सत्ताबदलाची कर’नाटकी’ थट्टा

र्नाटकात येडियुरप्पा अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरणार हे सर्वांना ठाऊक होतं, त्यांचं हसं होणार हेदेखील देशाला कळून चुकलं होतं. पण तरीही येडियुरप्पांनी आपल्यावरील भ्रष्ट्राचाराचे डाग लपवण्यासाठी बहूमत नसतानाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीच. 
निवडणुकीत लोकप्रिय ठरलेल्य पक्षानं हातानं अब्रू गमावणे हे विरोधकांसोबत अनेकांना पटलं नाही. शनिवारी फ्लोर टेस्ट होणार होती, पण प्रत्यक्ष मतदानाआधीच येडियुरप्पांनी आपला पराभव मान्य करून राजीनामा दिला. 
या एका घटनेनं भाजपची चार वर्षांत पहिल्यांदा कधी नव्हे तेवढं हसं झालं आहे. हा अपयश कसं भरून काढायचं यासाठी भाजपला नवीन कुरघोड्यांचं राजकारण आखवं लागणार आहे. तसंच काँग्रेसलाही ‘आगे की सोच’ रखकर राजकीय डावपेच आखावे लागतील..
मंगळवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले, तसा लोकशाहीने दिलेला कौल म्हणून सर्वांनी तो मान्य केला. पण अवघ्या काहीच तासात केंद्रातील सत्ताधारी भाजपने राज्यपालांच्या अधिकाराची गैरवापर करून अल्पमतात सत्ता स्थापनेचा दावा केला. 
काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यपालांच्या घटनात्मक पदाला हरताळ फासण्यात आला. या विरोधात काँग्रेस व जेडीएसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली, बुधवारी मध्यरात्रीपर्यंत कोर्टाचं कामकाज चाललं, पण काँग्रेस-जेडीएसची याचिका कोर्टानं नाटकीयरीत्या फेटाळली. या कर’नाटकी’ राजकारणाच्या शाह-कटशाहीचे गेले काही दिवस देशभरात ‘लोकशाही’च्या मृत्युच्या नावानं सोवळे पाळण्यात येत आहेत.
शुक्रवारी काँग्रेसनं राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडून घटनात्मक पद काढून घेण्याची मागणी करत देशभर ‘संविधान बचाव दिन’ पाळला. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं दोन दिवसात भाजपला बहूमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. 
पंधरा दिवसात बहूमत सिद्ध करण्याची भाजपची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. राज्यपालांनी घटनात्मक पदाच्या अधिकाराचं उल्लंघन केल्याचा आरोप करत भाजपचेच खासदार राम जेठमलानी सर्वोच्च कोर्टात गेले होते. 
यापूर्वी भाजपचा सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेनं ‘भाजपच्या काळात लोकशाहीच अस्तित्त्वात नाही तर त्याची हत्या कशी होणार?’ असा टोला लगावला होता. थोडक्यात काय तर लोकशाहीच्या मृत्युचे सोवळे विरोधकांसोबत सत्ताधारी पक्षातील नेते पाळत आहेत.
काही महिन्यापूर्वी देशात चार राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, यात मेघालय वगळता भाजपने सर्व राज्यातून विरोधकांकडून सत्ता हस्तगत केली. इतकंच नव्हे तर मेघालयातदेखील भाजपने अनैतिक मार्ग वापरून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं. बिहारमध्ये काय झाले हे आपण सर्वांनाच माहीत आहे. 
न्यायालये, कायदेमंडळ, शासनसंस्था इत्यादी ठिकाणी भाजपनं गेल्या चार वर्षांत सत्तेचा गैरवापर करत धुडगूस माजविला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास लोकशाही मूल्ये खिशात ठेवून प्रशासकीय यंत्रणाचा वापर भाजपनं चालविला आहे. यावर गेल्या चार वर्षांत बरंच बोललं आणि लिहलं गेलं आहे. 
शोषित समुदायाला गुन्हेगार ठरवून त्यांचे नैतिक खच्चीकरण करण्याची प्रक्रिया भाजपशासीत काळात सुरू झाली आहे. त्यात देशातील अल्पसंख्याक समुदाय तर भरडला गेलाच पण एकेकाळचा सत्ताधारी राहिलेला आत्ताचा विरोधकही भाजपविरोधी कुरघोडीच्या सत्ताकारणात पिचला जात आहे. 
अशा अवस्थेत विरोधक केवळ लोकशाही मूल्यांचा आधार घेत आहेत. याउलट ज्या लोकशाही व्यवस्थेचा आधार घेऊन भाजप सत्ताधिश झाला, त्याच घटनात्मक मूल्यांना सत्तापक्ष वारंवार पायदळी तुडवत आहे. अशावेळी सिविल सोसायटीनं गप्प राहावं ही भूमिका अनेक प्रश्नांना जागा करून देत आहे.
गोवा, मेघालय व मणिपूरमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा बरंच मागे होता, पण भाजपने घोडेबाजार व सत्ताचालाखी करत तिथे आपलं सरकार स्थापन केलं. यावर काँग्रेसकडून टीका होत असताना केंद्रीय मंत्री अरुण जेटली म्हणाले की, ‘निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षास नव्हे, तर बहुमत आपल्यामागे असणाऱ्या कॉम्बिनेशनला सरकार स्थापनेची प्रथम संधी मिळाली पाहिजे’ पण कर्नाटकमध्ये भाजपने नीतीमत्ता गहाण ठेवून आपलेच तत्व कचरा पेटीत टाकले आहे. 
गेल्या चार वर्षांत भाजपने अनेकवेळा नैतिकतेविरोधी निर्णय घेत राजकारण दामटले आहे. पण ‘भाजपने नैतिकता गमावली आहे का?’ यावर अजून तरी कुठलीच चर्चा विरोधक व सिविल सोसायटीकडून झालेली नाहीये. याउलट गेल्या चार वर्षांचा विचार केला तर काँग्रेससारख्य़ा पक्षानेदेखील अनेकवेळा अनैतिक राजकारण दामटले. पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीपासून ते पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाची लाईन स्वीकारण्यापर्यत अनेकदा काँग्रेसचं धोरणं चुकलेली आहेत.
गेल्या महहिन्यात काँग्रेस ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसच्या चारित्र्यावर मुस्लिमांच्या रक्ताचे डाग आहेत, अशी कबुली दिली, यावर पक्षाध्यक्ष राहुल गांधीनी खुर्शीद यांची पाठराखण करत ‘वेगवेगळे विचार आमच्या पक्षात जन्माला याला संधी आहे व आम्ही त्याचा आदर करु’ म्हणत बोळवण केली. पण सत्यता स्वीकारून मुस्लिमांची माफी मागितली नाही, किंवा त्यांना पुन्हा एकदा जोडून घेण्याचा प्रयत्न केला नाही. 
यूपीए सरकारचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत 1984च्या शीख दंगलीवर माफी मगितली होती, दंगलपीडितांना नुकसान भरपाईदेखील दिली पण बाबरी विध्वंस, मुंबई दंगल, गुजरात, मुझफ्फरनगर, कोक्राझार, ओडिशा दंगलीवर काँग्रेनं अद्यापही मुस्लिमांची माफी मगितली नाही. याउलट मुस्लिमांना नैराश्यात ढकलण्यासाठी व त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी भाजपच्या सांप्रदायिक राजकारणाला पाठबळ देत हिंदुत्वाची लाईन स्वीकारली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनता दल सेक्युलर (जेडीएस) या पक्षाला बसप व एमआयएम व इतर पक्षांनी पाठिंबा दिला. काँग्रेसला पर्याय म्हणून अनेकांनी जेडीएसला पाठिंबा दर्शवला. पण काँग्रेसनं जेडीएसला भाजपची बी टीम घोषित केलं. प्रचारात जेडीएसविरोधात काँग्रेसनं वारंवार राग आळवला. पण निकाल येताच भाजपने काँग्रेसला पराभवाची धूळ चारली. 
अशावेळी जेडीएससोबत सत्ता स्थापन करू अशी जाहीर घोषणा काँग्रेसनं केली. काही दिवसातच काँग्रेसनं सत्तेसाठी जेडीएसच्या पायघड्या घातल्या. 
नैतिकदृष्ट्या पाहिले, तर जनादेश भाजपच्याच बाजूनं होता, त्यामुळे तुम्हीच सरकार स्थापन करा, असं सांगणं योग्य ठरलं असतं. परंतु पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी जेडीएसची जाहीर माफी मागितली व सत्तेसाठी भाजपविरोधाची आघाडी केली. अशा पक्षाला भाजपच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार कसा काय असू शकतो.?
कर्नाटकच्या सत्तास्थापनेचं निमित्त करून काँग्रेसनं गोवा, बिहार, मणिपूर व मेघालय या चार राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची मागणी राज्यपालाकडे केली आहे. गोवामध्ये काँग्रेसकडे 40 सदस्यापैकी सर्वाधिक 16 आमदार आहेत. तर भाजपकडे केवळ 13, मेघालयमध्ये एकूण 59 जागांपैकी काँग्रेसकडे 21 जागा आहेत तर भाजपकडे निव्वळ 2 जागा, परंतु इथं भाजपनं 19 आमदार असलेल्या स्थानिक पक्षासोबत सत्ता स्थापन केली. 
बिहारमध्ये राजद, काँग्रेस व अन्य असे 80 आमदार आहेत. तर सत्ताधारी जेडीयूकडे केवळ 71 आमदार आहेत. मणिपूरमध्ये 60 पैकी काँग्रेसकडे सर्वाधिक 28 आमदार आहेत. तर भाजपकडे केवळ 21 असूनही तेव्हाच्या राज्यापालांनी भाजपला सरकार स्थापन्याची संधी दिली होती. या राज्यात भाजपचेच राज्यपाल आहेत, त्यामुळे काँग्रेसला ती संधी मिळणार नाही. जर असे झाले तर भाजप केंद्राचं बळ वापरून हा प्रयत्न हाणून पाडेन.
कर्नाटकमध्ये लिंगायत धर्म व टिपू सुलतानाचा मुद्दा पुढे करून काँग्रेसनं भाजपला संधी दिली होती. काँग्रेसनं लिंगायतांचा प्रक्षोभ वाढवून भाजपच्या धर्मांधतेस हवा दिली. अशा एकूण सर्व प्रकारातून भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावून विजय आपल्या नावे करून घेतला. 
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारचा कारभार वाईट नसूनही त्यांचा दोन्ही जागेवर पराभव झाला. तर प्रतिस्पर्धी जेडीएसचे कुमारस्वामी दोन्ही जागेवरून विजयी झाले. भाजपविरोधात अँटी इन्कम्बन्सी असूनही 2014 पासून 15 राज्यांत भाजपला सत्ता स्थापन करता आली. 
इव्हीएम मशिनच्या बिघाडामुळे हे शक्य तर नक्कीच झालं नसेल. पण विरोधक त्याच्यापलीकडे जायला तयार नाहीत. कर्नाटकमध्ये लिंगायत धर्माला मान्यता देऊन काँग्रेस प्रबळ झाला होता. भाजपने विरोध केल्यानं त्याचे मतेही काँग्रेकडे वळली होती, मग अचानक कसं काय जादू घडू शकतो. 
याचा विचार पुन्हा एकदा नव्यानं करण्याची गरज सर्व विरोधकांना आहे. केवळ काँग्रेस व नेहरुंच्या बदनामीमुळे भाजपला सत्ता हस्तगत करता आली नाहीये. या पलीकडे काय कराणं असू शकतात याची चाचपणी सर्व विरोधकांना करण्याची संधी या निमित्तानं आली आहे.

कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: सत्ताबदलाची कर’नाटकी’ थट्टा
सत्ताबदलाची कर’नाटकी’ थट्टा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtzreuHV9pZjRMBopDHLUvVXbCXA7vji4mN4bzhlNHIKGN3lJhSN8iZxal2RGAaVQsmYw71dcR2udF3ujK5_en2lK2fcPWSDVKcD9NZQuAmkdT-R_fTW7wW-zcGo3Uez0hR27gLWH0759C/s640/collage+2_6.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtzreuHV9pZjRMBopDHLUvVXbCXA7vji4mN4bzhlNHIKGN3lJhSN8iZxal2RGAaVQsmYw71dcR2udF3ujK5_en2lK2fcPWSDVKcD9NZQuAmkdT-R_fTW7wW-zcGo3Uez0hR27gLWH0759C/s72-c/collage+2_6.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/05/blog-post_22.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/05/blog-post_22.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content