‘बेगुनाह कैद्यांची’ व्यथा



“जर्द पत्तो का बंद जो मेरा देश हैं,
दर्द की अंजूमन जो मेरा देश हैं” 

गीतकार गुलजार यांच्या या ओळी ‘अब्दुल वाहिद शेख’ यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. २००६ सालच्या ‘मुंबई घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट’च्या फसव्या आरोपाखाली ते तब्बल नऊ वर्ष जेलमध्ये होते. निर्दोष बाहेर आल्यानंतर तपास यंत्रणा आणि व्यवस्थेवर खापर न फोडता, आरोपीचं लेबल चिकटवल्यानंतर होणारी घुसमट त्यांनी पुस्तक रुपात बाहेर काढली

२०१७ला या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. ‘बेगुनाह क़ैदी’ शीर्षकाचं हे पुस्तक सुरुवातीला उर्दू भाषेत २०१६ साली आलं. पुस्तकाची लोकप्रियता पाहता, लागलीच हिंदी आवृत्ती काढण्यात आली. आज हिंदीतलं हे पुस्तक अमेझॉनच्या १०० बेस्ट सेलरच्या यादीत आहे.


मे, २०१७ला गुलजार वाणीसह अन्य एकाची दहशतवादाच्या खोट्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. उत्तर प्रदेशातील बारबांकी सेशन कोर्टाने तब्बल १६ वर्षानंतर या दोघांना निर्दोष सिद्ध केलं आहे. २००१ सालच्या ‘साबरमती एक्सप्रेस ब्लास्ट’ केसमध्ये गुलजार आणि मोबीन शेखला अडकवण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. परिणामी कोर्टाने मोबदला म्हणून पोलीस आणि तपास यंत्रणेला गुलजारला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

अटक केली त्यावेळी गुलजार पीएचडीचा स्कॉलर होता. त्याच्या शैक्षाणिक गुणवत्तेनुसार 16 वर्षाचं आर्थिक नुकसान भरुन निघेल इतका पैसा, गुलजारला देण्याचे आदेश बारबांकी सेशन कोर्टाने दिले आहेत. अशा प्रकारच्या आत्तापर्यंतच्या सर्व केसेसपेक्षा हा खटला यामुळेच ऐतिहासिक ठरतो. नेमक्या याचवेळी ‘बेगुनाह क़ैदी’ सारखं पुस्तक येणं महत्त्वाचं ठरतं.

मुंबईत एका शाळेत शिक्षक असलेल्या अब्दुल वाहिद यांना सर्वप्रथम पोलिस४नी चौकशी व विचारपूससाठी बोलावलं. नंतर वारंवार अशाच रीतीने बोलवण्यात आलं. पुढे त्यांचं अपहरण करून लॉकअपमध्ये डांबण्यात आलं. ११ जुलै २००६ला अब्दुल वाहिद यांना लोकल ट्रेन ब्लास्टच्या आरोपाखाली अटक (अपहरण) करण्यात आलं होतं. या घटनेच्या ११ वर्षानंतर पुस्तक रुपातून वाहिद यांनी आपली घुसमट व्यक्त केली आहे. २६ नोव्हेंबर २०१५ साली स्वत:ला निरपराध सिद्ध करुन ते बाहेर आले.

वाचा : मोहसिनच्या न्यायात अटकाव कुणाचा?

११ जुलै २००६ ते २६ नोव्हेंबर २०१५ हा नऊ वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पुस्तकात नमूद केला आहे. जेलमध्ये काळरात्र ठरलेल्या भयान आठवणी सांगताना ते म्हणतात, “फार वाईट दिवस होते ते, मी निर्दोष होतो, तरीही माझ्यासोबत इतर कैद्याचा व्यवहार अमानुष होता. जेलमध्ये सुरु असलेल्या इतर घटनांची माणूस मला किळस वाटू लागली त्यावेळी मी या घटनांची नोंद करायला सुरुवात केली. माझं लिखाण जेल सुप्रिटेंडेटच्या लक्षात आलं. त्यानंतर मी लिहिलेली कागदं त्यांनी ताब्यात घेऊन फाडून टाकली. त्याचवेळी मी निर्णय केला की हे लिखाण बाहेर गेलंच पाहिजे.” लोकार्पण सोहळ्यात पुस्तकाबद्दल सांगताना ते व्यथित होतात.
अब्दुल वाहिद हे काही एकटे नाही तर यांच्यासारखे असंख्य तपास यंत्रणेच्या पक्षपातीपणाला बळी पडले आहेत. कोर्टाकडून निर्दोष सुटल्यावर अनेकांनी तपास यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेबद्दल लिहलं आहे. असेच एक आहेत गुजरातचे ‘मुफ्ती अब्दुल कय्यूम मंसूरी’ 2014 साली सुप्रीम कोर्टाने मंसूरीसह अन्य 5 जणांना दोषमुक्त केलं. 2002 सालच्या अक्षरधाम मंदिर ब्लास्ट केसमध्ये मदरसा शिक्षक असलेल्या मंसुरीना अडकवण्यात आलं होतं.
पोटा कोर्टाने 2003 साली मंसुरींना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, मंसुरी यांच्या पत्नी सुमैय्या यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला, अखेर देशाच्या सर्वोच्च कोर्टानं 2014 साली फाशी रद्द करुन मंसुरी यांना दोषमुक्त केलं. अकरा वर्षानंतर मुफ्ती अब्दुल कय्यूम मंसूरी ‘बेगुनाह’ बाहेर आले. ‘11 साल सलाखों के पीछे’ पुस्तकातून त्यांनी आपला ‘जेलवास’चा भयानक अनुभव मांडला आहे.

2015मध्ये आलेल्या या पुस्तक प्रकाशनाला स्थानिक संघटनानी विरोध केला. तरीही हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रकाशनाच्या पहिल्या आठवड्यातच पुस्तक हातोहात विकलं गेलं. पुस्तकाच्या निमित्ताने काही नॅशनल चॅलननी मुंसरीच्या मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे राज्यसभा चॅनलनेही मंसुरी यांची 30 मिनिटांची मुलाखत दाखवली. अब्दुल वाहिद शेख आणि मुफ्ती अब्दुल कय्यूम मंसूरी यांच्या विविध चॅनलने घेतलेल्या मुलाखती यूट्यूबवर पाहता येतील.



एक संघटित षडयंत्र

मार्च 2017ला भोपाळमध्य उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट झाला. या आरोपाखाली 25 जुलै 2017ला दोन नवीन अटका झाल्या आहेत. निर्दोष अडकवलेल्या आरोपींना सोडवण्याचं काम करणाऱ्या ‘रिहाई मंच’ संघटनेनं या अटकेसंदर्भात धक्कादायक खुलासे केले. 8 मार्च 2017ला लखनऊमध्ये सैफुल्लाह या तरुणाला एन्काउंटरमध्ये ठार मारण्यात आलं. ही चकमक फेक असल्याचा दावा संघटनेनं केला आहे.

25 जुलै 2017ला मृत सैफुल्लाहशी संबध जोडत दोन तरुणाला पोलिसांनी अटक केली. मो. आतिफ आणि आसिफ इकबाल असं या तरुणांची नावे आहेत. आसिफ हा सैफुल्लाहचा चुलत भाऊ आहे. या अटकेवर ‘रिहाई मंच’ने आक्षेप नोंदवला आहे. 3 मे 2017ला ‘ऱिहाई मंच’च्या एका प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये आसिफनं तपास यंत्रणा त्रास देत असल्याचा आरोप केला होता.

सैफुल्लाहला ‘फेक एनकाउंटर’ करुन एटीएसनं मारलं असा दावाही त्याने या पत्रकार परिषदेत केला होता. या कॉन्फ्रेंसमध्ये पोलीस आणि एटीएसकडून वारंवार धमकी मिळत आहे. माझा ‘आयएस’शी संबध जोडण्याची धमकी देत माझा फेसबुक आयडी आणि पासवर्ड एटीएसनं घेतल्याचं एक पत्र त्यानं 25 एप्रिलला अलाहाबाद हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, गृहमंत्री राजनाथ सिंग आणि राज्य पोलीस महानिर्देशक यांना पत्र पाठवलं होतं. याच आसिफला अखेर 25 जुलै 2017ला एटीएसनं अटक केली.

नेहमीप्रमाणे कथित कागदपत्रे, साहित्य सापडल्याची पुरवणी एटीएसकडून जोडण्यात आली. या अटकेला ‘रिहाई मंच’ने विरोध केला असून एटीएसचा भंडाफोड केल्याने आसिफला अटक केल्याचा आरोप संघटनेनं केला आहे. यासंदर्भात संघटनेचे महासचिव राजीव यादव यांनी प्रेस नोट काढून निषेध नोंदवला आहे.

मध्य प्रदेशमध्ये भोपाळ-उज्जैन या पैसेंजर ट्रेनमध्ये 7 मार्चला स्फोट झाला. आयएसवर स्फोट घडवल्याचा संशय ठेवण्यात आला. याच आरोपाखाली सैफुल्लाह या तरुणाची लखनऊत एनकाउंटरमध्ये हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याच्या घरुन आयएस संबधीत कागदपत्रे आणि शस्त्रसाठा जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला. या चकमकीत अनेक कच्चे दुवे होते.


वाचा : ख्वाजा युनूसच्या आईचा हुंकार 'मला न्याय मिळणार का?'

चकमकीच्या वेळी सैफुल्लाह एकटाच होता. त्याला जीवंत न पकडता मारण्यात का आलं? एकटा असून बंदूक चालवत होता? असे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहेत. हत्येपूर्वी तो वडिलांशी फोनवर बोलला होता. दुबईचा वीजा झाल्याचं तो सांगत होता, असं वडील सरफराज म्हणाले. टीव्हीवरुन चकमकीत तो मारला गेल्याचं कळालं, ‘जर तो दहशतवादी असेल तर मी त्याचं प्रेतही उचलणार नाही’ असंही सरफराज यावेळी म्हणाले होते.

हेच वाक्य 9 मार्च2017ला गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत बोलून सरफराज यांचं कौतुक केलं होतं. आता कथित चकमक या प्रकरणाची मैजिस्ट्रेट चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. वरील उदाहरण पाहता तरुणांना अडकवण्याचं षडयंत्र अजुनही सुरुच असल्याचं दिसतंय. भोपाळच्या सीमी सदस्याच्या एन्काऊंटरवरीही आता सुप्रीम कोर्टानं प्रश्न उपस्थित केले आहेत

गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरला मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये पोलिसांनी 8 कथित सिमी सदस्यांना फेक एन्काऊंटरमध्ये ठार मारलं. या प्रकरणी वर्षभरानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावलं आहे. एन्काऊंटरचा सीबीआय तपास का केला नाही म्हणून कोर्टाने एमपी सरकारला सुनावलं आहे. चार आठवड्यात याबाबत खुलासा करावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

एन्काऊंटर केलेले हे 8 जण जेल तोडून फरार झाले होते, असा दावा पोलिसांनी केला होता. या आठही जणांना निर्मनुष्य स्थळी ठार करण्यात आलं होतं. मारले गेलेले सर्व आरोपी अंडरट्रायल होते. तसंच सर्वजण वेगवेगळ्या बॅरकमध्ये बंद होते. त्यामुळे एकाच दिवशी सर्वजण पळून जातील याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मृतावस्थेत आढळलेले सर्व आरोपांनी नवे कपडे आणि बूट परिधान केले होते.

पोस्टमॉर्टेमध्ये आरोपींना जवळून गोळ्या घातल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे जेलमधून बाहेर काढून यांना मारण्यात आलं असा आरोप काही संघटनांनी केला होता. काहींचे आरोपपत्रसुद्धा तयार नव्हते, मग त्यांना का मारण्यात आले, अशी सवाल विरोधी पक्षांनी यावेळी केला होता. 

तर माजी न्यायमूर्ती मार्केंडेय काटजू यांनी थेटपणे ही चकमक फेक असल्याचं विधान केलं होतं. या आठही जणांना वेगवेगळ्या गुन्ह्याच्या आरोपाखाली देशभरातून अटक करण्यात आली होती. देशभरातून होत असलेल्या टीकेनंतर राज्य सरकारने कथित एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश दिले होते.



गेल्या काही वर्षापासून जेलमध्ये खितपत पडलेले मुस्लीम तरुण निर्दोष सुटण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. दहशतवादाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेल्या तरुणांचा आकडा वाढतोय. गंभीर गुन्ह्याच्या आरोपातून नेमके किती तरुण दोषमुक्त झाले, यासंदर्भात रितसर आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही. तरीही अंदाजे 200पेक्षा जास्त तरुण दोषमुक्त होऊन बाहेर पडले आहेत. येत्या काळात हा आकडा वाढू शकतो.

मालेगाव ब्लास्ट, अक्षरधाम, दिल्ली, मक्का मस्जिद, अजमेर आणि समझौता ब्लास्ट प्रकरणात निष्कारण गोवलेल्या तरुणांविरोधात तपास यंत्रणांना इतक्या वर्षात आरोप सिद्ध करता आलेला नाही. त्यामुळे तपास यंत्रणांना खडसावत कोर्टानं या तरुणांची सुटका केली. प्रत्येक निकालानंतर कोर्टानं केवळ एका शब्दाची दिलगिरी व्यक्त केली. असंख्य तरुणांची उमेदीचे वर्षे वाया गेली, त्याबद्दल केवळ दिलगिरी? या कुठला न्याय झाला..

तरुण वयातली काही वर्ष नव्हे तर अनुक्रमे 12 ते 20 वर्ष या तरुणांनी जेलच्या भिंतीत स्वप्ने मरताना पाहिली आहेत.. स्वत:बद्दल या तरुणांनी घृणा केलीय. या निष्पाप तरुणांकडून समाज, कुटुंब, मित्र-मंडळी हिरावून घेऊन देशद्रोहाचं लेबल चिटकवलं गेलं. अशाच एका तरुणाची कथी बीबीसीने जुलैमध्ये प्रकाशित केली होती. 

दिल्ली ब्लास्ट केसमध्ये अटक केलेला मिर्ज़ा इफ़्तिख़ार हुसैन म्हणतो ‘मी जेलमध्ये बरा होतो. कारण 14 वर्षानंतर जेलमधून निर्दोष सुटलो तरी सामाजिक अवहेलना अजुनही माझ्या पिच्छा सोडत नाहीत. वयाची 14 वर्ष तिहाड़ जेलमध्ये घालवल्यानंतरही निर्दोष म्हणून मला समाज स्वीकारत नाहीये. त्यामुळे मी आता अधिकच कठोर बनलोय.’

1996 मध्ये दिल्लीमधील लाजपत नगर ब्लास्टचा आरोप ठेवून इफ्तेखारना अटक करण्यात आली होती. 2010 मध्ये दिल्लीच्या पतिय़ाळा हाऊस कोर्टाने पुराव्याअभावी इफ्तेखार यांची निर्दोष सुटका केली होती. इफ्तेखारसारख्याच अनेकांची वेदनादायी कथा आहेत.



ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी जून महिन्यात धार्मिक भेदभावावर थेटपणे टीका केली होती. ‘मला असा एकही दिवस आठवत नाही जेव्हा मुस्लिमांना देशद्रोही म्हणून हिनवलं गेलं नाहीये. वेळोवेळी मुस्लीम समाजाला राष्ट्रभक्तीचं प्रमाणपत्र मागितलं जातं. 

वारंवार आम्हा सेलिब्रीटीनांही जाहीरपणे याबाबत संशयानं पाहण्यात येतंय’ नसिरुद्दीन शाह यांनी हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीतून अनेक प्रश्न उपस्थित करुन सर्वांचं लक्ष वेधलं होतं. विविध दहशतवादी संघटनेच्या नावानं ही धरपकड सुरु होती.

सुरुवातीला तपास यंत्रणेच्या आणि गंभीर आरोपाच्या भितीमुळे धरपकड संदर्भात कोणी बोलत नव्हतं... आता कोम्बीग संदर्भात एमआयएम पक्षाने थेट भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील तपास यंत्रणांच्या कोम्बीग संदर्भात चिंता व्यक्त केली होती. 

एमआयएम आणि राष्ट्रवादीची भूमिका राजकीय स्वरुपाची होती याबद्दल दूमत असू शकत नाही. मात्र यानंतर मुस्लीम तरुणांची धरपकड थांबली आहे. ‘जमियत ए उलेमा हिंद’ या संघटनेकडून तरुणांच्या सुटकेसाठी देशभरात लीगल सेल उभारण्यात आली आहे. तसंच अनेक सुधारणावादी आणि सेक्युलर गट या कोम्बीग विरोधात एकवटले आहेत. त्यामुळे येत्या काळात आशादायक चित्र पहायला मिळू शकतं..

कलीम अजीम, पुणे
मेल: kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘बेगुनाह कैद्यांची’ व्यथा
‘बेगुनाह कैद्यांची’ व्यथा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEB2X_qaRQGtzXwSXaqj1KnyusWQy4U92lMgApjOODvn9v8qTRePbYnQv24dYAqLT7TcziWaz7hiFr86GeX7p7bEEdGNaswalwnsXVPu9sXC9hzvuXMVIJorJ_zqzt2fMjIVgR8oj8dsr2/s640/begunah-qaidi.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEB2X_qaRQGtzXwSXaqj1KnyusWQy4U92lMgApjOODvn9v8qTRePbYnQv24dYAqLT7TcziWaz7hiFr86GeX7p7bEEdGNaswalwnsXVPu9sXC9hzvuXMVIJorJ_zqzt2fMjIVgR8oj8dsr2/s72-c/begunah-qaidi.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_80.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_80.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content