नवलेखकांनी पदरमोड करून अशा प्रकारचे साहित्य मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्नही केला, पण हे लेखक व साहित्यिक दुर्लक्षितच राहिले. (नावं मुद्दामहून टाळली आहेत, कारण त्या कंपूगटाचा असा शिक्का मारणं सोप्पं होईल) कारण प्रत्येक काळातील दखल घेणारी एक पिढी कंपूशाहीत अडकलेली असते. त्यामुळे हा संप्रदाय दर्जेदार लेखकांना व त्यांच्या कसदार लेखनाला बेदखल करत राहिला आहे.
कंपू गटांची कारस्थाने
अलीकडे तर पुरस्काराचे ‘साहित्यकारण’ करणारी एक मोठी जमातच उदयास आली आहे. कुणाला पुरस्कार मिळू नये, किवा कुठला लेखक चर्चेबाहेर राहावा अशी सोय या कंपू गटातून केली जात आहे. कदाचित त्यामुळेच उथळ व फालतू लेखनाला नामांकित पुरस्कार मिळू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी एका मराठी दैनिकाने अकारण गाजवलेली पुस्तकं असं छोटेखानी सदरच चालवलं होतं. यात अनेक नामवंत लेखकांच्या साहित्यकृती अकारण गाजल्याचं काही लेखक/समिक्षकांंनी म्हटलं होतं. तुरळक वेळा मर्यादित गटात अशा प्रकारच्या साहित्याची चर्चा केली जाते. पण, पुन्हा प्रश्न तोच, की डावलणारा गट मोठा असल्यानं ती दखल बेदखलच राहते.
कोसलानंतर शिक्षण, रोजगार, संघर्ष, स्पर्धा, वाढतं वय लैंगिक घुसमट, अस्तित्वाची जाण, अस्मिता इत्यादी विषयांवर काही कथा व कादंबर्या प्रकाशित झाल्या होत्या पण त्याची फारशी चर्चा झालेली दिसत नाही. माझ्या वाचनात आलेल्यापैकी सांगायचं झाल्यास शशांक ओक यांची 1987 साली ‘अमुकचे स्वातंत्र्य’, तर कमलेश वालावलकर यांची ‘बाकी शून्य’ 2013 साली येऊन गेल्या.
2012 साली याच विषयाचा धांडोळा घेत अवधूत डोंगरेची ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ कादंबरी आली. अवधूतच्या कादंबरीला साहित्य अकादमी मिळाला. त्यानंतर अवधूतच्या ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’, आणि ‘पान, पाणी नि प्रवाह’ अशा दोन कांदबर्या आल्या. त्याही दुर्लक्षितच राहिल्या. नंतरच्या काळात अशा प्रकारच्या साहित्यकृती जन्मास आलेल्या निदर्शनास येत नाही.
लेखनव्यवहारात असलेल्या तरुण साहित्यिकांची दखल मुख्य प्रवाहातील मुद्रित माध्यमे घेत नाहीत, ही तक्रार तशी जुनी आहे. पण यावर मात करून अलीकडे अनेक उच्च व मध्यम दर्जाचे लेखक नावारूपाला आले आहेत. अशा नकारात्मक वातावरणातही आजचा तरुण लेखक आपल्या साहित्यातून नव्या जाणीवा व प्रश्न घेऊन वाचकांसमोर जात आहे. या ‘लक्ष्यकेंद्री’ साहित्यप्रकारानं ठराविक वर्ग व वयोगटात आपली जागा तयार केली आहे.
लेखनात संघर्षाचे प्रतिंबिब
तरुण वाचकांना नवलेखकांच्या लिखित मजकुरात आपले प्रश्न व संघर्षाचे प्रतिंबिब दिसू लागले आहे, विषय व साम्यस्थळामुळे साहजिकच वाचक अशा लेखन प्रकाराकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. लेखनसाहित्यातील तपशील, दर्जा व गुणवत्तेबद्दल मतभेद असू शकतात, पण वाचकांना ही कथा माझ्याभोवतीच गुंफलेली आहे, हा भास महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे वाचक आपल्या प्रश्नांशी समरूप होतो, घटना, प्रसंग यांची कालसापेक्षता आपल्याभोवतीच गुंफलेली आहे, असा भास वाचकाला होतो.
अशा प्रकारच्या लिखाणाकडे ‘साहित्यमूल्य’ आणि ‘वाङ्मयीन’ चर्चा व मतभेदाच्या पलीकडे जाऊन पाहिले जात नाही. हिंदी साहित्यविश्वात फार उदारपणे अशा प्रकारची कलाकृती स्वीकारली जाते. हिंदीत फेसबुक व ब्लॉग लेखनातून काढण्यात आलेली पुस्तके बेस्ट सेलर ठरली आहेत. रवीशकुमार यांचं उदाहरण घेतलं तर त्यांच्या ‘इश्क में शहर होना’ या पुस्तकाची पहिली आवृती 2015 साली आली होती. आत्ता याच पुस्तकाची पाचवी-सहावी आवृत्ती बाजारात लोकप्रिय होत आहे.
रवीशकुमार नंतर हिंदीत अशा पुस्तकाची जणू लाटच आली. ‘इश्क कोई शहर नही’, ‘अभी तूम इश्क में हो’, ‘इश्क कोई न्यूज नही’, ‘इश्क में माटी सोना’ अशी अनेक पुस्तकं आज लोकप्रियतेची शिखरं गाठत आहेत. विक्रीमूल्य ध्यानात घेऊन नावाात इश्क असलं तरी या पुस्तकात सामाजिक व राजकीय भाष्य आहे. फेसबुकची स्टेट्सरूपी कंटेन असलेल्या या पुस्तकांनी हिंदी साहित्यजगतात मोठं स्थान निर्माण केलं आहे.
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ज्यांनी साहित्यात ‘नवा प्रवाह’ म्हणून विद्रोही वृत्ती जोपासली, आज ते या नव्या प्रक्रियेला झिडकारत आहेत. अर्थात कोणी काय स्वीकारावं आणि कोणी नाकारावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण हा तुच्छतावादी दृष्टिकोन बाळगल्यानं हा प्रवाह संपुष्टात येणार नाही. पण त्यांनी आजच्या बदलांना किमान पातळीवर समजून घ्यावं अशी अपेक्षा आहे. तरुण लिहितोय, त्याचे प्रश्न मांडतोय, त्याच्या समस्यांना तोच अधोरेखित करतोय, विविध भाषेत त्याची अभिरुची तो जपतोय, अशा परिस्थितीत या लेखकांच्या लिखाणाचा सन्मान व्हायला हवा.
वाचा : बुरखा बंदीविरोधात आंदोलन
या लेखक मंडळीनेदेखील डिजिटल व वृत्तपत्रीय लिखाणाच्या पलीकडे जाऊन साहित्य निर्मीतीवर अधिकाधिक भर देण्याची गरज आहे. आजचे तरुण लेखक कसदार लिहित नाहीत, अशी तक्रार करून चालणार नाही. त्यांना मार्गदर्शन व दिशानिर्देश करणं गरजेचं आहे. अनेकवेळा तरुणांना अभिव्यक्तीची भाषा सापडते, पण लिहायचं कसं या प्रश्नांभोवतीच ते घुटमळत राहतात. अशा वेळी त्यांना त्या घुसमटीतून सोडवण्याची जबाबदारी ज्येष्ठ म्हणवणाऱ्या साहित्यिकांची आहे.
मी 2009 साली औरंगाबादच्या बामू विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना अनेक नवलेखक कार्यशाळा अटेंन्ड केल्या आहेत. विद्यापीठीय पातळीवर अशा कार्यशाळा होत असताना ज्येष्ठ साहित्यिक किंवा प्रकाशकांनी असा प्रयोग का राबवू नये? आज अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज तरुण व नव्यानं लिहित्या झालेल्या लेखकांना आहे. साहित्यिक राजन खान ‘अक्षर मानव’कडून असा प्रयोग राज्य पातळीवर राबवीत आहेत. त्यांचं काम कौतुकास्पद आहे. पण असे प्रयोग मोठ्या पातळीवर होण्याची गरज आहे.
आम्ही काही तरुण मित्रांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात ‘सुंबरान’ नावाचं यूथ मासिक सुरू केलं होतं. यात आम्ही राज्यभरातील अनेक फेसबूकर्सना लिहितं केलंं. सुरुवातीला लेखनातील टेक्निकल मुद्दे बाजूला ठेवून आम्ही त्यांना लिहायला सांगितलं. त्यांना योग्य लाईन देऊन, विषयाची थीम समजावून सांगून त्या-त्या विषयात रुची ठेवणाऱ्या अनेकांना आम्ही लिहितं केलं. हळुहळू अनेकजण स्वत:हून शैलीवर काम करायला लागले. लिखाणात आशयाचं महत्त्व त्यांना आपोआप समजलं.
तीन-चार वर्षें आम्ही सुंबरान अनियतकालिक स्वरूपात चालवलं. अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आमच्या प्रयोगावर कौतुकाची थाप मारली होती. भालचंद्र नेमाडे यांनी सुंबरान व आमच्या प्रयोगाचं कौतुक करणारे दीर्घ पत्रदेखील आम्हाला पाठवलं होतं. आज सुंबरानची बरीच लेखकमंडळी आघाडीच्या दैनिकात संपादकीय पानावर लेख लिहितात. काहींनी आपली स्वत:ची फिचर वेबसाईटदेखील सुरू केली आहे.
त्यामुळे ‘वाङ्मयीन’मूल्याच्या पलीकडे जाऊन तरुणांचे लेखन स्वीकारण्याचं औदार्य प्रस्थापित साहित्यिकांनी दाखवलं पाहिजे. विविध प्रकारच्या बोलीभाषेतील साहित्य भाषा प्रमाणीकरणाच्या आणि गटा-तटांच्या पलीकडे गेले पाहिजे. लिहत्या तरुण लेखकांच्या लेखनव्यवहाराला किमानपक्षी ‘साहित्य’ म्हणून मान्यता मिळवून देण्यात साहित्यिक व समाजाने मदत करावी.
कलीम अजीम, पुणे
मेल-kalimazim2@gmail.com
(जून 2018मध्ये सत्याग्रही विचारधारामध्ये प्रकाशित झालेला लेख)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com