‘हमारा नाम इतिहास में लिखा जायेगा क्या?’

तिहासलेखनासाठी पुरावे हवेच आणि समता-करुणा या मूल्यांना मानणारी, संशोधकाला शोभणारी विनम्र जाणीवसुद्धा हवी. अखेर, कोणतंही ज्ञान ही अनेकांच्या श्रमावर उभी राहिलेली गोष्ट असते. श्रम कुणाचेही असोत, पुरावे कुठल्याही स्वरूपातले असोत, ते नाकारणार कसे?
आपण सर्वज्ञ नाहीहे विनम्रतेनं मान्य करणं ही ज्ञान मिळवण्याच्या प्रवासातली महत्त्वाची शिदोरी ठरते असं डनिंग आणि क्रूगर या मनोवैज्ञानिकांचं प्रतिपादन प्रसिद्ध आहे. इतिहास लेखनाच्या बाबतीतदेखील इतरांकडून स्वीकारलेल्या वेगवेगळ्या पुराव्यांच्या आणि सिद्धांतांच्या आधारानं हा प्रवास सुखरूपपणे करता येतो. पण आज कुणीही उठून आपापल्या अजेंडय़ानुसार  इतिहास लिहून आत्मनिर्भर होण्याच्या धांदलीत असताना हे दुसऱ्यांनी दिलेले पुरावे पारखून, त्यांना योग्य ते श्रेय देऊन, विवेक वापरून, निष्कर्ष काढण्याचे वेळकाढू आणि परावलंबी उद्योग कशाला करावे? असंही कुणी विचारतील. तर त्याचं उत्तर असं की कोणतंही ज्ञान ही अनेकांच्या श्रमांवर आधारलेली गोष्ट आहे. ज्ञानाच्या, सामूहिक शहाणिवेच्या काही वैशिष्टय़ांचा विचार आजच्या लेखात करून पाहू या.
सतराव्या शतकात इसाक न्यूटननं आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, की मला जर काही दूरवरचं दिसलं असेल, तर त्याचं कारण म्हणजे मी महाकाय लोकांच्या खांद्यावर उभा आहे’. आपले विचार, आचार आणि उच्चार हे आधीच्या लोकांनी निर्माण केलेला ज्ञानाचा प्रवाह आपल्यापर्यंत पोहोचल्यामुळे घडत जात असतात. याची संशोधकाला साजेशी विनम्र जाणीव न्यूटननं पत्रात व्यक्त केलेली दिसते. या उमद्या विनम्रतेपायी ना कुणी न्यूटनचं योगदान नाकारलं, ना कुणी त्याला कमी लेखलं. संशोधकांकडे जेव्हा कृतज्ञता असते, तेव्हा आपल्या कामाला हातभार लावणाऱ्यांचं ऋण फेडता आलं नाही तर किमान त्याचा निर्देश ते करतात. यामुळे न्यूटनचा पत्रव्यवहार संपादित करणाऱ्या एच. डब्ल्यु. टर्नबुल यांचं ऋणदेखील आपल्यावर आहेच.
ज्ञान निर्माण करताना- मग ते इतिहास लेखन असो, वा अधिक चांगल्या पद्धतीनं लोणचं घालण्याची कृती असो- समता हे मूल्य अगदी पायाभूत असायला हवं. म्हणजे ज्या वाचकांसाठी, ग्राहकांसाठी आपण ज्ञान निर्माण करतोय, त्यांनादेखील काहीएक बुद्धिमत्ता, अनुभव, ज्ञान, कौशल्यं आणि मानवी प्रतिष्ठा आहे हे आपल्याला मनापासून पटलेलं असायला हवं. आपण ज्ञान निर्माण करताना कोणकोणते पुरावे कुठून मिळवून वापरले हे वाचकांनादेखील सांगणं म्हणजे समतेचा विचार मानणं. यामुळे काय होतं, तर नुसती पाककृती वाचून सोडून न देता, वाचक स्वत:देखील लोणचं घालून पाहतात, प्रयोग करू पाहतात, इतिहास लिहू-वाचू पाहतात. संस्कृतीचा प्रवाह वाहता राहतो. याउलट आमची कोठेही शाखा नाहीअसा विचार हा व्यापारात मक्तेदारी राहण्यासाठी काही वेळा उपयोगी पडत असेल, तरी एकूण ज्ञानव्यवहाराला मारक ठरतो. समता अंगीकारणारे संशोधक नवं ज्ञान निर्माण करतात तेव्हा त्यासाठी वापरलेले पुरावे आणि पद्धती पारदर्शीपणे सर्वासमोर खुले करतात.
मानवी संस्कृतीच्या आणि ज्ञानाच्या निर्मितीमध्ये आणखीनच महत्त्वाचा विचार हवा तो म्हणजे करुणेचा. करुणा या शब्दाची एक व्याख्या अशी की अहितदु:ख- अपनयकामता म्हणजेच रंजल्या गांजलेल्यांचं दु:ख दूर करण्याची इच्छा. इतरांच्या खांद्यांवर उभं राहून पुढं पाहण्याची धडपड ही आपल्या सोबतचे किंवा मागाहून येणारे लोक ठेचकाळू नयेत, वाट चुकू नयेत यासाठी असायला हवी. आज आपल्या देशात रोगट वर्तमानाचं ओझं घेऊन अनिश्चित भविष्याकडे स्थलांतर करणारे कोटय़वधी लोक मानवनिर्मित संकटाचे बळी ठरताहेत. रखरखत्या उन्हात शेकडो किलोमीटर पायपीट करणारे, मरणारे लोक पाहूनही आपण जर किमान माणूस म्हणून त्यांचा विचार करत नसलो, तर आपल्या सर्वोत्तम पाककृतींची आणि इतिहास लेखनाचीही किंमत झूठ आहे.
करुणा असेल, तर आपापल्या क्षेत्रात, वावरात राहूनदेखील आपण या मानवी शोककथेला थोडं तरी सुसह्य करू शकतो. भूतकाळात अशा संकटप्रसंगाचा मुकाबला कसा केला याचा विचार करताना लखनौच्या बडा इमामबाडम नावाच्या वास्तूकडे लक्ष वेधलं गेलं. १७८४ साली भयंकर दुष्काळ आणि अन्नान्नदशा झालेली असताना असफ उद्दौला या अवधच्या नवाबानं गरीब भुकेल्या लोकांना सन्मानानं रोजगार मिळावा यासाठी या वास्तूचं बांधकाम करायला घेतलं. अशी जनश्रुती आहे की या सुंदर इमारतीच्या कामानं सलग दहा वर्ष हजारो कामगारांना रोजीरोटी आणि मानवी प्रतिष्ठा दिली. भारतीय राजांनी करुणेच्या ओलाव्यातून अशी लोकोपयोगी कामं केल्याच्या ऐतिहासिक पुराव्याचं अस्तित्व मान्य करणं हे ज्ञानशास्त्रीय दृष्टीनंही आवश्यक आहे, पण भारतीय राज्यकर्ते- विशेषत: आधुनिकपूर्व काळातले राज्यकर्तेदेखील प्रजाहिताचा विचार करत होते हे वास्तव साम्राज्यवादी इतिहासकारांना आणि त्यांच्या ओंजळीनं पाणी पिऊन घेणाऱ्या इतरही लेखकांना पचायला जड जातं. त्यामुळे योग्य पुराव्याच्या मात्रेचे वळसे देऊनच त्यांचा पित्तप्रकोप शांत करावा लागतो.
इतिहासातून मिळणाऱ्या अशा दाखल्यांचा उपयोग आत्ताच्या  वास्तवाला दिशा दाखवण्यासाठीही करता येतो. दुष्काळात धान्याची कोठारं खुली करणाऱ्या दामाजीपंतांची तीनचारशे वर्षांपूर्वीची कथा सांगणारं उदारदामोदरहे नाटक १८८० मध्ये मराठी रंगभूमीवर आलं होतं. त्याच्या प्रेक्षकांना १८७५ सालच्या मे महिन्यात दुष्काळ आणि सावकारांच्या विरुद्ध दख्खनच्या शेतकऱ्यांनी केलेल्या खतफोडीच्या बंडाची पार्श्वभूमी परिचयाची होती. ‘‘हे कसले राजे हो? प्रजेला केवळ हे जनावरें समजतात. त्यांची थैली भरली म्हणजे झाले, प्रजा मरेनां! ..ज्या राज्यांत प्रजेला अतिशय दु:ख, ती राज्ये रसातळाला गेलीच म्हणून समजा!’’ हा या नाटकातला संवाद म्हणजे लेखकाची इंग्रजी सत्तेला उद्देशून बोलण्याची  ताकद दाखवणारा पुरावाच आहे.
दुसरीकडे पुरावे म्हणजेच जणू इतिहास किंवा कोणतंही ज्ञान असा गैरसमजही करून घेणं योग्य नाही. कारण वर्तमानकालात पुरावे निर्माण करण्याइतकं सांस्कृतिक भांडवल आणि सवड सर्वानाच लाभते असं नाही. पुराव्यांच्या रेलचेलीच्या बळावर ज्यांना मिरवता येत नाही अशा माणसांच्या वर्तमानाची दखल घेणारं, संवेदनशीलता असणारं समाजमन आणि इतिहासभानदेखील दुर्मीळ आहे. पान पाणी नि प्रवाहनावाच्या कादंबरीमधल्या आदिवासी तरुणाला प्रश्न पडतो, ‘‘दादा, हमारा नाम इतिहास में लिखा जायेगा क्या?’’ बाहेरच्या जगाच्या दृष्टीनं ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, त्याच्या त्यागाची दखल इतिहास घेतो की नाही याबाबत शंका वाटण्याजोगी परिस्थिती आहेच. तरीही पुरावे न ठेवता जगलेल्या लोकांच्या बाबतीत विचार करताना दस्तऐवजांची व्याख्या अधिक समावेशक करण्याचा समजूतदारपणा  काही इतिहासकार दाखवताना दिसतात. त्यामुळे कागदोपत्रांत  कुणाचं नाव आलं नाही तरीही आईबापानं दिली लेक। नाही पाहिली चालरीत। जाई अडकली चिलारीत।।अशा अनाम ओवीमधून सासुरवासरूपी काटेरी चिलारीच्या जाळीत अडकलेल्या जाईसारख्या लेकीच्या वास्तवाची इतिहासाला दखल घ्यावी लागते.
इतिहासाची आणि एकूणच ज्ञानाची निर्मिती करताना पुरावे आवश्यक असतात. त्यांचा कृतज्ञतेनं निर्देश करणं आवश्यक असतं. या संपूर्ण प्रक्रियेमागं समतेचा विचार महत्त्वाचा असतो. आणि जिथे हे नियम काटेकोरपणे पाळता येत नाहीत, तिथेही करुणा आणि संवेदनशीलता ही माणसाच्या ज्ञानाचा आणि संस्कृतीचा  झरा जिवंत ठेवू शकते. अन्यथा आरती प्रभू लिहितात तसं-
वेदनांची गाणी म्हणजे, पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा, पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे..
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’
असं वास्तवाचं क्रूर ओझं घेऊन वणवणत मायदेशांतर करणाऱ्या मजुरांसारखीच आपल्या ज्ञानपरंपरेचीही स्थिती होईल.
(श्रद्धा कुंभोजकर  यांचा हा लेख 28 मे 2020ला लोकसत्ता देनिकात प्रकाशित झालेला आहे. लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहासाचे अध्यापन करतात. त्यांचा मेल : shraddhakumbhojkar@gmail.com)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘हमारा नाम इतिहास में लिखा जायेगा क्या?’
‘हमारा नाम इतिहास में लिखा जायेगा क्या?’
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhl2NYVKVA4ihBiAWTXFxTY3mzrqRiiud7jnqVUnmHY8IXoN8HCTFLMSSYw43L3vXw3uPwB4ExIuDEVqajbsSHIpc80lGjCe_OMw_CzJEjxXQLzjRwz6Kv1Gg2D2PWizhaGpgdZcUmVNdaP/s640/FB_IMG_1582005656868.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhl2NYVKVA4ihBiAWTXFxTY3mzrqRiiud7jnqVUnmHY8IXoN8HCTFLMSSYw43L3vXw3uPwB4ExIuDEVqajbsSHIpc80lGjCe_OMw_CzJEjxXQLzjRwz6Kv1Gg2D2PWizhaGpgdZcUmVNdaP/s72-c/FB_IMG_1582005656868.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/06/blog-post_49.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/06/blog-post_49.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content