प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सहिष्णुतेचे महामेरू

थळ व सवंग भाष्यकारांच्या कंपूत राहण्यापेक्षा उपेक्षित व एकटं राहिलेलं बरं, वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्यापेक्षा विस्मृतीत असणं चांगलं, या विचारांना साजेसं प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचं जगणं होतं.

17 ऑगस्ट 2018ला (शुक्रवारी) या जगण्याला अचानक ब्रेक लागला. वयाच्या 80व्या वर्षी प्रा. बेन्नूर महाराष्ट्राचा भूतकाळ झाले. रात्री नऊ वाजता त्यांनी जगाला अंतिम अलविदा केला.

ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून महाराष्ट्रात व देशात ख्यातकिर्त असेलेले बेन्नूर एकाएकी काळाच्या पडद्याआड गेले. युसूफ सरांनी दिलेली बुरी खबर कानावर पडताच माझं मन संवेदनाहीन झालं. एकाएकी मनी भावनांचा कल्लोळ दाटून आला, यात मी ‘इन्ना इलैही राजेऊन’ म्हणायचंदेखील विसरलो.

सोमवारी 20 ऑगस्टला सोलापुरला त्यांच्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होता. कार्यक्रमाची तयारी व जुळवाजुळव करत असताना मन सुन्न करणारी बातमी येऊन धडकली. बेन्नूर सर गेल्या काही महिन्यापासून किडनीच्या विकारानं आजारी होते. दुर्धर झालेल्या आजारासमोर अखेर त्यांनी हात टेकले.

बेन्नूर गेल्या सहा दशकांपासून राजकारण, समाजवाद, राष्ट्रवाद, गांधी विचारांवर सातत्यानं लिहित होते. ते गांधीवाद, समाजवाद व साम्यवादाचे वाहक होते, या विचारांची अंधभक्ती करण्याऐवजी त्यांनी वेळेप्रसंगी कठोर चिकित्सादेखील केली.

इस्लाम आणि अरब वर्ल्ड सरांचा आवडता विषय. त्यांना साम्राज्यवादी अरब इतिहास तोंडपाठ होता. धर्मवाद्यांनी लादलेल्या रुढी परंपरा झुगारून दिल्याशिवाय कुठल्याही समाजाचा विकास शक्य नाही, असं त्यांचं ठाम मत होतं.

धर्मवादी व हिदुत्ववाद्यांनी उभा केलेला मुस्लिम एकजिनसीपणाचा भ्रम त्यांनी आपल्या लेखनातून खोडून काढला होता. कुठल्याही धार्मिक दहशतवादामागे साम्राज्यवाद आणि त्याचं अर्थकारण दडलेलं असतं, त्याला जाणून घेतल्याशिवाय ती समस्या समजून घेणं शक्य नाही असा विचार त्यांनी लेखनातून सातत्यानं मांडला.

1970 पासून त्यांनी सुधारणावादी लेखनाला सुरुवात केली. न्यायालयात कारकून, पुणे लष्करात क्लार्क अशा छोट्या-छोट्या नोकऱ्या केल्यानंतर ते 1966 मध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून लातूरला रुजू झाले.

काहीच अवधीत ते दयानंद महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. वर्षभरानंतर ते सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात गेले. कौटुंबिक जबाबदारीच्या कारणामुळे त्यांनी जड अंतकरणानं लातूर सोडलं. बेन्नूर सुरुवातीपासून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते, त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यापीठात अध्यापन कार्य करतात. 



दलवाईवादाचा डाग

१९७० सालापासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, ए.ए. फैजी यांच्यासोबत त्यांनी प्रबोधन चळवळीत काम सुरू केलं. याच काळी ते हमीद दलवाईंच्या संपर्कात आले.

दलवाईभेटीबद्दल त्यांनी फ. म. शहाजिंदे संपादित 'मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा व स्वरूप' या पुस्तकात लिहिलं आहे. बेन्नूर म्हणतात,

“1967 साली दंगलीच्या काळात एका व्याख्यानासाठी दलवाई सोलापूरला आले होते. दंगलीची एकतर्फी माहिती त्यांना देण्यात आली होती. चर्चेत दलवाई मुसलमानांचे ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते सतत मुस्लिम लीगी वृत्तीबद्दल बोलत होते.

मी दोन्ही ठिकाणी हस्तक्षेप केला. त्यांनी चर्चेसाठी डॉ. अंत्रोळीकरांच्या घरी मला बोलाविले. चर्चेतही ते वस्तुस्थितीला सोडूनच बोलत राहिले. त्यानंतर सर्व मोहल्ल्यांतील काही मुसलमान व्यक्ती मला भेटायला आल्या. त्यांना दलवाईंचे एकांगी मत व प्रतिपादन मान्य नव्हते.

दलवाईंना कोणीतरी वस्तुस्थिती समजावून सांगणे गरजेचे होते. तसा प्रयत्न करायचा विचार मी केला. शहरांतील सार्वजनिक सभांतून गोंधळ घातला. अपमानास्पद भाषेत दलवाई मुसलमानांबद्दल बरळत राहिले. त्यांच्या सभांना हिंदूंची गर्दी होऊ लागली. मुसलमानांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला.”

मुस्लिम सत्यशोधक संघटनेबद्दल त्यांना अनेक तक्रारी होत्या. फ. म. शहाजिंदे यांनी 'मुस्लिम मराठी साहित्य एक दृष्टिक्षेप' या बेन्नूर लिखित पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे, “इस्लाम धर्म, ईश्वर, धर्मग्रंथ आणि मुस्लिम प्रश्नांचा प्राधान्यक्रम याविषयी संभ्रमात टाकणाऱ्या दलवाईंच्या भूमिकेमुळे बेन्नूर सत्यशोधक मंडळात रममाण होऊ शकले नाहीत. यातून जे प्रश्न बेन्नूरांच्या पुढे उभे राहिले त्यांच्या सोडवणुकीतून त्यांनी धर्माचा, इतिहासाचा आणि मुस्लिम विचारवंतांचा अभ्यास केला.”

इस्लामच्या अभ्यासामुळे ते दलवाई व त्यांच्या पूर्वग्रहदूषित विचारांपासून बेन्नूर लांब गेले. नंतरच्या काळात म्हणजे 1978 पासून त्यांनी सत्यशोधक चळवळीच्या एकांगी आणि नकारात्मक भूमिकेचा लेखनातून जाहीर प्रतिवाद केला. सत्यशोधक चळवळीचे नकारात्मक स्वरूप, इस्लामविरोधी भूमिका आणि मंडळातील प्रमुख कार्यकर्त्यांचे हिंदुत्ववादी मंडळींशी असणारे विशिष्ट प्रकारचे संबंध त्यावर त्यांनी जाहीरपणे टीका केली.

1977 साली दलवाई गेले तसे बेन्नूर सरांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळापासून कायमची फारकत घेतली. काही काळ बेन्नूर सर दलवाई समर्थक होते, त्याचं मोठं नुकसान त्यांना सहन करावं लागलं.

सोलापुरातील मुस्लिम समाजानं त्यांंना बहिष्कृृत केलं. बराच काळ समाज त्यांच्याशी अबोला धरून होता. दलवाईंच्या सोबतीबद्दल बेन्नूर यांनी सोलापुरकरांशी अनेकवेळा जाहीर माफीदेखील मागितली होती. पण सोलापूरकरांचा राग कमी झाला नाही, माझ्याच समाजानं मला नाकारलं ही सल अखेरपर्यंत तशीच राहिली.



साहित्य परिषदेची स्थापना

दलवाईंशी फारकत घेतल्यानंतर ते मोईन शाकीर व असगरअली इंजिनिअर यांच्यासोबत एकता चळवळीत सक्रीय झाले. त्यांनी पँथर चळवळीत स्थापनेपासून काम केलं, दलित चळवळीच्या प्रसारासाठी त्यांनी सोलापूर व परिसरात कार्य केलं.

डॉ. कुमार सप्तर्षींच्या युवक क्रांती दलातही ते सक्रीय झाले. मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांनी लावून धरला. मुस्लिम प्रबोधनाच्या चळवळीत त्यांना स्वत:ला झोकून दिलं. दंगलग्रस्त भागांना भेटी देणं, पीडित कुटुंबाला आधार देणं, असगरअलींसोबत राज्यातील अनेक हिंदु-मुस्लिम दंगलीचे सत्यशोधन अहवाल तयार करण्याचं काम त्यांनी केलं.

1989 साली त्यांनी अजीज नदाफ, लतिफ नल्लामंदू व मुबारक शेख या सहकारी मित्रांसोबत 'मुस्लिम मराठी साहित्य परिषदे'ची स्थापना केली. या साहित्य चळवळीतून त्यांनी प्रथमच 'मराठी मुस्लिम'ची व्याख्या केली.

शाहबानो व बाबरी प्रकरणानंतर मुस्लिम समाज अस्थिर व अस्वस्थ झालेला होता, मुंबई दंगलीनंतर महाराष्ट्रात मराठी मुसलमानांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला, अशा काळात मुस्लिम मराठी साहित्य परिषदेनं मराठी मुसलमानांना सावरण्याचं काम केलं.

या साहित्य चळवळीतून अनेक मुस्लिम लेखक लिहिते झाले. फ. म. शहाजिंदे, अजीज नदाफ, जावेद कुरेशी, अब्दुल कादर मुकादम, बाबा मुहंमद आत्तार, बशीर मुजावर, मुबारक शेख, एहतेशाम देशमुख, नसीम देशमुख इथंपासून ते आजच्या काळात लिहित असलेले माझ्यासह अनेकजण या साहित्य चळवळीचं फलित आहे.

आजही अनेक तरुण मंडळी सकस व दर्जेदार लेखन करत आहेत. या मंडळींनी वेगवेगळ्या पातळीवर आपल्या लेखनाचा ठसा उमटवला आहे. एका अर्थानं मराठी मुसलमानांना ताठ मानेनं जगण्याचं बळ या चळवळीनं दिलं.

मुस्लिम मराठी साहित्य परिषदेतून सुफी व संतकवींचा इस्लाम व हिंदु-मुस्लिम समन्वयाचा विचार नव्यानं मांडण्यात आला. 50 पेक्षा जास्त मुस्लिम मराठी संतकवींच्या रचना या साहित्य परिषदेनं प्रकाशात आणल्या. इतर संघटनांप्रमाणे धार्मिक विचार मांडण्याऐवजी मराठी मुसलमानांचा जगण्यातला इस्लाम या साहित्य चळवळीतून मांडला.




ओबीसी परिषद

मुसलमानांतील जातिप्रथेवर प्रहार या साहित्य चळवळीनं केला. याच साहित्य परिषदेतून प्रेरणा घेऊन 1992 साली 'मुस्लिम ओबीसी' चळवळीची स्थापना झाली. 1995-96 पर्यंत राज्यभर या चळवळीचं काम पसरत गेलं. उत्तर भारतात पसमांदा चळवळ याच प्रेरणेतून गतीमान झाली.

पसमांदा आंदोलनानं दोन खासदार दिले तर मुस्लिम ओबीसी चळवळीनं महाराष्ट्रातील मागास मुसलमानांची नव्यानं गणना करून त्यांना शासकीय सवलती देऊ केल्या. सच्चर समितीनं मुस्लिम ओबीसी चळवळीचे प्रश्न व समस्या लक्षात घेऊन मुस्लिमांना आरक्षणाची तरतूद केली.

2015 साली महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण अधिकार आंदोलन नावाची चळवळ बेन्नूर सरांच्याच प्रयत्नानं उभी राहिली. या चळवळीने राज्यभर मुस्लिम आरक्षण, स्कॉलरशिप, आर्थिक विकास महामंडळे, शिक्षणातील सवतलींची मागणी लावून धरली आहे.

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी राजकीय विश्लेषक व विचारवंत म्हणून केलेली कामगिरी अतुलनीय आहे. मुस्लिम मराठी मानसिकतेची चिकित्सा करत राजकारणाची होणारी कोंडी त्यांनी मांडली. मुस्लिम राजकारणाची नव्यानं व्याखा करत नेतृत्व निर्मितीवर त्यांनी भर दिला. यासह बालभारती, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, राज्यशास्त्र परिषद, महाराष्ट्र गैझेटिअर आदी अस्थापनावर त्यांनी आपल्या अनुभवांचा ठसा उमटवला. 



बौद्धिक ग्रंथ संपदा

स्वातंत्र्य आंदोलन, फाळणी, साम्राज्यवाद, जागतिकीकरण, इतिहासशास्त्र, वसाहतवाद, दहशतवादाची सडेतोड चिकित्सा बेन्नूर सरांनी केली आहे. इतिहासशास्त्रावर त्यांनी केलेलं काम वादादित आहे. नुकतंच त्यांनी इतिहासशास्त्रावर आधारित सरफराज अहमद यांच्या 'मध्ययुगीन मुस्लिम विद्वान' या पुस्तकाची दीर्घ प्रस्तावना लिहिली.

यात त्यांनी वसाहतवादी इतिहासाला मुस्लिमांनी अकॅडमीक पद्धतीनं उत्तर देण्याची गरज बोलून दाखवली आहे. त्यांनी अनेक मासिके, साप्ताहिके, दैनिकं व पाक्षिकात एक हजारपेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. ते मासिकांच्या लिखाणात इतके रमले की त्याच्यावर लेखांवर येणाऱ्या प्रतिक्रियांवर ते वादविवाद करू लागले, वेवेगळ्या प्रतिक्रियांना उत्तरे देऊ लागले. कदाचित यामुळेच त्यांचं स्वतच्या पुस्तक निर्मिती प्रक्रियेकडे दुर्लक्ष झालं असावंं.

1998 साली त्यांनी भारतीय मुसलमानांची मानसिकता व समाजरचना हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी गैरमुस्लिमांना इस्लामच्या दृष्टिकोनातून नव्हे तर एक 'समाज' म्हणून मुस्लिमांना समजून घेण्याची विनंती केली.

भारतीय मुस्लिम अरबांसारखा एकजिनसी नसून पूर्णत: वेगळा आहे, त्याचं जगणं, खाणं, वेशभूषा, आचरण पद्धती पूर्णत: अरबांपेक्षा भिन्न आहे. भारतीय मुसलमानांत हिंदुप्रमाणे जातिव्यवस्था आहे, तसेत ते भारताच्या प्रादेशिक अस्मितांशी घट्ट बांधलेले आहेत, हा महत्त्वाचा विचार बेन्नूर सरांनी पुस्तकातून मांडला. हे पुस्तक हिंदी आणि उर्दू भाषेतही अनुवाद झालेलं आहे.

आधुनिक भारतातील मुस्लिम विचारवंत, हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव, गुलमोहर, हिंद स्वराज्य एक अन्वयार्थ, मुस्लिम राजकीय विचारवंत, सुफी संप्रदाय आणि वाड्मय इत्यादी असे सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. नुकतंच त्याची तीन पुस्तके नव्यानं प्रकाशित झाली आहेत, त्यात एका हिंदी पुस्तकाचा सामावेशही आहे.

याव्यतिरिक्त राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि इस्लाम, मुस्लिम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप, मुस्लिम राजकारण, मुस्लिम समाज : वास्तव आणि अपेक्षा, ही चार पुस्तके प्रकाशनार्थ आहेत.

२०१४ नंतर भारतात अल्पसंख्य व मुस्लिम सामाजाच्या अस्मिता व धार्मिक प्रतिकांवर हल्ले होत आहेत. गोरक्षेच्या नावानं दलित, मुस्लिम आणि मागास समुदायातील लोकांची मॉब लिचिंग केली जात आहे, अल्पसंख्य समुदायात असुरक्षितेची भावना बळकट होत आहे, अशा परिस्थितीत प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचं जाणे महाष्ट्राच्या प्रबोधनवादी चळवळीची फार मोठी हानी आहे.

भारतीय समाजात हिंदु-मुस्लिम सौहार्दची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारा कर्ता कार्यकर्ता महाराष्ट्रानं गमावला आहे. हिंदु-मुस्लिम समन्वय व सौहार्दचं त्यांचं काम अर्धवट राहणार नाही याचा प्रयत्न तुम्हा आम्हा सर्वांना करण्याची गरज आहे.

कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सहिष्णुतेचे महामेरू
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सहिष्णुतेचे महामेरू
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiThXnhwUrkX4bG8QWGuQETTrY5l77-2YY908ne2xeHii8oFypSTDqPIXX8vj2HTOMW6vR8wKibJHgztFovVNlAdEC1VyXBiVwxqQGud1DXfT74CMNodb06n-zxJ3ehHgpu8IGde9mpywiQ/s640/FB_IMG_1534660534299.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiThXnhwUrkX4bG8QWGuQETTrY5l77-2YY908ne2xeHii8oFypSTDqPIXX8vj2HTOMW6vR8wKibJHgztFovVNlAdEC1VyXBiVwxqQGud1DXfT74CMNodb06n-zxJ3ehHgpu8IGde9mpywiQ/s72-c/FB_IMG_1534660534299.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/08/blog-post_19.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/08/blog-post_19.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content